ओबीसी आरक्षणासाठी २६ जूनला भाजपचा एल्गार

18 Jun 2021 17:04:08


obc_1  H x W: 0



मुंबई:
खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आधीच ठाकरे सरकारची भाजपने मराठा आरक्षणावरून कोंडी केली असताना त्यात भर म्हणून ओबीसी आरक्षणासाठी एल्गार करत भाजप २६ जूनला आंदोलन करणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबोसी आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी १८ जून रोजी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर भाजपच्या ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलनांची भूमिका जाहीर केली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचे आरक्षण गेले. सरकारने ओबीसींचे राजकारण संपवले. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या २६ जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत, असे मुंडे यांनी सांगितले.



दरम्यान ,माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीबाबत माहिती देताना सांगितले,"केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली."


इम्पिरिकल डेटाचा आणि केंद्राचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने हा विषय हाताळायचा आहे, असे सांगतानाच जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. तसा निर्णयच या बैठकीत घेण्यात आल्याचे मुंडे म्हणाल्या. हा पक्ष आणि राजकारणाचा विषय नाही. २६तारखेला चक्काजाम आंदोलन होणारच, असे सांगत मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या चिंतन बैठकीला जाणार नाही असेही मुंडे म्हणाल्या. येत्या २६ जून रोजी ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. राज्यातील एक हजार स्पॉटवर हे आंदोलन होणार आहे. आरक्षण देणे हे सरकारच्या हातात असताना सरकारमधील नेते मोर्चे का काढत आहेत? असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. या बैठकीला पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, खा.रक्षा खडसे, अतुल सावे, डॉ. संजय कुटे, मनिषाताई चौधरी, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ आणि इतरही सहकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0