काकांनी म्हटले की, अजित पवार १२ आमदारांबद्दल विचारत नाहीत, काय सांगू? मुद्दा असा की, या काकांनी माझा ‘टीआरपी’ चोरला आहे. माझ्यापेक्षा ते जास्त भाव खाऊन जातात. मी गेलो होतो ना पूरपरिस्थिती पाहायला? पण नाही तेसुद्धा गेले तिथे. लोकांनी मला काय काय बोलून भंडावून सोडले. पण त्यांना काही कोणी बोलले नाही. हा भेदभाव का? कधी कधी वाटते की, मला निंदा सहन करण्यासाठी या पदावर बसवले की काय? काही सांगू शकत नाही. दररोज नवे काहीतरी असते. समस्यांचा फोटो काढून समस्या सुटल्या असत्या, तर किती बरे झाले असते. मी दिवसाला कितीतरी समस्यांचे फोटो काढले असते आणि समस्या सुटल्या असत्या. पण नाही खूप कठीण आहे. त्यामुळे पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागू शकतो. १२ आमदारांबद्दल अजित पवारांनी विचारावे, असे त्यांना का वाटले असेल? बापरे! ते असे म्हटले की, मला सारखे ते ‘पुन्हा येईन पुन्हा येईन’ आठवते. ते काही माझा पिच्छा सोडत नाही. काहीही म्हणा, देवेंद्र फडणवीस नशिबवान. त्यांना चांगली साथ देणारे काळ्या टोपीवाले काका आहेत. मी कुणाला विश्वासाने काका म्हणू? काही समजत नाही. मॅडम आणि बारामतीचे काका १२ आमदारांबद्दल विचारत नाहीत, असेही ते म्हणू शकत होते. पण नाव घेतले अजित पवारांचे. राजभवनाचे नाव घेतले ना की, खूप काही दाटून येते. पहिल्यांदा त्यांना पाहिले, तर वाटले साधे सरळ आहेत. पण काका तर वेताच्या छडीसारखे आहेत. त्यांचे नाव घ्यायलाही भीती वाटते. हे असे धडधड चालत गड चालले. मला तर विठोबाच्या मंदिरात गाडी चालवताना पण धडधडत होते. तरी बरे मी खूप खूप काम करतो. काय म्हणता? मी सत्तेत आल्यापासून स्थगिती आणि ‘लॉकडाऊन’ हेच करत आलोय. काहीतरी करतोय ना? निष्क्रिय तर नाही ना? गप्प बसा नाही तर पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागू शकेल.
विकृत विचारांचे गुलाम डावे!
हे स्वातंत्र्य खोटे, ब्राह्मणांनी बळकावली सत्ता, बहुजन अजूनही गुलाम, असा ‘ट्रेंड ट्विटर’वर डाव्या विचारांच्या लोकांनी चालवला आहे. खरे तर डाव्यांनी ट्विटरवर हे विधान टाकून हा समस्त भारतीयांचा, भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या त्या शूरवीरांचा अपमान केला आहे. डाव्यांनी हे स्वातंत्र्य खोटे म्हटले आहे, मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली ती काय गुलाम भारतासाठी लिहिलेली का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्ता व स्वातंत्र्यप्रियतेचासुद्धा डाव्यांनी अपमान केला आहे. मुळात स्वातंत्र्य नसते तर देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यावर्षीच डावे इतक्या मूर्ख नीडरतेने देशाच्या स्वातंत्र्याला खोटे ठरवू शकले असते का? ज्या पद्धतीने डावे देशाच्या प्रत्येक ऐतिहासिक क्षणांचे आणि सामर्थ्याचे विद्रुपीकरण करतात. ते पाहिले की वाटते, या सगळ्या डाव्यांची बुद्धीच अनर्थ विचारांची गुलाम झाली आहे. काय तर म्हणे १५ टक्के ब्राह्मण सत्तेत आहेत. डाव्यांनी जातपातच काढली आहे, तर या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे तर जन्माने तथाकथित ब्राह्मण घरात जन्मले नाहीत. पण म्हणून ते काय कर्तृत्ववान नाहीत? मग १५ टक्के ब्राह्मण राज करतात, हे कसे काय? आता डाव्यांकडे याचेही एक उत्तर ठरलेले असते की, हे दोघे बहुजन समाजाचे असले तरी ज्या सत्ताविचारात ते आहेत, तिथे ब्राह्मण राज करतात. पण मग प्रश्न असा आहे की, ब्राह्मण असणे काय गुन्हा आहे का? ती काय माणसं नाहीत का? भारतात डाव्या विचारसरणीचे नेतृत्व करणारे कोण आहेत? याचेही चिंतन डाव्यांनी करायला हवे. दुसरे असे की, बहुजन गुलाम आहेत असे डावे म्हणतात, तर २०१९साली केंद्रात भाजप पर्यायाने नरेंद्र मोदींना भरघोस मतदान करणारे मतदार काय भारताबाहेरचे होते का? भारतातल्या सर्वच समाजगटांनी मोदींना जिंकून दिले होते. मग ही आझादी, हे स्वातंत्र्य, खोटे कसले? खरेतर डावेच खोटे आणि विकृत विचारांचे गुलाम आहेत !