मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वाढत्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील गिधाडांच्या अधिवासाला बसला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून श्रीवर्धन वन विभाग कार्यालय परिसरात बचाव केलेल्या सहा गिधाडांना ठेवण्यात आले असून या आठवड्यात गिधाडांच्या दोन पिल्लांना वाचवण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर श्रीवर्धन येथे गिधाडांसाठी रेस्क्यू सेंटर तयार करण्याची मागणी होत आहे.
सद्यपरिस्थितीत कोकणामध्ये गिधाडांची मोठी संख्या रायगड जिल्ह्यात दिसून येते. जिल्ह्यातील म्हासाळा आणि श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांचा अधिवास आहे. याठिकाणी प्रामुख्याने पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. शिवाय स्थलांतर करुन येणाऱ्या हिमालयीन ग्रिफाॅन, युरेशियन ग्रिफाॅन आणि काळ्या गिधाडांची नोंद आहे. गेल्यावर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील गिधाड अधिवासाला धक्का बसला. मात्र, ही परिस्थिती आता पूर्ववत झाली असली तरी चक्रीवादळानंतर गिधाडांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत वाढलेल्या पावसाचा फटका खास करुन घरट्यामधील पिल्लांना बसत आहे. श्रीवर्धनमध्ये घरट्याबाहेर पडलेली गिधाडांची पिल्ले आढळून येत आहेत.
गेल्या आठवड्यात श्रीवर्धन येथील वसंत यादव यांच्या खोतांच्या वाडीतील नारळाच्या बागेत एक गिधाडांचे पिल्लू पडलेले आढळले. गणेश कुडगावकर आणि सिस्केप संस्थेच्या पूजा पुजारी यांनी त्या पिल्लांला वाचवले. त्यानंतर मंगळवारी श्रीवर्धनमधीलच भट्टीचा माळ येथे गिधाडाचे पिल्लू पडल्याची माहिती श्रीवर्धन वनक्षेत्रपाल मिलिंद राऊत यांनी सिस्केप संस्थेच्या प्रेमसागर मेस्त्री यांना दिली. स्थानिक सिस्केप सदस्य गणेश यांनी त्वरित पिल्लाला रेस्क्यू केले. रेस्क्यू केलेली सर्व गिधाडे ही पांढऱ्या पाठीची भारतीय गिधाडं आहेत. त्यांना एका छोट्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून सिस्केप संस्थेच्या माध्यमातून त्यांचे पालनपोषण सुरू आहे.
या एका पिल्लास रोज एक वेळा ३०० ते ४०० ग्राम मटण खाद्यापोटी द्यावे लागते. शिवाय या पक्षांच्या पंखाचा विस्तार ६-७ फूट असल्याने यांच्यासाठी किमान २० फूट वर्ग क्षेत्रफळं इतके मोठे पिंजरे आवश्यक असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मानद वन्यजीव रक्षक प्रेमसागार मेस्त्री यांनी सांगितले. त्यामुळे श्रीवर्धन येथे एक सुसज्ज रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.