बीड : बीड दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा आज १८ जून रोजी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
"आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांची सेवा करत आहोत, मात्र शासनाकडून मनाला वाटेल तेव्हा आम्हाला काढलं जातं आणि पुन्हा कोरोना जास्त पसरला की आम्हाला घेतलं जात आहे. यामुळे आम्ही ज्या पदावर काम करतोय, त्या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्या. ही मागणी घेऊन बीडमध्ये शेकडो महिला आणि पुरुष कर्मचारी आक्रमक झाले आहेत. तर या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांवर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला आहे", असा आरोपही या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, बीडमध्ये आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी कंत्राटी कर्मचारी आले होते. त्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वेळ न देता त्यांच्यावर, इथं लाठीचार्ज करण्यात आला. या अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जची चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर हा लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. त्याचबरोबर बीडमध्ये मराठा समाजाच्या तरुणाला देखील पोलिसांकडून मारहाण झाली आहे, असा आरोप करत हे सरकार मराठा आरक्षणापासून पळपुट धोरण स्वीकारत आहे, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी सरकारवर केली.