कोलकाता - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील ममता बॅनर्जी सरकारने या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, प्रशासकीय असहकार असूनही ते हिंसाचारग्रस्त भागाला भेट देणार आहेत.
राज्यपालांनी सांगितले की, निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. राजकीय हिंसा, जाळपोळ, दरोडा टाकण्याच्या घटना आता धमक्या आणि खंडणी वसूल करण्यापर्यंत पोहोचल्या आहेत. सोमवारी पार पडलेल्या ४३ मंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्यपालांनी पश्चिम बंगालच्या हिंसाचाराबाबत भाष्य केले. राज्यपाल धनखड़ म्हणाले की, "आपल्या घटनात्मक जबाबदाऱ्याअंर्तगत मी हिंसाचार झालेल्या भागांना भेट देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे राज्य सरकारला यासंदर्भात आवश्यक त्या व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र, राज्य सरकारचा प्रतिसाद अत्यंत दुर्दैवी होता. असे असूनही येत्या काही दिवसांमध्ये ही हिंसाचारग्रस्त भागाला भेट देणार आहे."
3 मे रोजी राज्याचे डीजीपी, कोलकाताचे पोलिस आयुक्त आणि अतिरिक्त गृह सचिव यांच्याकडून हिंसाचाराबाबत एक अहवाल मागवण्यात आला होता. हा अहवाल अजूनही राज्यपालांना देण्यात आलेला नाही. अधिकार्यांनी हा अहवाल अतिरिक्त मुख्य सचिव गृहांकडे पाठविला आहे. परंतु, त्यांनी आजपर्यंत हा अहवाल राज्यपालांपर्यंत पाठवला नाही. राज्यपालांचे म्हणणे आहे की, त्यांनी प्रभावित भागात जाण्यासाठी हेलिकॉप्टर मागितले होते. पण यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याला अनधिकृतपणे सांगण्यात आले की हेलिकॉप्टर आणि वैमानिकांमध्ये काही समस्या आहे. घटनात्मक प्रमुखांना माहिती देण्याचा हा मार्ग आहे का ? असा सवाल त्यांनी केला.