ठाणे : कोरोना निर्बंधकाळात ५० वऱ्हाड्यांची मर्यादा असतानाही जास्त पाहुणे मंडळी बोलावली म्हणून ठाणे पोलीस व महापालिकेने कारवाई केली आहे. वधू-वराच्या कुटुंबातील सदस्यांवर कासारवडवली पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा व जमावबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता आयोजित केलेल्या सोहळ्यावर ठाणे महापालिकेनेही कारवाई केली आहे.
घोडबंदर भागात महापालिकेच्या भाईंदरपाडा येथील 'कोविड' विलीगीकरण केंद्राच्या ५०० मीटर अंतरावरच हा शाही लग्नसोहळा रंगला होता. या लग्नाची परवानगी घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. तसेच लग्नासाठी ५० जणांनाच बोलविण्यात आल्याचेही सांगण्यात येत होते.
पंरतु, प्रत्यक्षात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका आणि पोलिसांच्या पथकाला ५०हून अधिक वऱ्हाडी आढळून आले. तसेच, कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेतलीच नसल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी या लग्नसोहळ्याच्या आयोजकांसह वधू-वराच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, 'कोविड' नियमांचे उल्लंघन केल्याने माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीनेही आयोजकावर कारवाई केली.