रत्नागिरी जिल्ह्यात दोन गावात अनेक कुटुंबे ढिगार्याखाली
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार बरसणार्या पावसामुळे राज्यभरातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असतानाच शुक्रवार, दि. २३ जुलै रोजी विविध ठिकाणी दरडी कोसळल्याने मृत्यूतांडव घडले. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे ९० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले असून या तिन्ही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते. या घटनेची दखल राज्य सरकारने घेतली असून अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.
चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे १७ जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये १७ घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंबे अडकली असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमई इथे दरड कोसळून दोन जण दगावले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. सुतारवाडी परिसरात दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील सुतारवाडी परिसरात दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर नौदलाचे जवान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजर झाले आहेत. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील लोकांच्या मदतीसाठी नौदलाच्या सात टीम रवाना झाल्या आहेत. सातार्यामध्ये १४ बळी
सातार्यातही मिरगाव, पाटण, आंबेघर, कोंडावळे याभागात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेनंतर मिरगाव, पाटण येथे ‘एनडीआरएफ’च्या टीमने २२१ जणांना सुखरूप बाहेर काढले. जणांची सुटका केली आहे. यात ७२ पुरुष, १२१ महिला आणि २८ मुलांचा समावेश होता. रात्री उशिरा पाटण तालुक्यातील मिरगाव येथून मातीच्या ढिगार्याखालून दोघांना जीवंत बाहेर काढण्यात ’रेस्क्यू टिम’ला यश, तर एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. मात्र, पुन्हा सुरु झालेला पाऊस आणि दुर्गमतेमुळे शोधमोहीम थांबण्यात आली. दूधसागर रेल्वे मार्गावर दरड कोसळली
महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. दुसरीकडे दूधसागर रेल्वेमार्गावरही दरड कोसळली आहे. रेल्वेरुळावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती वाहून आल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरड कोसळून अडथळा निर्माण झाल्यामुळे दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने या मार्गावरुन जाणार्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. वास्को रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला जाणार्या गाड्यांचा मार्ग मडगाव रेल्वे स्थानकावरुन कोकण रेल्वे मार्गाने वळवण्यात आला आहे. रेल्वेरुळाच्या दोन्ही बाजूंनी दरड कोसल्यामुळे रूळ पूर्णतः चिखलात गेले होते. उशिरापर्यंत रुळावरील चिखल हटविण्याचे आणि रेल्वेसेवा पूर्ववत करण्याचे काम सुरु होते.
रायगडमधील तळईत ३८ जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील तळई (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झाले. महाडच्या तळई येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ लोकांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत संपूर्ण गावाचे भूस्खलन होऊन मातीच्या ढिगार्याखाली अडकले. गुरुवारपर्यंत डोंगराच्या कुशीत असलेले हे गाव अवघ्या २४ तासांत मातीचा ढिगारा बनून गेले. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दरड कोसळल्यामुळे या गावातील ३५ घरे मातीखाली गेली. जवळपास ८० ते ९० नागरिक या गावात वास्तव्यास असल्याची माहिती होती. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत दु:ख वाटले. मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना. जखमी व्यक्ती लवकर बर्या व्हाव्यात, ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान