मुंबई : देशामध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आयपीएल २०२१च्या आयोजनावर टीका केली जात होती. अशामध्ये आयपीएलच्या सामान्यांना सुरुवात झाली खरी, पण मध्यातच अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामने स्थगित करावे लागले. यावर आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने अनेक खुलासे केले असून कोरोनाकाळात आयपीएलचे उर्वरित सामने भारतात घेणे शक्य नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. तसेच, सध्या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थ ठरल्यास बीसीसीआयला तब्बल २५०० कोटींचे नुकसान होऊ शकते असेदेखील त्याने सांगितले आहे.
सद्यस्थितीत देशामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता भारतात तरी आयपीएलचे आयोजन शक्य नाही. इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे देश आयपीएलचे सामने आयोजित करण्यास उत्सुक आहेत. 'आयपीएल'चे प्रशासकीय मंडळ आणि बीसीसीआय सर्व शक्यतांचा विचार करून यासंदर्भात निर्णय घेईल, असे गांगुलीने स्पष्ट केले आहे. आगामी काळामध्ये भारतीय संघ हा इंग्लंड कसोटी, श्रीलंका दौरा तसेच आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. याशिवाय ऑक्टोबरमध्ये आयसीसी टी - २० विश्वचषक सामने खेळवले जाणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२१चे आयोजन कोणत्या महिन्यात करणार? हा मोठा प्रश्न बीसीसीआय पुढे उभा आहे.