‘केरळ मॉडेल’मुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2021
Total Views |
pv_1  H x W: 0


पिनारायी विजयन सरकारचे अपयश ठळक
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : करोना व्यवस्थापनाचा आदर्श नमुना म्हणून गाजविण्यात आलेल्या ‘केरळ मॉडेल’चा फोलपणा आता उघड होऊ लागला आहे. देशात गेल्या २४ तासात करोनाचे ४३ हजार ६५४ नवे रुग्ण आढळले, त्यापैकी तब्बल २२ हजार १२९ म्हणजेच ५० टक्क्यांहून अधिक रूग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. त्यामुळे देशात तिसऱ्या लाटेची सुरूवात केरळमधून होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
करोना व्यवस्थापनामध्ये केरळ राज्याने अभुतपूर्व कामगिरी केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, केरळमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये होणारी भयावह रूग्णवाढ पाहता कथित केरळ मॉडेल हा पूर्णपणे फोलपणा असल्याचे उघडकीस येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात करोनाचे ४३ हजार ६५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे २२ हजार १२९ रूग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. गेल्या ५१ दिवसात प्रथमच एखाद्या राज्यात २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता त्याची सुरूवात केरळमधून होण्याची शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
धक्कादायक म्हणजे राज्यात एका दिवसात १५६ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आतापर्यंत केरळमध्ये १६ हजार ३२६ रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ११६५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या केरळमध्ये १ लाख ४५ हजार ३१७ सक्रिय करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये २ हजारांहून अधिक करोना रूग्ण आढळले आहेत. सर्वाधिक ४ हजार ०३७ रूग्ण मलप्पुरम येथे, थ्रिसूर मध्ये २ हजार ६२३, कोझिकोडे २ हजार ३९७, एर्नाकुलममध्ये २ हजार ३५२ आणि पलक्कड जिल्ह्यात २ हजार ११५ रूग्ण आहेत.
 
 
केरळमध्ये सातत्याने रूग्णवाढ होत असतानाही डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी बकरी ईद साजरी करण्यासाठी राज्यात तीन दिवसांसाठी करोनाविषयक निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यास निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असता राज्यातील व्यापाऱ्यांच्या दबावाखाली येऊन सूट दिल्याचे केरळ सरकारने न्यायालयास सांगितले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील तीव्र नाराजी व्यक्त करून केरळ सरकारला झापले होते.
 
 
 
 
ya_1  H x W: 0
 
उत्तर प्रदेशात २४ तासात केवळ १८ रूग्ण
 
 
करोना व्यवस्थापनासाठी केरळचे कौतुक करताना उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करण्यात येत होते. मात्र, उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांमध्ये केवळ १८ नवे करोना रूग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात सध्या ७९८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत ६ कोटी ४५ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उ.प्र. प्रशासनाने चाचण्या, उपचार आणि लसीकरणासाठी आक्रमक धोरण अवलंबविल्यानेच उत्तर प्रदेशात करोना संसर्ग नियंत्रणात आला आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@