कवल-गंडूष धारण

Total Views |

Ayurvedic_1  H
 
आयुर्वेदात अशाही काही चिकित्सा सांगितल्या आहेत, ज्या रोज आचराव्यात. त्यांचा दिनचर्येत समावेश असावा. असे केल्यास व्याधिक्षमत्व तर वाढतेच, पण शरीराचे कार्यही उत्तमरीत्या अविरत सुरू राहते. या दिनचर्येतील काही उपचार पद्धती म्हणजे-अभ्यंग, अंजन, नस्य, कवल-गंडूष इ. सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला वाफ घेणे, गुळण्या करणे, नाकात औषधी तेलाचे थेंब घालणे इ. ढोबळमानाने माहीत आहे. यातील वाफ व नस्य याबद्दल आधीच्या लेखांतून सांगितले आहे. आजच्या लेखात गुळण्या, याचे शास्त्रीय विवेचन बघूयात.
आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये वैविध्य खूप आहे. केवळ गोळ्या-काढे-चूर्ण घेतली म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सा झाली असे नाही. केवळ मुखाद्वारे चिकित्सा (औषधी चिकित्सा) आयुर्वेदात अपेक्षित नाही. यात पंचकर्म या उपचार पद्धतीचाही समावेश होतो. यात प्रकुपित (वाढलेले) दोष शरीराबाहेर काढण्याचे पाच मुख्य प्रकार आहेत. तसेच याव्यतिरिक्तही अनेक चिकित्सा पद्धती आहेत. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण या पाच उपचारांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त उत्तरबस्ती, विविध पिंडस्वेद, पोट्टली स्वेद इ. तसेच अग्निकर्म, क्षारकर्म इ. चाही उल्लेख शास्त्रात केला आहे. व्याधिनुरूप, त्याच्या जीर्णत्वावर व बळावर चिकित्सा करताना काय-काय करावे, हे वैद्य ठरवितो.
 
 
आयुर्वेदात अशाही काही चिकित्सा सांगितल्या आहेत, ज्या रोज आचराव्यात. त्यांचा दिनचर्येत समावेश असावा. असे केल्यास व्याधिक्षमत्व तर वाढतेच, पण शरीराचे कार्यही उत्तमरीत्या अविरत सुरू राहते. या दिनचर्येतील काही उपचार पद्धती म्हणजे-अभ्यंग, अंजन, नस्य, कवल-गंडूष इ.
सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीला वाफ घेणे, गुळण्या करणे, नाकात औषधी तेलाचे थेंब घालणे इ. ढोबळमानाने माहीत आहे. यातील वाफ व नस्य याबद्दल आधीच्या लेखांतून सांगितले आहे. आजच्या लेखात गुळण्या, याचे शास्त्रीय विवेचन बघूयात.
कवल व गंडूष धारण
 
‘कवल’ हा शब्द ‘वदनी कवल घेता...’ या श्लोकात आपण ऐकला आहे. याचा अर्थ तोंडात घास/अन्नपदार्थ/द्रवपदार्थ घेणे होय. आयुर्वेदात कवल धारण या शब्दाचा अर्थ-तोंडात औषधी काढा/तेल धरणे, तोंडात फिरविणे व गुळण्या करणे असा होतो. कवल धारणासाठी जो औषधी काढा घ्यायचा असतो, तो कोमटपेक्षा थोडा जास्त गरम असावा. (उकळता, चटका बसेल इतका अजिबात नसावा.) हा काढा तोंडात, गालात फिरवायचा. जेवण झाल्यावर जसे चुळा भरतो, त्याच पद्धतीने गालातून फिरवावा. मान मागे उंचावून या काढ्याने गुळण्या कराव्यात. काढ्याचे तापमान थोडे कमी झाले की, ते थुंकून द्यावे व पुन्हा नवीन काढा तोंडात धरून वरील पद्धतीने गालातून फिरवून व गुळण्या कराव्यात, असे रोज सकाळी तीन ते पाच वेळा करावे.
असे केल्याने घशात चिकटलेला कफ, दातांत चिकटलेले अन्नकण, तोंडात व जीभेवर बसलेला राब, मुखदुर्गंधी, हिरड्यांमधील सूज इ. कमी होते. त्याचबरोबर जबड्याची ताकद सुधारते, स्वर सुधारतो, कर्णमधुर होतो. अन्नातील रुची व स्वाद सुधारते. घशातील, तोंडातील कोरडेपणा नाहीसा होतो. दातांची व हिरड्यांची ताकद सुधारते व मुखविवर (Oral Cavity) चे आरोग्य उत्तम राखण्यात मदत होते.
 
 
‘गंडूष धारण’ यामध्ये तोंडात जमेल तेवढे द्रव (औषधी काढा, औषधी तेल इ.) भरून घ्यावे. फुगा फुगविताना जसे गाल फुगविले जातात, तसेच औषधी काढ्याने/तेलाने फुगवावे. जेवढे भरता येईल तेवढे भरावे. तोंड संपूर्ण विस्फारलेले असते व गाल संपूर्ण ताणलेल्या स्थितीत असावेत. दोन ते तीन मिनिटे असे फुगलेल्या अवस्थेत ठेवावे. या ताणामुळे गालाच्या आतल्या भागांतील स्त्राव सुरू होतात. या ताणामुळे नाकातून व डोळ्यातून स्राव येऊ लागतात. हे पाणी काढा, तेल, तूप थुंकावे. पुन्हा वरील पद्धतीने करावे असे तीन ते पाच वेळा करावे.
‘गंडूष धारणा’ने तोंडातील रक्तप्रवाह सुधारतो. अन्नकण, Tartar इ. अडकलेले सुटतात. दातांच्या आरोग्यासाठी उत्तम चेहर्‍याचे पोषण करते. रक्तप्रवाह सुधारल्याने साठलेले अडकलेले ‘टॉक्सिन’ निघून जातात. गाल फुगविणे हे ‘मसल टोनिंग’ सुधारण्यासाठीचा एक उत्तम व्यायाम आहे. तेच फायदे ‘गंडूष धारणा’नेही मिळतात, असे रोज केल्याने चेहर्‍यावरील सुरकुत्या येण्यापासून प्रतिबंध करता येतो व असल्यास त्यांची खोली कमी करण्यास मदत होते. fine lines and wineries कमी होतात. स्त्राव व रक्तप्रवाह सुधारल्याने कोरडेपणा कमी होतो. त्वचा व ओठ नरम मुलायम होतात व लवकर फाटत नाही.
मुख हे पाच हे ज्ञानेन्द्रियांशी ‘कनेक्टेड’ आहे. ठसका लागला की, डोळ्यांतून-नाकातून पाणी येते. नाकात काही तीक्ष्ण गेले की, डोळे पाणावतात. नाकात थेंब घातले की, डोळ्यात थंडावा जाणवतो व घशात थोडे चुरचरते. म्हणजेच नाक-डोळे व घसा हे एकमेकांशी जोडलेले आहेत. कान, नाक व डोळे हे बाह्य जगताशी कायम जोडलेले व उघडे असतात. External Stimulus ला ते तोंड देतात. त्यांचे आरोग्य टिकविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, बाह्य ‘इंफेक्शन्स’ शरीरात शिरण्याची ही तीन महत्त्वाची द्वारे आहेत. या विवरांना ‘आर्द्र’ व ‘स्निग्ध’ ठेवणे गरजेचे आहे. असे असल्यास त्यांचे कार्य उत्तम घडते. तसेच स्निग्ध व आर्द्र असल्यास जंतुसंसर्गाची बाधा पटकन होत नाही. त्यांचे प्रसारण थांबविणे सोपे होते.
आयुर्वेदशास्त्रात ‘गंडूष धारणे’चे विविध प्रकार व त्यानुरूप त्याचे फायदे सांगितले आहेत. पण दैनंदिन जीवनात खोबरेल तेल व तीळ तेल वापरल्यास सामान्य फायदे जरूर मिळतात. दोन्ही तेलं समप्रमाणात घेऊन गरम करावित व कवल-गडूंष धारणासाठी वापरावित. मुखातील आभ्यंतर स्वास्थ तर सुधारते, पण त्याचबरोबर पंचज्ञानेन्द्रियांचं कार्यही सुधारते.
खोबरेल तेलामुळे हिरड्यांमधील सूज कमी होण्यास मदत होते. त्यातील Lauric acid मुळे त्यांचे प्रतिजैविकक्रियाही घडते. तिळाचे तेल उत्तम शोध (सूज) नाशक आहे. त्याचबरोबर ते अ‍ॅन्टिमायक्रोबाईल, अ‍ॅन्टिफंगल, अ‍ॅन्टिफंगल, अ‍ॅन्टिव्हायरल, अ‍ॅन्टिबॅक्टिरियल, अ‍ॅन्टिऑक्सिडंटही आहे. केवळ ‘गंडूष धारणा’ने वरील सर्व फायदे मिळतात, पण याची सवय रोजच्या दैनंदिन कर्मांमध्ये करावी. रोजच्या दिनचर्येत यांचा समावेश करून घेतल्यास वरील सर्व फायदे नक्कीच मिळतात.
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द.