मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढवेल, याचा पुनरूच्चार केला.बुधवार, दि. २१ जुलै रोजी मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “या निवडणुका स्वबळावर लढण्याचे आमचे ठरले आहे. त्याची तयारीही आम्ही सुरू केली आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे पालन सर्वांनाच करावे लागते. त्यामुळे सगळे नेते त्यासाठी तयार आहेत. राज्यात काँग्रेसला स्वबळावर लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,“ अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, “राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. यामध्ये याविषयावर चर्चा झालीअसून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर भाजपला लढा देऊ शकते, हा आम्हाला विश्वास आहे,” असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.