दहशतीच्या बळावर श्रद्धा चिरडणे शक्य नाही
नवी दिल्ली : “सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त करणार्या मानसिकतेची जगाला अद्यापि धास्ती आहे. दहशतवादाच्या पायावर जम बसवू पाहण्याचा विचार करणार्या विघातक शक्ती कदाचित क्षणिक वरचढ ठरू शकतील. मात्र, त्यांचे अस्तित्व कदापि कायमस्वरूपी नाही, या शक्ती मानवतेला दीर्घ काळ दडपू शकत नाहीत,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. २० ऑगस्ट रोजी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील सोमनाथ येथे विविध प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथ मंदिर परिसराचा उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे.
“हिंदूंची श्रद्धास्थाने असलेल्या मंदिरांच्या इतिहासावर नजर टाकताना मंदिरांचा वारंवार विध्वंस आणि प्रत्येक विध्वंसानंतर मंदिर जोमाने उभे राहिल्याचे दिसून येते. सत्याचा पराभव करता येऊ शकत नाही आणि दहशतीच्या बळावर श्रद्धा चिरडता येत नाही याचे हे प्रतीक आहे. काही हल्लेखोर सोमनाथ उद्ध्वस्त करत असतानाही त्याची प्रचिती वारंवार आली होती. त्याचप्रमाणे आजच्या काळात अशा मानसिकतेची जगाला धास्ती असतानाही त्याची प्रचिती येत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी आणि नूतनीकरण हे शतकापासूनची इच्छाशक्ती आणि वैचारिक अखंडतेमुळे शक्य झाले,” असे पंतप्रधानांनी सांगितले. “राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल आणि के. एम. मुन्शी यांच्यासारख्या महान व्यक्तींना स्वातंत्र्यानंतरही या अभियानासाठी आव्हानांना तोंड द्यावे लागले. अखेर 1950मध्ये आधुनिक भारताचा दिव्य स्तंभ म्हणून सोमनाथ मंदिर उभारले गेले. कठीण समस्यांवर सलोख्याने तोडगा काढण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असून, राम मंदिराच्या रूपाने आधुनिक भारताच्या वैभवाचा झळाळता स्तंभ आकारास येत आहे,” असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.