रत्नागिरी : कॅबिनेट मंत्री नारायण राणेंना अटकेसाठी निघालेल्या रत्नागिरी पोलीसांकडे अटक वॉरंटच नाही. पोलीसांवर केवळ दबाव असल्याने अटकेचे नाटक सुरू असल्याची टीका माजी आमदार भाजप नेते प्रमोद जठार यांनी केले. तसेच जन आशीर्वाद यात्रेत कूरघोडी करण्याचा कितीही प्रयत्न राज्य सरकारने केला तरीही ही यात्रा पूर्ण होणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
हे सरकार कागदपत्रे, कायदे व्यवस्था काहीच मान्य करत नाही. केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला अटक करण्यासाठी निघालेल्या पोलीसांकडे अटक वॉरंटही नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. जठार म्हणाले, "राणे साहेबांसोबत आम्हीही तुरुंगात जायला तयार आहोत, आम्हाला केवळ अटक वॉरंट दाखवा, अशी विनंती आम्ही पोलीसांना केली मात्र, त्यांनी दाखविलेली नाही. शंभर कोटींची वसुली करणारे मोकाट फिरतात आणि राणेंनी एखादे वक्तव्य केले त्यावर अशी कारवाई करण्याची गरज काय, अशी प्रतिक्रीया त्यांनी विचारली आहे. दरम्यान, यानंतर रत्नागिरी पोलीसांनी राणेंविरोधातील वॉरन्ट हे प्रसारमाध्यमांसाठी सार्वजनिक केले.