मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अनेक परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच, अनेक परीक्षा विशेषतः दहावीचीही परीक्षा रद्द करण्यात आली आहेत. अशामध्ये आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ मे रोजी होणाऱ्या ५वी आणि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.
शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी ट्विट केले आहे की, "‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता ५वी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८वी) शिष्यवृत्ती परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल."
तसेच पुढे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "यंदा राज्यभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता एकूण ४७,६६२ शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता ५वीचे ३,८८,३३५ तसेच इयत्ता ८ वीचे २,४४,१४३ असे एकूण ६,३२,४७८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी हीच आमची प्राथमिकता आहे." असे म्हणत हा निर्णय घेतल्याची त्यांनी सांगितले आहे.