स्वराज्याचे चलन

    22-Jun-2021
Total Views |


shivaji mahraj_1 &nb




आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. तिथीनुसार या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर संपन्न झाला. तेव्हा या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्याच्या चलनाची ही कहाणी...


छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा ही काही वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन ३५० वर्षांआधी घडवलेला इतिहास आजही आम्हाला प्रेरणादायी आहे. जनतेचे राज्य ‘स्वराज्य’ स्थापण्याचं मनात असलेलं स्वप्न सत्य करण्याच्या मार्गाने महाराजांची सुरु झालेली घोडदौड थांबणे शक्य नाही, हे विरोधी शक्ती ओळखून होत्या. विजयनगर राज्यानंतर तब्बल १०० वर्षांनी एक हिंदू साम्राज्य, रयतेचे राज्य रुप घेऊ लागले होते. या जुलमी सत्ताधार्‍यांच्या त्रासाने लोक त्रस्त झाले होते. शिवाजी महारांच्या रुपात लोकांना रक्षणकर्ता लाभला होता. ‘दार उघड बये दार उघड’ असे म्हणणार्‍या संत-महात्मांची आर्त हाक देवांनी ऐकली होती. स्वराज्य निर्मितीचे कार्य हळूहळू भव्य होऊ लागले होते आणि दि. जून, १६७४ रोजी हे स्वप्न सत्यात उतरले. शेकडो वर्षांचे या भूमीला लागलेले ग्रहण सुटले. स्वराज्याला अभिषिक्त राजा मिळाला, या पृथ्वीवर एक ‘मराठा’ राजा ‘छत्रपती’ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जून, १६७४ रोजी मोठ्या थाटात पार पडला, याच वेळी महाराजांनी ‘शिवराज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरु केली. ‘ये पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा एवढा मर्‍हाटा पातशाहा छत्रपति जाहला’ ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, असे कृष्णाजी अनंत सभासद स्वाभिमानानी त्याच्या बखरीत लिहितो. यांचे वरील वर्णन महाराजांच्या देदीप्यमान, अतुलनीय अशा राज्याभिषेक सोहळ्याची यथोचित माहिती देते.

स्वराज्य निर्माण होत असताना याच प्रवासात आणखी एक गोष्ट रुप घेऊ लागली होती आणि ते म्हणजे स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे स्वचलन! महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे सुरू केलेले स्वचलन ही काही साधारण घटना नव्हती. एकछत्री अंमलाप्रमाणे दिल्लीचा राजा हा एकच राजा मानला जात होता. पण, अशा परिस्थितीत एक मराठा राजा छत्रपती झाला होता, ज्याप्रमाणे महाराजांची प्रत्येक कृती अद्भुत व असामान्य होती, तद्वत त्यांनी मुघल वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारून देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची नाणी ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती. आता महाराज नाण्यांस्वरूपात प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार होते, आता स्वराज्याला आपले प्रतिनिधित्व करणारे चलन लाभले होते! राज्याभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती, त्यातील १९ वे महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र, महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली, तसेच दि. २७ मे १६७४ ला हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेल्या पत्रात असे म्हणतो, "and especially against that wherein it inserted that Bombay money shall go current in the Rajas (शिवाजी महाराज) dominions, which will never be granted for after his coronation he intends to setup a mint, and proposes to himself great advantage thereby.'' यावरून महाराजांचा दूरदृष्टिकोन पुन्हा आपल्या नजरेस पडतो. आणि महाराज स्वतःचीच टांकसाळ काढून स्वतःचेच नाणे चालवणार असल्याने आपल्याला परवानगी मिळणार नाही, असे हेन्री ऑक्झिंडेन पत्रात सांगतो.

चलनाची सुरुवात किंवा चलनात झालेला बदल हा अचानक रूप घेत नाही, त्यामागे त्याची पार्श्वभूमी असते. भारतात इस्लामी सत्ता वाढत असतानाच १४व्या शतकात विजयनगर साम्राज्याचा पाया रचला गेला. विजयनगर साम्राज्य हे हिंदू साम्राज्य म्हणून पुढे येऊ लागले. त्याकाळी भारतात यादवांनंतर हे पहिलेच हिंदू साम्राज्य उदयास आले होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस इस्लामिक आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिणेकडील शक्तींनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणून साम्राज्य मोठे झाले. या साम्राज्याच्या नाण्यांनी हिंदू साम्राज्यांच्या नाण्यांची बाजू बळकट केली, अखंड हिंदुस्तानात मुघल सत्ता असूनदेखील विजयनगरच्या नाण्यांना बरी प्रसिद्धी मिळाली, याच विजयनगरीय चलनाचा मोठा प्रभाव हा शिवचलनावर होता. पुढे शिवाजी महाराजांनी सोन्याची नाणी मुघलांच्या परिमाणाची नाणी न पडता, विजयनगरच्या परिमाणाची आणि तांब्याची नाणी निजामांच्या परिमाणावर पाडली आणि हिंदू संस्कृती अखंडित ठेवली. इ. स. १५६५च्या सुमारास सदाशिवराय विजयनगरच्या गादीवर असताना दक्षिणेकडील या हिंदू साम्राज्यास कायमचे ग्रहण लागले आणि विजयनगर राज्य लयास गेले, त्यानंतरच्या या १०० वर्षांच्या कालखंडात दक्षिण भारतात बहामनी राज्यातून निर्माण झालेल्या पाच शाहांचे राज्य होते आणि त्यांचे राज्य असल्याने पर्यायाने त्यांचेच नाणे हे बाजारात वावरत होते. यावेळी उत्तर भारतात एकही हिंदू साम्राज्य अस्तित्वात राहिले नव्हते आणि आता १०० वर्षांनंतर पुन्हा एका हिंदू राजाने सत्तेवर येऊन ‘स्वराज्य’ स्थापले होते.

 

chalan_1  H x W 
 
 

स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे नाणे ‘शिवराई’ स्वराज्याला मिळाले. त्याकाळची परिस्थिती पाहता, मुघलांच्या नाण्यांचा प्रभाव हा फार मोठ्या प्रमाणावर होता आणि पर्यायाने त्यांचीच नाणी सर्वत्र चलनात होती आणि ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’चे पैसेही काही प्रमाणात चलनात होते. अशा वेळी एका नव्या राजाने सुरू केलेले चलन बाजारात टिकेल का? ते मुघलांच्या नाण्यांची बरोबरी करू शकेल का, हे प्रश्न पडले असावेत. पण, पडलेल्या प्रश्नांप्रमाणे काहीही झाले नाही. शिवराई नाणे स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय झाले आणि १६७४ पासून तब्बल १९व्या शतकापर्यंत ‘शिवराई’ नाणे चलनात राहिले. अर्थात, महाराजांनंतर त्यांच्या उत्तराधिकार्‍यांनी अशीच नाणी पाडून चलनात आणली. खरंतर १९व्या शतकात ‘शिवराई’ बंद करण्यासाठी इंग्रजांना फार प्रयत्न करावे लागले असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ ला टांकसाळीत केलेले ‘शिवराई’ हे नाणे तांब्याचे होते. ‘शिवराई’ हे तांब्याचे नाणे शिवाजी महाराजांनी प्रथम पाडल्याचे दिसते. कारण, १६८३च्या एका पत्रात ‘शिवराई’चा उल्लेख आलेला आहे. या नाण्याच्या पुढील बाजूस बिंदूमय वर्तुळामध्ये ‘श्री/राजा/शिव’ असे तीन ओळीत, तर मागील बाजूस ‘छत्र/पती’ असा दोन ओळीत मजकूर असतो. या नाण्यांचा आकार साधारणतः वाटोळा असून अत्यंत सुबक अक्षरात या नाण्यांवर मजकूर असतो. ही नाणी ११-१३ ग्रॅम वजनात आढळतात. या ‘शिवराई’ची त्याकाळात किंमत एक पैसा होती आणि अशा ६४शिवराई’ मिळून एक रुपया होत असे. १६७४ ला पाडलेल्या ‘शिवराई’ आपण सुरुवातीच्या ‘शिवराई’ म्हणून ओळखतो, या ‘शिवराई’ सुरुवातीच्या असल्याचे त्यांच्या जास्त वजनावरुन तसेच त्या नाण्यावर असलेल्या सुबक अक्षरांवरुन आपण मानतो. साधारणतः पूर्ण एक ‘शिवराई’ १२-१३ ग्रॅम वजनाची मानल्यास अर्धी ‘शिवराई’ ही सहा-सात ग्रॅमची असेल आणि पाव ‘शिवराई’ तीन-चार ग्रॅमची. या विविध परिमाणांच्या ‘शिवराईं’चे अक्षर वळण साधारणतः सारखेच असून या वरील लेख ही पुढील बाजूंनी ओळीत ‘श्री /राजा/ शिव’ आणि मागील बाजूंनी ‘छत्र/ पति’ असा असतो.

शिवाजी महाराजांच्या अर्धी आणि पाव ‘शिवराई’ दुर्मीळ आहेत. या ‘शिवराईं’व्यतिरिक्त ‘शिवराई’चे विविध प्रकार आहेत, तसेच ‘शिवराई’वर विविध चिन्हही आढळतात, ते टांकसाळींचे चिन्ह असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. ‘श्री/राजा/शिव’, ‘छत्र/पती’ मजकुराव्यतिरिक्त पुढील बाजूंनी ‘श्री /राजा /शीव’, ‘श्री /राजा /सिव’, ‘श्री /राजा/ सीव’ असलेल्या ‘शिवराई’ही उपलब्ध असून काही ‘शिवराईं’वर मागील बाजूंनी असलेल्या ‘छत्र/पती’मधील ‘ति’या अक्षराचा र्‍हस्व, दीर्घ प्रकार पाहायला मिळतो.शिवराई’ ही १७ ते १९ अशी तीन शतके टिकून राहिली. त्यात योग्य ते बदल होत ती पुढे येत राहिली. शिवकाळानंतरच्या शिवराईत आपल्याला बदल आढळतो.

संभाजी, राजाराम आणि शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांसारखी नाणी पाडली आणि नंतरच्या राज्यकर्त्यांनी ‘दुदाण्डी’ प्रकारातील ‘शिवराई’ चालवली. नंतरच्या या ‘शिवराई’ नाण्यांचे वजनही कमी होते. ही ‘शिवराई’ सरासरी दहा ग्रॅमची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या सोन्याच्या नाण्यास ‘शिवराई होन’ म्हणतात. शिवाजी महाराजांच्या ‘शिवराई होन’ या नाण्यावर बिंदुमय वर्तुळात पुढील बाजूंनी तीन ओळीत ‘श्री/राजा/शिव’ तर मागील बाजूंनी दोन ओळीत ‘छत्र/पति’ असे अंकीत केलेले असून या नाण्याचा आकार वाटोळा असतो. नाण्याचे वजन मासे, गुंजा म्हणजेच . ग्रॅमच्या आसपास आढळते. नाण्याचा व्यास .३२ सेंमी असून त्यात सोन्याचा कस हा ९७.४५ असतो. राजधानी रायगडावरील टांकसाळीत फक्त ‘शिवराई होन’ पाडण्यात येत असून ‘रुका’, ‘तिरुका’, ‘सापिका’ आणि ‘ससगणी’ ही नाणी इतरत्र पाडण्यात येत असल्याचे आप्पा परब त्यांच्या ‘किल्ले रायगड स्थळदर्शन’ या ग्रंथात पृ. क्र. १६४ वर लिहितात.

हा ‘शिवराई होन’ आज फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि या उपलब्ध संख्येवरुन हा ‘होन’ दुर्मीळ का झाला, असा प्रश्न आहे, यावर वेगवेगळी मते आहे. काहींच्या मते, ‘शिवराई होन’ हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता, पण त्याची चोरी होऊन नंतर तो आटवला गेला आणि त्यामुळे आज कमी ‘होन’ उपलब्ध आहेत, तर काही जणांच्या मते मोगली चलनाच्या असलेल्या वर्चस्वामुळे ‘शिवराई होन’ हा जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तशी साक्ष आपल्याला एका पत्रातून मिळतेही आणि त्यामुळे ‘शिवराई होन’ हा अल्प वेळातच दिसेनासा झाला, पण ‘शिवराई’ मात्र टिकून राहिली होती.

काळे यांच्या मते, शिवकाळात सोन्याचा भाव हा १६ रुपये धरल्यास एका ‘होना’ची किंमत ही रुपये, १३ आणे होते, ग. ह. खरेंच्या मते, या ‘होना’ची किंमत आलमगिरी रुपयात रु. आणे. ढब्बू पैसा होते, म्हणजे साधारणतः एका ‘होना’ची किंमत ही शिवकाळात साडेतीन ते चार रुपये होती. एक पुतळीची किंमत पाच रुपये, तर एक मोहोर ही साधारणतः १५ रुपये किमतीची होती, या ‘होनां’बद्दलचे आणखी काही कोष्टक आहेत, त्यात एक ‘होना’चे तीन रुपये, ५६ आणे, २२४ पैसे, ६७२ रुके होत असत. पाच ‘होनां’ची एक मोहोर होत होती, असे दिले आहे. ‘शिवराई होना’चा उल्लेख हा विविध कागदपत्रांत आलेला आहे, या कागदपत्रांतील उल्लेख हे शिवछत्रपतींच्या ‘होना’चे आहेत किंवा नाही, हे खात्रीने सांगता येत नाही. कारण, ‘शिवराई होन’ नावाचे एक सुवर्ण नाणे हे विजयनगरच्या सदाशिवरायांनी पाडले होते. कृष्णाजी अनंत सभासद विचरित सभासद बखरित शिवछत्रपतींच्या मृत्यूसमयी तिजोरीत असलेल्या नाण्यांची संख्या आणि नावे दिलेली आहेत, त्यात ३१ प्रकारची सोण्याची नाणी होती, त्या सुवर्ण नाण्यांची एकूण संख्या ही ६९ लाखांच्या घरात होती आणि त्यात चार लाख ‘शिवराई होन’ असल्याचे सभासद नमूद करतो. आज शिवाजी महाराजांच्या उपलब्ध ‘शिवराई होनां’ची संख्या पाहता हे ‘होन’ शिवछत्रपतींचे नसून सदाशिवरायाचे असावेत, असे वाटते. धनानी दिलेल्या साथीमुळे आणि स्वराज्यरक्षकांच्या मेहनतीमुळे प्रतिपदेची चंद्रकोर आता फक्त कोर राहिली नव्हती, त्याचा लवकरच पूर्ण चंद्र होणार होता, महाराजांचं राज्य आता दक्षिणेपर्यंत पोहोचलेलं होतं, तिकडेही महाराजांच्या नावाने नाणी पडत होती आणि त्या नाण्यांद्वारे प्रत्येक सामान्यापर्यंत महाराज पोहोचत होते!

छत्रपती शिवाजी महाराज एक अतुलनीय व्यक्तिमत्व! किती ते त्यांचे पैलू, किती तो त्यांचा दूरदृष्टिकोन आणि किती तो त्यांचा स्वाभिमान... महाराज समजणं फार कठीण आहे. एक सामान्य माणूस आपल्या जीवनात काय करु शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. प्रत्येक जण महाराजांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्याला महाराज समजले ते चलनातून! एका अशा गोष्टींतून जे मराठ्यांच्या इतिहासातील एक फार कमी हाताळलेले दुर्मीळ सोनेरी पान आहे.


- आशुतोष पाटील