संघसमर्पित तपस्वी व्यक्तिमत्त्व : अप्पा

22 Aug 2021 21:29:06
RSS APPA _1  H




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भुजंग लक्ष्मण वेल्हाळ उपाख्य अप्पा यांचे दि. १ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांचा जन्म १९ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता, तर वयाच्या ९९व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या अप्पांनी अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या. त्यांच्या संघकार्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...

 
उत्तर-पूर्वेच्या मणिपूर राज्यातील थोबाल जिल्ह्यातील कल्याण आश्रमाच्या काकचिंग गावातील मुलांच्या छात्रावासाच्या व्हरांड्यामध्ये डिसेंबर १९८९च्या थंडीत शुभ्र दाढी, धोतर व कुर्ता घातलेले, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, हसरा चेहरा समोर बघत होतो. दुरूनच मन ओढले गेले. नमस्कार केला. मी प्रथमच उत्तर पूर्वांचलमध्ये क्षेत्र बघण्यासाठी आलो होतो.
 
 
 
गप्पांच्या ओघात अप्पांना विचारले, “वयाच्या ६६व्या वर्षी वानप्रस्थाश्रमाचे जीवन आपण स्वीकारून जिथे भाषा वेगळी, खानपान वेगळे, रीतिरिवाज वेगळे, हवामान वेगळे अशा ठिकाणी आपले येणे कसे झाले?” अप्पांनी बोलायला सुरुवात केली, “समर्थ रामदास स्थापित ११ मारुतींपैकी कृष्णामाईच्या काठावर असलेल्या महाराष्ट्रातील कर्‍हाड जिल्ह्यामधील (तत्कालीन) उंब्रज येथे माझा जन्म झाला. माझे वय आठ वर्षे होते. आई वयाच्या ३२व्या वर्षी देवाघरी गेली. घरची गरिबीची परिस्थिती. वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार. प्राथमिक शिक्षण उंब्रजला झाले. १९३६ साली व्हॅर्नाक्युलर फायनल पास झालो. अभ्यासात हुशार असल्याने मीडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झालो. मासिक चार रु. स्कॉलरशिप मिळाली. हायस्कूल शिक्षणासाठी कर्‍हाडच्या टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. १९३६ ते १९३७ एक वर्षात पाचवी ते सातवी इयत्तांच्या इंग्रजीचा अभ्यास पूर्ण केला.
 
 
त्याचवर्षी सहावीची हायस्कूल स्कॉलरशिप मिळाली. १९३६ ते १९४१ एप्रिलपर्यंत शिष्यवृत्ती मिळत होती. ती पूरत नव्हती म्हणून शिकवण्या केल्या. याच काळात नोव्हेंबर १९३५ साली कर्‍हाडला शाखा सुरू झाली. माझा संघ प्रवेश १९३६ झाली झाला. सातारचे स्वयंसेवक रामभाऊ पवार हे कर्‍हाडला न्यायालयात बेलीप म्हणून काम करत होते. त्यांचा माझा खानावळीत जेवताना परिचय झाला. त्यातून संघ प्रवेश झाला. १९३८ ते १९४१ अशी तीन वर्षे कर्‍हाडचा बौद्धिक प्रमुख होतो. त्या काळात प्रत्येक आठवड्यात तालुक्यातील एका गावाला १५ ते २० किमी सायकलवरून संघकार्यासाठी जात.” तेवढ्यात काकचिंग छात्रावासाची भोजनाची वेळ झाली. म्हणून गप्पा थांबवल्या.
 
 
 
अप्पांना भात मऊ लागायचा. मुलांना फडफडीत लागायचा. त्यामुळे अप्पा भात मऊ करून घेत व जेवत. आश्रमातील नागा जनजातीच्या मुलांना पोळी आवडायची नाही. त्यांना पोषक आहार खाणे आवश्यक होते. म्हणून रविवारी एक पोळी खायला द्यायचे. तिन्ही त्रिकाळ भातच भात खाणे मुलांना आवडायचे. अप्पा पोळी, भाजी, वरण, भात, बनवत व खात. आठवड्यातून एकदा मुलांना पोळी खायला लावायचे.
 
 
अप्पांना विचारले, “आता किती वाजता झोपायचे?” तर अप्पा रात्री ९:३० वाजता झोपायचे. कारण, रात्री लाईट डीम असायचे. त्यामुळे अप्पा पहाटे ३ ला उठून टेलिग्राफ इंग्लिश पेपर वाचायचे. सकाळी अप्पा ४:३० वाजता मुलांना उठवायचे. प्रात:स्मरण करून मग मुलांना अभ्यासाला बसवत. अप्पा थोडे थोडे मणिपुरी शिकले होते. मुलांशी बोलायचे. मुलांना अप्पांचे कौतुक वाटायचे. अप्पा स्वतःचे काम स्वत: करायचे. दाताला कडक चावणे जमत नसल्याने स्वयंपाक ते स्वत: बनवायचे.
 
 
आज भगवान सूर्यनारायणाचे दर्शन झाले, नाहीतर बरेच दिवस. धुके होते. आम्ही उन्हात बसलो. मणिपूरला थंडीच्या दिवसात उन्हात बसणे म्हणजे खूप आनंद वाटायचा. आमच्या गप्पा सुरु झाल्या. अप्पा पुनश्च १९३६ सालात आले, बोलू लागले, “याचदरम्यान प. पू. डॉक्टर हेडगेवारांचा महाराष्ट्रात प्रवास होता. कर्‍हाडला बौद्धिक वर्ग ऐकण्याचे भाग्य मला मिळाले. हे माझे अहोभाग्यच होते. याकाळी महाराष्ट्रात पहिला ओटीसी वर्ग १९३५च्या मे महिन्यात झाला होता. पहिली शाखा सांगलीला झाली. पूजनीय डॉक्टरांनी गोपाळराव यळकुंठवार यांना प्रचारक म्हणून पाठविले. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता आला की, बैठक रात्री १० वाजता होत असे. पू. डॉक्टरांच्या बैठकीला मीही उपस्थित होतो.
 
 
 
१९४१ साली मॅट्रिक पास झाल्यानंतर मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याकाळी मंडलाचा बौद्धिक प्रमुख म्हणून काम केले. एक दिवस कोथरुडला शाखेसाठी जात होतो. आता एक नवीन समस्या समोर आली. मोठे बंधु १९४२च्या काँग्रेस चळवळीत तुरूंगात गेले. मला कॉलेज सोडून नोकरी करणे भाग पडले. १९४५ साली मोठे बंधू सुटून आले. मी परत १९४५ला एसपी कॉलेजला प्रवेश घेतला. कॉलेज सकाळी व दुपारी नोकरी चालू ठेवावी लागली. १९४३ साली माझे संघाचे शिक्षण पूर्ण झाले. १९४७ साली बीए पास झाल्यावर कुलाबा आताचा रायगड जिल्ह्यात संघ प्रचारक म्हणून गेलो. १९४८च्या सुरुवातीला महात्मा गांधींची हत्या झाली. त्या संधीचा फायदा घेऊन सरकारने संघावर बंदी आणली. मला पेणमधून पकडून तीन महिने ठाण्याच्या कारावासात टाकले.
 
 
 
परिस्थितीचे गांभीर्य बघून प्रचारकांना शक्य असेल तर घरी जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी पुण्यात आलो. त्याचवेळी पुण्यात दै. ‘भारत’ हे वृत्तपत्र सुरू करण्याचे ठरले. माझी प्रथम बातमीदार व नंतर संपादक विभागात नेमणूक झाली, पण सहा महिन्यांच्या आतच संघाने सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. प्रचारकांना पुनश्च आपल्या कार्यक्षेत्रात जाण्यास सांगितले. मी कुलाबा जिल्ह्यामध्ये परत गेलो. भूमिगत राहून कार्याची माहिती देणारी पत्रके व बुलेटीनचे काम माझ्याकडे देण्यात आले. संघबंदी उठेपर्यंत कुलाबा जिल्ह्यात भूमिगत राहून कार्य करीत राहिलो. भूमिगत राहून व जंगलात राहून कार्य करावे लागल्याने मलेरिया झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने मला नाशिक जिल्ह्यातील येवले व चांदवडचे दायित्व देण्यात आले. मी अविवाहित परंतू बंधूंंना मुले-बाळे होती. त्यांची आर्थिक कुचंबणा होऊ लागली. या परिस्थितीमुळे मला प्रचारक म्हणून थांबावे लागले. १९४७ ते १९५२ अशी पाच वर्षे मी प्रचारक राहिलो.
 
 
 
१९५२ ते १९५३ कर्जत जिल्हा रायगड येथील अभिनव ज्ञानमंदिर येथील शाळेत एक वर्ष शिक्षक म्हणून काम केले, पण काही कारणाने मला ती नोकरी सोडावी लागली. मी नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे नोकरीला गेलो. दोन-चार महिन्यांत शाळेने मला संघाशी संबंध ठेवण्यास मनाई केली. त्यावेळी माझे सोबती हेम़ंत सोमण बरोबर होते व गोव्यात पणजीला शिक्षक म्हणून काम केले. मी मात्र कोपरगावला नोकरी न करता दोन-चार वर्षे क्लासेस चालवले. राजाभाऊ झरकर आणि माणिकराव पाटील यांच्या सल्ल्यानुसार मी कोपरगाव सोडून नगरला १९५६ साली क्लासेस सुरु केले. १९५६ ते १९८८ पर्यंत ३२ वर्षे इंग्लिश शिकवायचे, क्लास चालवले,” अप्पा सांगत होते. महत्त्वाचे म्हणजे, अप्पांच्या क्लासेसचे शुल्क खूप कमी, तरी अप्पा नियमाप्रमाणे चालणारे ‘इन्कमटॅक्स’ भरायचे. जे पैसे देऊ शकत नाही, त्यांना त्यांनी मोफत शिकवले.
 
 
पुढे ते म्हणाले, “नगरच्या ३२ वर्षांच्या वास्तव्यात विविध जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या. प्रथम नगर शाखेची जबाबदारी देण्यात आली. पण क्लासची व्यावसायिक जबाबदारी असल्याने जमेना. त्यामुळे मी मुक्त झालो. प्रथम पाच-सहा महिने समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटून कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात गेले. नंतर कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, कामाची आखणी, विविध कार्यक्रमांची रचना करण्यात गेले. १२ वर्षे हे काम सांभाळले. कार्यकर्त्यांची घडी चांगली बसल्यावर हे काम दुसर्‍यावर सोपवले. याच काळात नगर जिल्ह्यासाठी एक कल्पना सुचली आणि ‘संघयुग’ नावाचे साप्ताहिक सुरू करण्यात आले. त्याचा संपादक म्हणून माझ्याकडे काम सोपविण्यात आले.
 
 
नगरच्या वास्तव्याच्या काळात तीन वर्षांपर्यंत पुण्याच्या एकता मासिकात मी ‘वाटचाल पारतंत्र्याकडून वैभवाकडे’ या नावाची लेखमाला ’शेषाद्री’या टोपण नावाने लिहिली. हे लेख तीन वर्षांपर्यंत येत होते. अटल बिहारी वाजपेयी व जगन्नाथ जोशींच्या एकसष्ठी निमित्त विशेषांकाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती.” अप्पा सांगत होते आणि मी ऐकत होतो. नंतर, १९७५ साली आणीबाणीत ‘मिसा कायद्या’अंतर्गत अप्पा १३ महिने नाशिक जेलमध्ये बंदिवासात होते, असे त्यांनी मला सांगितले.
 
 
 
अप्पा ब्रह्मचारी परंतु घरातील स्थिती ठीक नव्हती. भावाच्या प्रपंचाला मदत म्हणून क्लास चालवले, नाहीतर प्रचारक म्हणूनच राहिले असते, पण आवश्यक ती नैतिक जबाबदारी पूर्ण झाल्यावर क्लास बंद केले व पुनश्च त्वदीयाय कार्याय बद्धाकटियम...! अप्पा सांगू लागले, “१९८८ साली अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे उतर पूर्वांचलचे क्षेत्र संघटनमंत्री वसंतराव भट नगरला आले होते. त्यांनी उत्तर पूर्वांचलची स्थिती, वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य त्यासाठी तन-मन-धनाची, आवश्यकता आहे, असे सांगितले. युवा, वानप्रस्थी कार्यकर्ते हवे आहेत. भाषण झाल्यावर नगरच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, अप्पा कार्य करायला तयार आहेत. माझ्याशी वसंतराव बोलले. मी त्यांना सांगितले, आपण सांगाल त्याठिकाणी मी यायला तयार आहे.”
 
 
 
दरम्यान, अप्पांनी पूर्णवेळ काम करायला जायचा निर्णय घेतल्यावर नगरमधील सर्व व्यवस्था गुंडाळल्या. आपली जी काही पुंजी होती, ती नातलग, काम करणारे, गरजूंमध्ये वाटून टाकली. अप्पांचे विद्यार्थी म्हणाले, “तुम्ही आता सुदूर मणिपूरमध्ये जाणार आहात, जवळ काहीतरी ठेवा, तब्येत खराब झाली तर पैसे जवळ ठेवा.” अप्पांनी उत्तर दिले, “माझी काळजी घेणारे तेथे आहेत. मी तंदुरुस्त आहे. मला कसलाही आजार होणार नाही. चिंता करू नका...” आणि खरोखरच अप्पांना गंभीर दुखणे, कधीच झाले नाही. आपण त्यांना विचारले की, अप्पा कसे आहात? तर ते म्हणत, एकदम छान. मी १०० वर्षे जगणार आहे.
 
 
 
 
अप्पा सांगत होते, “मला मणिपूर राज्यात काकचिंग छात्रावासामध्ये नियुक्त केले. नागा जनजातीची मुले होती. त्यांना थोडे हिंदी व इंग्रजी येत असल्याने संवाद करता येऊ लागला.” इतक्यात विद्यार्थ्यांनी आवाज दिला, ‘जी भोजन करनेके लिये आईए!’ आमची दोघांची भावसमाधी भंग झाली! अप्पा म्हणाले, “मला स्वत:विषयी बोलायला आवडत नाही. लेखसुद्धा आवश्यकता म्हणून लिहिले.” मी आज हट्ट केला म्हणून त्यांनी मला आत्मनिवेदन केले.
 
 
अप्पांची घरची परिस्थिती गरीब असल्याने काटकसरी होते. शिकवण्या करून त्यातील पाऊण हिस्सा घरी पाठवित व उरलेल्या पैशात स्वतःची उपजीविका चालवत होते. अप्पांनी नैतिक जबाबदारी म्हणून क्लासचा व्यवसाय केला. पुतण्या-पुतणींना पायावर उभे केले. त्यांची लग्न लावून दिली व क्लास बंद केले. अप्पांना आणीबाणीत जेलमध्ये जावे लागले. मोलकरणीला सांगितले, “मी आता तुला पगार देऊ शकणार नाही तेव्हा तू आता कामावर येऊ नकोस.” मोलकरीण अप्पांना म्हणाली, “मी तुमच्याकडे पैशांसाठी काम करत नाही, तुम्ही चिंता करू नका. मी तुमच्या पुतण्या, पुतणीकडे लक्ष देईन...” आणि ती जबाबदारी तिने पार पाडली. भारतात अन्य प्रांतातील कार्यकर्त्यांना मणिपुरी शिकता यावी म्हणून ‘इंग्लिश इन टू मणिपुरी’ असे हस्तलिखित बनविले होते.
 
 
अप्पांचा ज्योतिष या विषयाचा अभ्यास होता. छंद होता. ज्यांना आवश्यक असेल त्यांना पत्रिका बनवून देत. अप्पांनी इंफाळ कार्यालयाची जबाबदारी पण सांभाळली. मणिपूरच्या थोबाल जिल्ह्यातील काकचिंग गावात नागा जनजातीच्या मुलांचे छात्रावास होते. सकाळचे एकात्मता स्तोत्र वाक्य ५० ते ६० वेळा मुलांकडून म्हणवून घेत त्यामुळे उच्चार शुद्ध होत. अप्पा मुलांना ४:३० वा. उठवायचे. तिकडे सूर्योदय लवकर होतो. आश्रमात पुखरी म्हणजे तलाव होता. त्यातून पाणी आणायचे, स्वतःचे काम ते स्वत: करायचे.
 
 
मला मुले म्हणाली, “जी हमारे घरके बुजुर्ग बिडी पिना, शराब पिना इसमे रहते हैं! लेकिन अप्पाजी बिडी पिते नही, शराब पिते नही, हमको सिखाते हैं। अपना काम स्वयम करते हैं। हमको प्रात: ४:३० बजे जगाते हैं, यह देखकर हमको आश्चर्य लगता हैं। हमसे हंसीं मजाक करते हैं!” १४ वर्षे मणिपूरमध्ये राहणे ही साधनाच होती. कारण, अनेक वेळेला बंद कधी ४८ तास, कधी ७२ तास त्यामुळे ठरवलेले, दहशतवादी वातावरण प्रवास, कार्यक्रम रद्द करावे लागत होते. मी अनेक वेळेला याचा अनुभव घेतला. वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्यावर नातेवाईक म्हणाले, आता तुम्ही महाराष्ट्रात जवळपास या.
 
 
अप्पांच्या जीवनातील चौथा टप्पा सुरू झाला. कल्याण आश्रमाच्या योजनेप्रमाणे अप्पांच्या २००१ साली केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीतील सूर्यनिकेतन मोटारांधा येथे कार्यास प्रारंभ झाला. अप्पांचा शिक्षण हा आवडता विषय. ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे छात्रावास हे वनवासी युवकांचे संस्कारयुक्त, भारतमातेची सेवा करणारे, आपला देश, धर्म, परंपरा यांचे रक्षण करणारे, सुशिक्षित नेतृत्व तयार करणारे त्यामुळे प्रत्येक पैलूंवर त्यांचा भर होता. शिस्त, सकाळी लवकर उठणे, व्यायाम, शाखा, अभ्यास याचे पालन झालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे रांधा छात्रावासातील मुलांचा इंग्रजी विषय चांगला व्हावा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.
 
 
शहर आणि ग्रामीण भाग यात फरक आहे. शहरातील मुलांना पालक शिक्षक, सभोवतालचे वातावरण हे अनुकूल असल्याने मुले स्वत: शिकवण्यांना जातात. पण अप्पांना वनवासी मुलांना सुरुवातीला अभ्यासाला बसा. ‘स्पेलिंग’ पाठ करा. अनेक वेळा लिहा. कधी प्रेमाने कधी धाकाने त्यांना बसवून इंग्रजी शिकवणे होते, कसरत होती, पण ती अप्पांनी केली. मुलांनीही त्याला प्रतिसाद दिला. मुलं आपली सरकारी शाळेत शिकायला जातात. शाळेत दरवर्षी शाळा तपासणी अधिकारी दरवर्षी येतात. ते आले त्यांनी मुलांना काही प्रश्न विचारले ज्याची उत्तरे मुलांनी दिली, ती सर्व आश्रमातील मुले होती. त्यांचे अधिकार्‍यांनी अभिनंदन केले व मुलांना विचारले, “तुम्हाला कोण शिकवत तर आम्हाला अप्पाजी शिकवतात,” असे सांगितले. शिक्षक मंडळींनी पण जास्त प्रयत्न करावे व मुलांचा इंग्रजी विषय चांगला करावा, असे आवाहन केले.
 
 
 
श्रद्धेय रामभाऊ गोडबोले रांध्याला देवभूमी म्हणायचे, तेथे अप्पांचा निवास हे सर्वांना प्रेरणादायी होते. वयोमानामुळे वृद्धापकाळामुळे अप्पाजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पुतणी अरुणाताई बदले यांच्याकडे २०११ सालापासून राहू लागले. तेथे शिस्तबद्ध जीवनक्रम त्यांचा होता. अप्पांच्या ९९ वर्षे सात महिन्यांच्या आयुष्यात अप्पा १६ जुलै २०२१ला प्रथमच पुण्याच्या पौड रोडवरील जहांगिर हॉस्पिटलमध्ये घरात पडल्यामुळे मांडीचे हाड मोडल्यामुळे दाखल झाले.
 
 
२१ जुलै २०२१ला पुण्याहून परत कर्जतला गेले. सर्व अंथरुणावरच त्यामुळे मनामध्ये ही सल, आता आपली सेवा दुसर्‍याला करावी लागते. त्यामुळे अनंताच्या यात्रेला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. अशा कर्मयोगी साधकाला १ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११:३५ ला देवाज्ञा झाली. २०२० सालच्या दीपावलीला मुंबईचे प्रचारक व अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्व संघटनमंत्री व पूर्व महामंत्री, वर्तमान रा. स्व. संघाचे कार्यकारिणी सदस्य गुणवंतसिंहजी कोठारी कर्जतला अप्पांना भेटायला गेले होते. त्यांनी आपल्या संवेदना पुढील शब्दांत व्यक्त केल्या.
 
 
प्रिय बंधु सुहासजी,
 
भुजंग लक्ष्मण वेल्हाळ उपाख्य अप्पाजींच्या देहावसनाची दु:खद बातमी कळली. २०२०च्या दीपावलीला मुंबईच्या प्रचारकांबरोबर भेटायला गेलो होतो. जवळ जवळ दीड तास अप्पांशी गप्पा झाल्या. ९९ वर्षांच्या वयातदेखील सिद्धावस्थेत बसून स्मरणशक्ती पहिल्या सारखीच शाबुत होती. सर्वांच्या जिज्ञासेला उत्तर देत होते. नियमित व्यायाम, प्राणायाम, संयमित आहार, मनाची प्रसन्नता आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मणिपूर राज्यातील इंफाळ पासून ४० किमी दूर थोबाल जिल्ह्यातील काकचिंग छात्रावासात १४ वर्षे कार्य केले. ८०व्या वर्षी परत येऊन दादरा नगर हवेलीत राहिले. त्याच्या निरोप समारंभाला इम्फाळला मी उपस्थित होतो, हे माझे सौभाग्य! प्रसिद्धीपराड्गमुख समर्पित जीवन आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे. परमेश्वर आपल्या श्रीचरणावर त्यांना स्थान देवो. परमेश्वर शोकाकुल परिवाराला दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य देवो.
 
शान्ति: शान्ति: शान्ति:
 
 
- सुहास अंबादास पाठक
 
 
(लेखक वनवासी कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र छात्रावास प्रमुख आहेत)
Powered By Sangraha 9.0