वीर सावरकरांनी अंदमानमध्ये भोगलेल्या यातना आणि छळ

    27-May-2021
Total Views | 652

ccc_1  H x W: 0



दि. ८ एप्रिल, १९११ रोजी सावरकरांना जन्मठेपेची अर्थात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली व त्यांची प्रत्यक्ष यमसदन असलेल्या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये रवानगी करण्यात आली. तेथील तिसर्‍या माळ्यावरील छोट्याशा खोलीमध्ये त्यांना जवळजवळ ११ वर्षं नरकयातना देण्यात आल्या. सर्व नरकयातना सहन करून तथा सर्व संकटांवर मात करून सावरकर ‘कालजयी’ ठरले आणि अनेक संकटे, वादळे पचवून देशकार्यासाठी पुन्हा उभे राहिले.
 
 
 
 
 
भारतमातेच्या मुक्तियज्ञात आपल्या सर्वस्वाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर या युगातील एक महानायक तथा उच्च कोटीचे देशभक्त होऊन गेले. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद वैचारिक बैठक होती. ‘क्रांतिकारकांचे मुकुटमणी ते समाजसुधारक’ असा त्यांचा प्रवास या मातीवर प्रेम करणार्‍या प्रत्येक देशभक्त नागरिकास प्रेरणा देणारा आहे. सोबतच थक्कसुद्धा करणारा आहे. वीर सावरकर इंग्लंड येथे शिक्षण घेत असताना इंग्रजी साम्राज्यामध्ये सिंहाच्या गुहेत राहून हिंदुस्थानच्या राष्ट्रदेवतेच्या स्वातंत्र्याची गर्जना करण्याचे साहस त्यांनी दाखविले होते.



पाण्यामध्ये राहून मगरीसोबत शत्रुत्व करता येत नाही, पण त्यांनी शत्रुत्वाचे आव्हान स्वीकारत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे बिगुल शत्रूच्या भूमीवर फुंकले. मार्सेलिस बंदरातील उडी आणि काळ्या पाण्याची शिक्षा हिंदुस्थान कधीच विसरू शकत नाही. अंदमानमध्ये त्यांनी भोगलेल्या यातना व त्यांचा झालेला छळ हासुद्धा कुतूहलाचा विषय आहे. पण, आज देशातील काही तथाकथित विचारवंत किंवा स्वयंघोषित बेगडी विद्वान मंडळी सावरकरांच्या अंदमानमधील यातना व छळ हा चेष्टेचा विषय ठरवू पाहत आहेत.



एवढेच नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदानच नाकारण्याचा केविलवाणा प्रयत्नसुद्धा करीत आहेत. ही मंडळी अंदमानातील यातना आणि छळाला बगल देऊन ‘माफीवीर सावरकर’ असा उपहासात्मक अजेंडा राबवित आहेत. ही मंडळी त्यांची टिंगलटवाळी करण्यात धन्यता मानत आहेत. काही प्रसारमाध्यमेसुद्धा त्यांच्या अजेंड्याला मूकसंमती देतात आणि ‘सावरकर नायक की खलनायक’ अशा प्रकारच्या तथ्यहीन चर्चा वृत्तवाहिन्यांवर आयोजित करतात. काही वर्तमानपत्रेसुद्धा सावरकरविरोधी वक्तव्यांना प्रथम पानावर प्रसिद्धी देतात. हे सर्व प्रकार म्हणजे देशासाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. वास्तविक पाहता, ज्यांनी आयुष्यभर आपल्या रक्ताचा सडा शिंपडून राष्ट्रदेवतेची आराधना केली, अशा राष्ट्रभक्तांची अवहेलना होत असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणते होऊ शकते? तसेच ज्या बॅरिस्टर जिनाने या देशाचा सत्यानाश केला, देशाचे तुकडे केले, लाखों हिंदूंची कत्तल घडवून आणली, त्याच्याविषयी हीच तथाकथित विचारवंत लोक तोंडातून चकार शब्ददेखील काढत नाहीत. सावरकरांनी अंदमानमध्ये देशस्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना आणि झालेला छळ नाकारण्याचा करंटेपणा करणे कितपत योग्य आहे, याचा विचार करावा लागेल.
अंदमानच्या काळकोठडीत रवानगी


महानायक सावरकर यांनी देशासाठी शारीरिक कष्ट, सामाजिक उपेक्षा आणि अवहेलना सहन करून प्रचंड कष्टाची पराकाष्ठा केलेली आहे. तसेच मोठी मोठी वादळे सहज पचवली आहेत व अशा वादळांना तुडवून ते ‘कालजयी’ ठरलेले आहेत. इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण सुरू असताना त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी ‘फ्री इंडिया सोसायटी’ नावाची संस्था काढली होती. या संस्थेचे सदस्य असलेल्या मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा मुडदा पाडला. त्यामुळे हिंदुस्थानमधील सावरकर संबंधितांचा छळ सुरू केला गेला. अनेक देशभक्तांवर खोटे खटले भरण्यात आले, तर अनेकांना काहीच गुन्हा नसताना कारागृहात टाकले. सावरकरांचे बंधू बाबराव सावरकर यांना जन्मठेप सुनावली गेली. त्यामुळे क्रांतिकारांत असंतोषाची लाट पसरली. सामान्य माणसामध्येसुद्धा असंतोष खदखदू लागला.
 
 
सावरकरांचे शिष्य अनंत कान्हेरे यांनी या अन्यायाचा प्रतिशोध घेण्याचा निश्चय केला. दि. २१ डिसेंबर, १९०९ रोजी नाशिकचा जुलमी कलेक्टर जॅक्सनचा गोळ्या झाडून वध केला. संशयाची सुई सावरकरांपर्यंत पोहोचली व त्यांना इंग्लंडमधून हिंदुस्थानमध्ये आणण्यात येत असताना त्यांची मार्सेलिस बंदरातील उडी जगभरात गाजली. जागतिक वर्तमानपत्रांनीसुद्धा या घटनेला प्रसिद्धी दिली. अखेर त्यांना अटक करून त्यांच्यावर विविध खटले दाखल करून दि. ८ एप्रिल, १९११ रोजी जन्मठेपेची अर्थात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली व त्यांना प्रत्यक्ष यमसदन असलेल्या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये रवानगी करण्यात आली. तेथील तिसर्‍या माळ्यावरील छोट्याशा खोलीमध्ये त्यांना जवळजवळ ११ वर्षं नरकयातना देण्यात आल्या. सर्व नरकयातना सहन करून तथा सर्व संकटांवर मात करून सावरकर ‘कालजयी’ ठरले आणि अनेक संकटे, वादळे पचवून देशकार्यासाठी पुन्हा उभे राहिले.
 
 
सेल्युलर जेल म्हणजे प्रत्यक्ष यमसदनच!
 
वीर सावरकर यांना ब्रिटिशांनी ५० वर्षांची दोन जन्मठेपेची अर्थात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून त्यांना सेल्युलर जेलमध्ये पाठविण्यात आले होते. सेल्युलर जेल म्हणजे त्याकाळी प्रत्यक्ष यमसदन समजले जायचे आणि सेल्युलर जेलमध्ये रवानगी म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू समजला जायचा. सेल्युलर जेल ही वास्तु समुद्राने काळ्या पाण्याचं कुंपण घातलेल्या अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर शहरात आहे. त्याची निर्मिती ब्रिटिशांनी १८९७ साली सुरुवात केली होती आणि १९०६ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यामध्ये जवळपास ६९८ खोल्या असून त्यांचे १५ बाय ८ क्षेत्रफळ होते. पूर्णत: अंधारमय असलेल्या खोली क्र. ०५२ मध्ये सावरकर यांना हातात हातकड्या व पायामध्ये बेड्या घालून ठेवण्यात आले होते आणि तेथे त्यांचा छळ करून मरण यातना देण्यात आल्या होत्या. त्यांना कोलूला जुंपवून ३० पौंड तेल काढेपर्यंत कष्ट करून घेतले जात असत. जेवण मात्र निकृष्ट दर्जाचे देण्यात येत होते.
 
 
अंदमानमधील यातना आणि छळ
 
वीर सावरकर यांना अंदमानच्या काळकोठडीत प्रचंड यातना देण्यात आल्या आणि त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यांना काळकोठडीतील कोलूला जुंपण्यात आले होते. कोलू म्हणजे काय? तर तेलाच्या घाणीला बैल जुंपून तेल काढण्याच्या प्रक्रियेला ‘कोलू’ म्हणतात. अंदमानच्या काळकोठडीत कोलूला बैल जुंपण्याऐवजी सावरकरांना जुंपण्यात येत असे व नारळ तथा सरसोचे ३० पौंड तेल काढावे लागे. त्यामध्ये कुचराई केल्यास वेळप्रसंगी कोड्याचे फटकेसुद्धा मारण्यात येत असत. कोडे मारणे म्हणजे चाबकाचे फटकारे असून जे शरीराला लागताच शरीराची अक्षरश: चामडी सोलून काढते आणि सावरकरांना अशा कोड्याचा सामना अनेक वेळा करावा लागत असे. साखळदंडाने बांधलेल्या सावरकरांची अंदमानमधील दिनचर्या अंगावर शहारे आणणारी होती. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत त्यांना अंधार कोठडीतील कोलूला जुंपून ठेवले जात असे. वेळेवर योग्य आहार तर सोडा, त्यांना पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा देण्यात येत नव्हते. त्यांच्या शरीरामधून जेवढा घाम निघेल, तेवढेच पाणी पिण्यास मिळत असे. अतिकष्ट आणि शरीरामधून निघणारा घाम इत्यादीमुळे त्यांचे शरीर थकत चालले होते, तसेच त्यांचे शरीर रोगट अथवा व्याधीग्रस्त कसे होईल, याकडे जेलमधील प्रशासनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न असायचा. अनेक प्रकाराने ब्रिटिशांकडून त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांना मरणयातना देण्यात आल्या. त्यांचे शरीर थकले होते. शेवटी ब्रिटिश सरकारने त्यांची अंदमानच्या काळकोठडीमधून सुटका केली आणि त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले.
 
 
अंदमानमध्ये ब्रिटिशांकडून झालेला छळ व दिलेल्या यातना यांविषयी सावरकरांना कधीच पश्चाताप झाला नाही. उलट ते करारीबाणा घेऊन समरभूमीत उतरले. त्यामुळेच ते तेव्हाही भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले होते आणि आजही प्रेरणास्थान आहेत. आपल्या देशातील काही स्वयंघोषित तथाकथित पुरोगामी मंडळी कायमच सावरकरद्वेष्टी राहिलेली आहेत आणि त्यांच्या साहित्य अथवा अन्य कलाकृतींमधून सावरकरद्वेष सतत प्रकट करत असतात. पण, त्यांच्या सावरकरद्वेषाचा कोणताही फरक किंवा प्रभाव जनमानसात पडलेला नाही. उलट तरुण मंडळींमध्ये, सामान्य माणसांमध्ये सावरकर आणि सावरकरांच्या साहित्याविषयी प्रचंड उत्सुकता पाहावयास मिळते. त्यामुळे आतातरी सावरकर यांच्या अंदमानमध्ये भोगलेल्या यातना आणि छळाकडे डोळेझाक करुन त्यांची बदनामी, त्यांचा उपहास करणे थांबविले गेले पाहिजे.

 
- अशोक राणे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121