मुंबई : १९७१मध्ये झालेल्या ऐतिहासिक भूजच्या भारत पाकिस्तान युद्धावर आधारित 'भूज - दि प्राईड ऑफ इंडिया' हा चित्रपट नुकताच 'डिस्ने प्लस हॉटस्टार' या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने अजय देवगणने एका मुलाखतीत म्हंटले की, "भारताचा खरा इतिहास समोर येणे खूप गरजेचे आहे. कारण मुघल आणि इंग्रजांकडून हा इतिहास दडपण्यात आला होता आणि आताच्या पिढीला हे माहिती असणे गरजेचे आहे की देश कोणाच्या बलिदानावर उभा आहे."
याआधी मागील वर्षी त्याने 'तान्हाजी' हा चित्रपट घेऊन येत शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे एक पान उलगडले होते. तर आता भूज्वरील भारत पाकमध्ये झालेल्या युद्धाचे पान उलगडले आहे. "इतकी वर्षं इंग्रज होते त्यांनी इतिहास दडपला. लोकांना कळले असते की इतक्या लोकांनी बलिदान दिले आहे तर लोकांनी बंड पुकारले असते. त्यांच्याआधी मुघलांचा प्रभाव होता. मुघलांच्या आधी आपल्या राजांनी जे केले ते सुद्धा दडपले."
"आमच्या काळात 'तान्हाजी'वर फक्त अर्ध पान लिहिलं गेलं होते आणि आजच्या पिढीला तानाजीबद्दल माहिती नाही कारण ती पुस्तकांमध्ये अधिक उपलब्ध नाही. मला वाटतं आपण त्याबद्दल बोलायला हवे. कारण जेव्हा देशाचा विचार केला जातो, लोक जेव्हा बदलतील तेव्हाच देश बदलेल. या पिढीला हे माहिती नाही की किती लोकांच्या कठोर परिश्रमाने आणि निःस्वार्थ बलिदानामुळे हा देश उभा राहू शकला. किती कष्टाने स्वातंत्र्य मिळाले आहे? हे जेव्हा कळेल, तेव्हाच त्याला महत्त्व दिले जाईल."