कोलकात्ता - पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार वाढला आहे. भाजपची १०० हून अधिक कार्यालये आणि कार्यकर्त्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांच्याशी चर्चा केली. या राजकीय हिंसाचाराबाबत मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे वाढत्या हिंसाचाराबाबत पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचार वाढला आहे. या हिंसाचारामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या घरांना आणि कार्यालयांना लक्ष करण्यात येत आहे. भाजपच्या उमेदवारांवर हल्ल्याचे सत्र सुरू आहे. पूर्बस्थली उत्तर येथील भाजपच्या उमेदवारावर हल्ला झाला आहे. पूर्बस्थली उत्तर येथून भाजपचे उमेदवार आणि वैज्ञानिक गोबरधन दास यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी येत आहे. दास यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली आहे. तृणमूल काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराला घेराव घालून त्यांना नजरकैदेत ठेवले. त्याचवेळी, इतर भाजप कार्यकर्त्यांच्या घरांप्रमाणे त्यांच्या घरावरही क्रूड बॉम्ब टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे मदत मागितली, ज्यावर दखल घेण्यात आली आणि कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहेत.
या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीर धनखार यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यपालांनी सांगितले की, नरेंद्र मोदींनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी गृहराज्य मंत्रालयाने मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराचा अहवाल राज्य सरकारकडे मागितला होता. राज्यपाल जगदीप धनखार यांनी हा अहवाल शोधण्यासाठी डीजीपी आणि कोलकाता पोलिस आयुक्तांना समन्स बजावले आहेत. परंतु, अद्याप त्यांना हिंसाचाराचे अहवाल देण्यात आले नाहीत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मृत भाजपा कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना भेटणार आहेत. भाजप ५ मे रोजी याविरोधात धरणे आंदोलन करणार आहे.