मुंबई : गुरुवारी बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी बह्र्तीय संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले आहे. तर, उपकर्णधार म्हणून भुवनेश्वर कुमारची निवड करण्यात आली आहे. अशामध्ये अनेक तरुण चेहरे भारतीय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संघात पदार्पण करण्यास तयारीत आहेत. तर, महाराष्ट्राचे पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली आहे. हा तरुण संघ श्रीलंकेत काय कमाल करतो ? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघामध्ये देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, नितीश राणा आणि कृष्णप्पा गौतम या ६ खेळाडूंची पहिल्यांदाच संघामध्ये निवड करण्यात आली आहे. तसेच, संजू सॅमसन याचे संघात पुनरागमन करण्यात आले आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका १३ जुलैपासून सुरू होणार आहे. यावेळी ३ एकदिवसीय सामने खेळले जातील. तर टी २० मालिका २१ ते २५ जुलै दरम्यान होणार आहे. सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत.