मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केला निषेध
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. 'सामना' मुखपत्रातील लेखात कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना तृणमुल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याशी केली. या प्रकरणी जाहीर निषेध व्यक्त करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत खडसावले आहे.
खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये ‘रोखठोक’ या त्यांच्या लेखात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केली. त्यावर आक्षेप घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत शब्दांत पत्र लिहिले आहे.
पत्रातील उल्लेखानुसार, ‘राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना जर आजच्या नेतेमंडळींशी करत असाल, तर या पुढे ते बिलकुल खपवून घेतले जाणार नाही. याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत’, अशा शब्दांत श्रीमंत भूषणसिंह राजे यांनी गर्भित इशारा दिला आहे. आपल्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये लिहिलेला लेख वाचला. आपल्याला अत्यंत खेदाने सांगू इच्छितो की, ज्या पद्धतीने त्यांनी तो लेख लिहिला आहे. त्यावरून त्यांची वैचारिक पातळी लक्षात येते.'
"आपण पक्षीय राजकारण म्हणून खुशाल एकमेकांवर चिखलफेक करा. पण त्यामध्ये जर राष्ट्र पुरुषांची नावे वापरून त्यांची तुलना आजच्या नेतेमंडळी करीत असाल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. रयतेचे कल्याण हेच सर्वतोपरी मानून संपूर्ण देशात काम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना राजकीय द्वेषातून आपल्याच लोकांवर अत्याचार करणाऱ्या एका नेत्यांशी कदापि होऊ शकत नाही. माँ साहेबांचे विचार आचरणात आणा. त्यांच्यासारखा रयतेचा सांभाळ करा. मग जनता ठरवेल आपण त्या योग्यतेचे आहात की नाही.", असेही पत्रात म्हणण्यात आले आहे.
'ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाहीतर आभाळ कोसळेल,' असे वातावरण देशात निर्माण केले गेले. पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले.या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल. होळकरांच्या गादीला वारस नसल्याने स्वतः अहिल्याबाईंनी राजशकट हाती घेतले. ही विधवा बाई काय राज्य करणार? अशी दरबारी मंडळींची अटकळ होती. त्यांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड ऊर्फ गंगोबा तात्या हा त्या दरबाऱ्यांचा प्रमुख होता.
अहिल्याबाईंना हटविण्यासाठी त्याने राघोबा दादांशी संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी फूस लावली. राघोबा दादा मोठे सैन्य घेऊन इंदूरवर चालून आले. अहिल्याबाईंचा आपल्या समोर काय निभाव लागणार? इंदूर सहज जिंकून घेऊ, असा त्यांचा विश्वास होता. अहिल्याबाईंकडे त्यावेळी फक्त पाचशे महिलांचे पथक होते. त्यांच्या ताकदीवर अहिल्याबाई युद्धास सज्ज झाल्या.
त्यापूर्वी त्यांनी नर्मदेपलीकडे डेरा टाकलेल्या राघोबा दादास निरोप पाठवला, तुम्हाला लढायची खुमखुमी असेल तर मीही तयार आहे. हातात भाला आणि माझ्या पाचशे वीर महिलांना घेऊन मैदानात उतरले तर तुमची पळता भुई थोडी होईल. हरलात तर काय होईल? मी बाई माणूस असल्याने मला कोणीच हसणार नाही. पण तुमचा पराभव माझ्याकडून झाला तर जगास तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही. राघोबा दादाला हा निरोप मिळताच त्याचे डोके ठिकाणावर आले. त्याने मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला. अहिल्याबाईंच्या लौकिकात भर पडली, अशी आठवण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी करून दिली आहे.
"... तर मामूंची तुलना सुर्याजी पिसाळांसोबत करतील!"
या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केली आहे. किंबहुना उद्या हे भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘मामु’ची (माननीय मुख्यमंत्र्यांची) तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच... वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा!, अशी टीका भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.