जगमोहन : एक कुशल व कणखर प्रशासक आणि प्रखर देशभक्त

08 May 2021 23:12:33

Jagmohan_1  H x
 
 
माजी केंद्रीय मंत्री आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे ३ मे रोजी वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. काश्मीरच्या राज्यपालपदी असताना तेथील वाढता इस्लामी दहशतवाद, काश्मिरी हिंदूंचे शिरकाण त्याचप्रमाणे दहशतवादविरोधी रणनीती आखण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी काश्मीरविषयी आपले अनुभव ‘माय फ्रोझन ट्रुबुलेन्स इन काश्मीर’ या इंग्रजी ग्रंथात शब्दबद्ध केले होते, ज्याचा मराठी अनुवाद ज्येष्ठ पत्रकार मो. ग. तपस्वी व सुधीर जोगळेकर यांनी ‘काश्मीर : धुमसते बर्फ’ या ‘मोरया प्रकाशन’च्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी वाचकांसमोर ठेवला. या एकूणच प्रक्रियेत ‘मोरया प्रकाशन’च्या दिलीप महाजन यांचा जगमोहन यांच्याशी अनेकदा जवळचा संबंध आला. यानिमित्ताने जगमोहन यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख....
 
 
साहसे श्री प्रतिवसती!
 
 
मध्यरात्री माझा फोन खणाणला... परराष्ट्रमंत्री इंद्रकुमार गुजराल स्वतः फोनवर बोलत होते. गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या बंगल्यावर तातडीच्या बैठकीसाठी यायला त्यांनी सांगितले होतं. तिथं मला गंभीर संकटाची आणि पेचप्रसंगाची सर्व कल्पना देण्यात आली. शक्य तितक्या तातडीने तयार ठेवण्यात आलेल्या खास विमानानं श्रीनगरला जा, असं मला सांगण्यात आलं. इतक्या भन्नाट वेगानं प्रस्थान ठेवलं होतं.
 
 
विमानात कर्मचारी सोडले तर तसा मी एकटाच होतो. याचं दडपण नाही म्हणलं तरी मनावर आलंच होतं. अचानक विमान खाली आलं. हवेची पोकळी लागली होती. सीमा सुरक्षा दलाचं ते लहानसं विमान होतं. त्याला त्या पोकळीचा सामना सहजरीत्या करता आला नव्हता. मी नाही म्हटलं, तरी थोडा हबकलोच होतो. विचारचक्रही हबकले होते. दहशत आणि खळबळ शिगेवर पोहोचलेल्या राज्यात आपण जात आहोत, याची जाणीव झाली.
 
 
१९ जानेवारी, १९९०चा तो दिवस होता. मी, पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरचा राज्यपाल व्हायला निघालो होतो.
 
दिल्ली विमानतळावरून निघताना जम्मू-काश्मीरच्या निवासी आयुक्तांच्या कचेरीतील एका अधिकार्‍याने मला एक फाईल दिली होती. ब्रिफकेसमधून मी ती फाईल काढली. १२ जुलै, १९८९ला मी काश्मीरच्या राज्यपालपदाची पहिली कारकिर्द संपवून परतलो, तेव्हापासून वृत्तपत्रातून काश्मीर विषयक आलेल्या बातम्यांची कात्रणं त्या फाईलमध्ये होती. मी कात्रण चाळू लागलो.
 
६ नोव्हेंबर, १९८९ ‘स्टेट्समन’चा मथळा होता - काश्मीर राष्ट्राच्या हातातून जवळजवळ गेल्यासारखे,
 
‘टाईम्स ऑफ इंडिया’... काश्मीर खोर्‍यात दहशतीचे साम्राज्य...
 
इतर मथळे होते...
 
हरिसिंह स्ट्रीटवर न्यायमूर्ती गंजू यांचा निघृण खून...
 
प्रसिद्ध पत्रकार पी.एन.भट अनंतनाग येथे ठार...
 
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कन्येचे अपहरण.... प्रशासन पूर्णपणे कोसळले...
 
या बातम्या त्या-त्या दिवशी दैनिकांतून मीही वाचल्या होत्या. पण, त्या दिवशी विमानात त्यांचा एकत्र ढीग पाहायला फारच कसनुसं वाटत होतं..
 
मी डोळे मिटून घेतले... मनात विचाराचं थैमान सुरू झालं..
 
....जगमोहन.
 
(‘काश्मीर : धुमसते बर्फ’ या ग्रंथातून)
 
जगमोहन... या नावाचा आणि व्यक्तीचा माझा संबंध येत गेला तो इथपासूनच...
 
१९८८-८९ मध्ये काश्मीर समस्येने पुन्हा उग्ररूप धारण केले होते. अतिरेकी कारवायांना जणू ऊत आला होता. झेलमचे पाणी रक्तरंजित होत होते. केंद्र सरकारने जगमोहनांना पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त करून काश्मीरला पाठवले होते. अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यांनी केलेल्या साहसी व कडक उपाययोजनांना यशही येत होते. काश्मीरमधील चाललेल्या या सर्व घटनाक्रमाबाबत व जगमोहन यांच्या कार्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनप्रबोधन व्हावे, या उद्देशाने एखादी पुस्तिका काढून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी सुधीर जोगळेकरांनी कल्पना मांडली व ती ‘मोरया प्रकाशना’ने अमलात आणायचे ठरवले.(सुधीर जोगळेकर तत्कालीन दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक होते.) केवळ माध्यमातून येणार्‍या बातम्यांवर विसंबून न राहता, डोंबिवलीत राहणारे तरुण व धाडसी पत्रकार उदय तानपाठक यांना ‘आंखो देखा हाल’ जाणून घेण्यासाठी जोगळेकरांनी मुद्दाम काश्मीरला पाठवले होते. मनोज चौधरी नावाच्या उदयोन्मुख; पण अत्यंत कल्पक तरुण चित्रकाराने या पुस्तिकेचे समर्पक मुखपृष्ठ साकारले होते. अशा पूर्ण तयारीनिशी सुधीर जोगळेकरांनी संपादित केलेली ‘झेलमची हाक’ ही पुस्तिका त्यावेळी ‘मोरया’ने प्रकाशित केली. काही समविचारी सहकारी बँकांच्या सहकार्याने ८० पानांच्या पुस्तिकेची किंमत फक्त ५ रुपये ठेवल्याने व्यापक प्रमाणावर वितरण होऊ शकले. अगदी रेल्वे स्थानकावरील पेपर स्टॉलवरूनसुद्धा ‘झेलमची हाक’ लोकांपर्यंत पोहोचवली. १५-२० हजार प्रती हातोहात संपल्या. एक राष्ट्रीय कर्तव्य पार पडल्याचा आनंद वाटला.
 
जगमोहनांनी साहसी व कठोर निर्णय घेत समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत पाकपुरस्कृत अतिरेकी कारवायांना आळा घातला. त्यांचे मनसुबे हाणून पाडले. ढासळलेले प्रशासन सावरत आणले होते. जगमोहनांनी अक्षरशः देशासाठी काश्मीर वाचवले होते. पण, जगमोहनांची ही कार्यपद्धती पाहून पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा तीळपापड झाला. त्या उघडपणे म्हणायच्या, “जगमोहन को...हम कश्मीर से भगायेंगे...
 
उनको भागमोहन बनायेंगे....” त्यांच्या या प्रयत्नांना आपल्या केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाचा जणू पाठिंबा मिळावा, असे घडले आणि आपणच दुसर्‍यांदा काश्मीरमध्ये पाठवलेल्या केंद्र सरकारने अवघ्या पाच महिन्यांत जगमोहनांना परत बोलावले.!!!
 
(२६ मे, १९९०).
 
काश्मीरप्रश्नाबाबत केंद्र सरकारची एकूण उदासीन वृत्ती, धरसोड धोरण, ढोंगी व दुटप्पीपणाचा चीड येणारा अनुभव जगमोहन यांना काश्मीरमध्ये काम करत असताना पदोपदी आला होता. ती त्यांची उद्विग्नता, ती साठलेली, गोठलेली तगमग त्यांच्या ‘माय फ्रोझन ट्रुबुलेन्स इन काश्मीर’ या इंग्रजी ग्रंथाद्वारे त्यांनी देशवासीयांसमोर मांडली.
 
काश्मीर भारताचे आहे व भारतातच राहिले पाहिजे, या तळमळीतून काश्मीरप्रश्नाचा सखोल अभ्यास करून आपल्या कामाच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी साकारलेला या इंग्रजी ग्रंथाची पहिली आवृत्ती १९९१ मध्ये प्रकाशित झाली होती. याच सुमारास दिल्लीत भरणार्‍या ‘वर्ल्ड बुक फेअर’साठी डोंबिवलीहून आम्ही दोघे-तिघे प्रकाशक दिल्लीला निघालो होतो. त्यावेळी सुधीर जोगळेकरांनी मला सुचविले की, “तुम्ही दिल्लीला जाणारच आहात तर जगमोहनांचे ‘माय फ्रोझन ट्रुबुलेन्स इन काश्मीर’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे हक्क मिळवण्यासाठी अवश्य प्रयत्न करा...”
 
 
‘झेलमची हाक’पासून काश्मीर व जगमोहन यांच्याशी भावनिक नातं निर्माण झालेलं होतंच; हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, ही भावनाच त्यामागे होती. त्यामुळे जगमोहनांची भेट या दिल्लीवारीत घ्यायचीच, असा ठाम निर्धार केला होता. “मराठी हक्क मिळतील. पण, अनुवाद कोण करेल?” जोगळेकरांनाच लगेच विचारलं, “तुम्हीच या ग्रंथाचा अनुवाद कराल का?” त्या वेळेसच्या त्यांच्या व्यस्ततेचा एकूण विचार करत त्यांनी असमर्थता व्यक्त केली होती. (पण, कालांतराने अंततः त्यांना या अनुवादात सहभागी व्हावेच लागले. ज्येष्ठ पत्रकार मो. ग. तपस्वी यांच्या निधनानंतर या ग्रंथाच्या अद्ययावत आवृत्तीत समाविष्ट होणार्‍या पुढील प्रकरणांचा अनुवाद जोगळेकरांनीच केला आहे.)
 
 
दिल्लीला गेल्यावर ज्येष्ठ पत्रकार आ. बापूराव लेले यांच्याशी जगमोहन यांची भेट, त्यांच्या पुस्तकांचे मराठी हक्क व अनुवाद याविषयी चर्चा झाली. मराठी अनुवादाचा दांडगा अनुभव गाठीस असलेले दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार मो. ग. तपस्वी यांचे त्यांनी नाव सुचवले. भेटही घालून दिली. तपस्वींनाही जगमोहनांचे पुस्तक मराठीत आणण्याची योजना भावली.
 
 
जगमोहनांना भेटीची वेळ ठरवण्यासाठी फोन केला. त्यांनी आम्हाला दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजता दिल्लीच्या ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’च्या लायब्ररीत भेटीसाठी बोलावले होते. देशासाठी काश्मीर वाचवण्याची अतुलनीय कामगिरी करणार्‍या महान व्यक्तिमत्त्वाला उद्या समक्ष भेटायचे आहे, याची नाही म्हटली तरी एक प्रकारची ‘एक्साईटमेंट’ होती.
 
 
देशाच्या सर्वोत्कृष्ट सनदी अधिकार्‍यांत गणले जाणारे, दिल्ली विकास प्राधिकरणाचे ‘सीईओ’ असताना दिल्लीची महाविकास योजना तयार करून ती अमलात आणणारे, दिल्लीचे सर्वात तरुण उपराज्यपाल आणि दोन टर्म या पदावर राहिलेले ते एकमेव राज्यपाल होते. त्यांच्या या कारकिर्दीत तुर्कमानगेटवरील त्यांनी केलेली कठोर कारवाई, एशियाड, चोगम, अलिप्त राष्ट्र परिषद या कार्यक्रमांचे स्पृहणीय व यशस्वी आयोजन करणारे, गोवा दीव-दमणचे उपराज्यपाल राहिलेले, ‘पद्म’पुरस्काराने दोनदा गौरविण्यात आलेले एकमेव, जम्मू-काश्मीरचे दोनदा राज्यपालपद भूषविणार्‍या या अद्वितीय माणसाची उद्या समक्ष भेट व्हायची होती. आम्ही बरोबर ११ वाजता ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’च्या लायब्ररीत पोहोचलो.
 
 
जगमोहन कुठे बसतात, याची चौकशी केल्यावर तेथील एका तत्पर कर्मचार्‍याने जगमोहन बसलेल्या ठिकाणी मोठ्या आदराने पोहोचवले. आम्हाला पाहताच जागीच उभं राहून त्यांनी प्रसन्नपणे आमचं स्वागत केलं.
 
 
लालसर गौरवर्ण, सूट-टाय परिधान केलेले, किंचित उभट चेहर्‍याचे, डोक्यावरचे केस थोडे विरळ होत गेलेले, डोळ्यावर चष्मा असलेले, सदा हसतमुख जगमोहनांना कर्तृत्वाच्या उंचीला साजेलशी शारीरिक उंचीही लाभली होती.
 
 
बापूरावांना व तपस्वीजींना ते ओळखत होतेच. बापूरावांनी माझी-त्यांची ओळख करून दिली. आमचं हस्तांदोलन झालं. काश्मीरमधील त्यांच्या कामगिरीबद्दल प्रथम मी त्यांचं अभिनंदन केलं. ‘झेलमची हाक’ पुस्तिका त्यांना भेट दिली व “त्यांची भूमिका, केलेलं काम महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता आणि आता आपण काश्मीरप्रश्नाविषयीची इंग्रजीतून व्यक्त केलेली तगमग आम्ही मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यास उत्सुक आहोत,” असे त्यांना सांगितले. ते अगदी आनंदाने “जरूर,” असं म्हणाले. “मराठी में मेरी किताब जरूर आनी चाहिये. बल्की मैं चाहता हूं की, यह किताब सभी भारतीय भाषां में आये और यह विषय सब जानलें...”
 
 
मी - “मो. ग. तपस्वीजी मराठी अनुवाद करेंगे,” असे त्यांना सांगितल्यावर त्यांना विशेष आनंद वाटला. “ये तो और अच्छा हैं,” म्हणाले.
 
 
'' But Dilipji...You have to contact my publisher..Allied Publishers For legal formalities.. as I have an understanding with them. I will personally talk to them about your proposal...I think there won't be any problem.”
नंतर त्यांनी त्यांचं स्वतःचं कार्ड दिलं आणि आवश्यक तेव्हा कधीही फोन करायला हरकत नाही, असं सांगितलं.
त्यांच्या इंग्रजी ग्रंथाच्या दोन प्रती त्यांनी सोबत आणल्या होत्या, त्यातील एक तपस्वींना दिली व एक मला दिली.
“पुस्तकावर ‘अलाईड’चा नंबर आहे, त्यावर फोन करून डायरेक्टर रवि सचदेव यांच्याशी बोला. मी बोलून ठेवतो.”
आमच्यासाठी मागवलेल्या कॉफीपानानंतर आमची ही भेट संपवून आम्ही त्यांना धन्यवाद देत निघालो.
 
 
पुढे ‘अलाईड पब्लिशर्स’बरोबर रीतसर करार झाला. तपस्वीजींनी अत्यल्प वेळात अक्षरशः युद्धपातळीवर पण दर्जेदार एका वाक्यात म्हणजे या ‘हृदयीचे त्या हृदयी घातले’ असा अनुवाद केला व ‘काश्मीर : धुमसते बर्फ’च्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन ९ मे, १९९२ रोजी पुण्यातील बालगंधर्व सभागृहात मा. जगमोहनजींच्याच उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ‘काश्मीर : धुमसते बर्फ’ हा काश्मीरप्रश्नावरील मराठीतील सर्वोत्कृष्ट ग्रंथ ठरला.
 
 
जगमोहनांच्या काश्मीरविषयक तळमळीतून आणि त्यांच्या विशिष्ट कार्यप्रणालीनुसार काश्मीरमध्ये व काश्मीरविषयक घडणार्‍या घटनांची नोंद ठेवून त्यावरील त्यांच्या चिंतनाचा समावेश ते आपल्या इंग्रजी ग्रंथाच्या नवीन आवृत्तीत करून ती अद्ययावत करीत असत. मराठीतही आपण या नवीन प्रकरणांचा समावेश करून, ‘काश्मीर : धुमसते बर्फ’ ग्रंथ वेळोवेळी अद्ययावत केलेला आहे. अशा वेळी त्यांच्याशी फोनवर संपर्क हमखास होत असे. अशा प्रत्येक आवृत्तीला ते नवीन मनोगत पाठवायचे. 2018 पर्यंतच्या घडामोडीसह ‘काश्मीर : धुमसते बर्फ’ची सातवी अद्ययावत आवृत्ती एप्रिल २०१९ला प्रकाशित झाली असून, वाचकांसाठी ती उपलब्ध आहे.
 
 
या कार्यक्रमानंतर जगमोहनजींशी खूप घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. जेव्हा-केव्हा ते महाराष्ट्रात येत असत, फोन करून भेटीसाठी बोलवत असत. पुस्तकाच्या खपाच्या चौकशीबरोबर इतर ख्याली-खुशाली घेत असत.
 
 
एकवर्षी पु. भा. भावे स्मृती समितीच्या कार्यक्रमासही त्यांना मी आणले होते. काश्मीरमधून परत आल्यावर भारत सरकारने त्यांना राज्यसभेचे खासदार नियुक्त केले होते.
 
 
पुढच्या काळात त्यांनी त्यांचे इतरही ग्रंथ मराठीत आणण्यासाठी आपणहून ‘मोरया प्रकाशना’ला उपलब्ध करून दिले होते. त्यापैकी त्यांच्या काश्मीरच्या राज्यपाल कारकिर्दीत माता वैष्णोदेवी देवस्थानचा आदर्श कायापालट त्यांनी कसा घडवून आणला होता, त्याचा त्यांनी लिहिलेल्या इंग्रजीतील ‘रीफॉर्मिंग वैष्णोदेवी’या ग्रंथाचा मराठी अनुवाद ‘मिशन वैष्णोदेवी’ (डॉ. सच्चिदानंद शेवडे-मोरया प्रकाशन)नेच प्रकाशित केला होता. नंतरच्या काळात अटलजींच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री होते. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे व राहावा, या राष्ट्रीय दृष्टिकोनातून ते कायम प्रयत्नशील राहिले.
 
 
आपण अंगीकृत कार्यात थोडे साहस दाखवले, तर यश‘श्री’ तेथे चालून येतेच येते. ‘साहसे श्री प्रतिवसती’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जगमोहन होते. अलीकडच्या काळात मोदी सरकारने ‘३७० कलम’ रद्दबातल केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जगमोहन यांच्या घरी जाऊन ही आनंदवार्ता त्यांना दिली होती. काश्मीरचा ध्यास घेत प्रत्येक श्वास जगलेल्या जगमोहन यांना ही आनंदवार्ता ऐकून किती समाधान झाले असेल, याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.
 
 
सोमवार, दि. ३ मे रोजी रात्री दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
 
 
एक कुशल प्रशासक, प्रखर देशभक्त आणि संवेदनशील लेखक असलेले व्यक्तिमत्त्व जगमोहनजी आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत.
 
 
मा. कै. जगमोहनजींना ‘मोरया प्रकाशन’ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांनी देशासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना मानाचा मुजरा!
 

- दिलीप महाजन
( मोरया प्रकाशन, डोंबिवली- पुणे.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0