युएईच्या सरकारचे नवे नियम ; आयपीएल २०२१च्या अडचणीत वाढ

02 Jun 2021 18:55:25

BCCI_1  H x W:
 
 
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी बीसीसीआयने उर्वरित ३१ सामने युएईमध्ये होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, नुकतेच युएईच्या सरकारने काही नियम काढले ज्यामुळे बीसीसीआयच्या या आयोजनाला धक्का तर बसणार नाही ना? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. युएई सरकारने जाहीर केलेल्या रेड लिस्टमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, आबुधाबीच्या आरोग्य मंत्रालयाने भारतीयांच्या प्रवेशावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय घेतलेल्या निर्णयामुळे तोंडावर आपटणार की यातूनही सौरव गांगुली आणि बीसीसीआय मार्ग काढणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
 
 
फक्त आयपीएलच नव्हे तर पाकिस्तानची पाकिस्तान सुपर लीगही (पीएसएल) युएईमध्ये आयोजित केली आहे. काही भारतीयदेखील या लीगचे ब्रॉडकास्टर्स आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने खास परवानगी घेऊन भारताच्या ब्रॉडकास्टर्सना व्हिसा मिळवून दिला होता. पण आता ही मालिका कव्हर करणाऱ्या भारतीयांच्या प्रवेशावर युएईच्या सरकारने आता आक्षेप घेतला आहे. अद्य्पही काही भारतीय दुबईत क्वारंटाइन आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय युएईचे सरकार येत्या काही दिवसांमध्ये घेणार आहेत.
 
 
 
जर भारतीयांना परवानगी देण्यात आली तर ही लीग सात जूनपासून सुरु होऊ शकते, पण जर असे होऊ शकले नाही तर त्याचा मोठा फटका पीएसएलला बसू शकतो. तसेच, पुढे आयपीएल २०२१चे उर्वरित ३१ सामने युएईत होणार आहेत. त्यावरही तेथील सरकार काय निर्णय घेते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, युएईने ३० जूनपर्यंत भारतीय प्रवाश्यांवर बंदी आणली आहे. त्यामुळे आता पुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर आयपीएलचे आयोजनासमोरील परिस्थिती अगदीच बिकट होऊ शकते.
 
 
Powered By Sangraha 9.0