मुंबई: कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड न्यायालयीन कचाट्यात सापडल्यामुळे राज्य सरकार पुन्हा मेट्रो कारशेडसाठी नवीन जागेच्या शोधात आहे. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. कारशेडच्या वादात महाविकास आघाडीची कोंडी झाल्याचे चित्र सध्या दिसते आहे. यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबई मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रतिष्ठेचा न बनवता राज्य सरकारने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा. कारशेडच्या मुद्द्यावरून हा प्रकल्प लंबतेय. असणारे कर्ज, कर्जाचा हप्ता, सगळं व्याज वगैरे बघितलं तर या सर्वाचा बोजा प्रकल्प उशिरामुळे पडणार आहे. पर्यायाने त्याचा अतिरिक्त भुर्दंड मुंबईकरांवर पडणार आहे. मुंबईकरांवर हाअतिरिक्त भुर्दंड पडू नये, याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे!,अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही सरकारवर निशाणा साधत म्हंटले आहे की, फडणवीस सरकारने अभ्यासपूर्ण विचाराअंती आरे कॉलनीतील मेट्रो कार शेडची जागा निश्चित केली होती. वैयक्तिक द्वेषापायी अविचाराने ती रद्द करून महा विकास आघाडी सरकारने मेट्रो प्रकल्पाचा बट्ट्याबोळ केला आहे. आता निर्णय अंगाशी आल्यावर पर्यायी जागेसाठी निरर्थक धावपळ सुरू आहे, असा टोला भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.