'रेमडेसिवीर' या इंजेक्शनचा तुटवडा का जाणवतोय?

08 Apr 2021 19:37:38

news1 _1  H x W


कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसीवीर या इंजेक्शनची कमतरता भासत असून रुग्णांचे नातेवाईकच आता रुग्णालयांच्या आवाराबाहेर रांगा लावत आहेत. कोविड रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन मिळविण्यासाठी मेडिकल दुकानांबाहेर रांगा लावत आहेत.
 
 
मुंबई पुण्यासह कल्याण-डोंबिवली खासगी रुग्णालयात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हे रुग्ण खासगी रुग्णालयातील आहेत. या प्रकरणी दै.'मुंबई तरुण भारत'च्या प्रतिनिधींनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली. त्यानुसार, १२०० इंजेक्शनची ऑर्डर टप्प्याटप्प्यात पूर्ण केली जाईल, असे म्हटले.
 
 
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, उल्हासनगर यासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. या भागात रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात अमेय मेडीकल स्टोअर्समध्ये हे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी रात्रभर मोठी रांग लावली होती. दुकानदारही कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना टोकन देत होते. एका दुकानात हे इंजेक्शन मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने चार ते पाच दुकानावर रांगा लावाव्या लागतात.
 
 
कल्याणच्या या प्रकाराची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. त्यानंतर शिंदे यांनी पाचशे इंजेक्शनचा साठा तातडीने उपलब्ध करून देणार असल्याची माहिती विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. कोविड टास्क फोर्सने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार, खासगी डॉक्टरांनी अत्यावश्यक रुग्णालाच हे इंजेक्शन लिहून दिल्यास त्याचा तुटवडा भासणार नाही. तसेच येत्या तीन ते चार दिवसांत इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार आहे. टास्क फोर्सने खासगी डॉक्टरांना कोविड रुग्णांबाबत दिलेल्या ए, बी, सी, डी आणि ई या वर्गवारीनुसार इंजेक्शन लिहून दिले पाहिजेत.
 
 
ज्या रुग्णाला गरज आहे त्यांनाच इंजेक्शन लिहून देण्यात यावे. हे इंजेक्शन बनविण्यासाठी आधी दोन कंपनी होती. आता सहा कंपनी हे इंजेक्शन तयार करीत आहेत. पण आता रुग्णसंख्या वाढत असल्याने इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या इंजेक्शनला तीन किंवा सहा महिन्यानंतर एक्सपायरी डेट असते. त्यामुळे कंपनी त्याचे उत्पादन मोठया प्रमाणावर करीत नाही. शिवाय मुदत संपल्यावर नुकसान ही भरून निघाण्याची कोणतेही तरतूद नाही.
 
 
कंपनीकडे जो एक महिना पुरेल एवढाच इंजेक्शनचा साठा होता तो रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पंधरा दिवसांतच संपला आहे. हे इंजेक्शन तयार करण्यासाठी पंधरा दिवसाचा कालवधी लागतो. त्यामुळे लवकरच बाजारात इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती 'ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन'चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.
नांदेडमध्ये काळाबाजार

नांदेडमध्ये रेडिसिमवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या औषधांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर औषधे जादा किमतीला विकली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 

Powered By Sangraha 9.0