‘डोंबिवलीभूषण’ आबासाहेब

30 Apr 2021 22:39:15

nnn _1  H x W:




‘एक अत्यंत लोकप्रिय नगराध्यक्ष’ असा त्यांचा नावलौकिक होता. डोंबिवलीतल्या राजकीय, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, प्रसारमाध्यम, उद्योजक अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रातील भिन्न भिन्न विचारसरणीच्या सर्व मान्यवर मंडळींशी आबासाहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.




आबासाहेब डोंबिवलीत राहायला येण्यापूर्वी बरीच वर्षे ठाण्यात राहत होते. ‘एक कार्यक्षम कार्यकर्ता’ अशी त्यांची ठाण्याच्या संघ-जनसंघ वर्तुळात ओळख होती. डोंबिवलीत आल्यानंतर ते इथल्या प्रगल्भ अशा शैक्षणिक-सांस्कृतिक-राजकारणात झटकन मिसळून गेले. डोंबिवलीला कॉलेज नाही, ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करणारे डॉ. राव यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बरोबर ते कामाला लागले आणि काही वर्षांतच कला-वाणिज्य-विज्ञान असे सुसज्ज ‘पेंढारकर कॉलेज’ सुरू झाले.
 
 
 
डोंबिवलीत सहकारी बँक काढावी, अशी मनीषा मा. मधुकरराव भागवत बरीच वर्ष मनाशी बाळगून होते. ती पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू झाली आणि त्यासाठी केशवराव खंडकर, आप्पा दातार, बापूसाहेब मोकाशी, मधुकरराव चक्रदेव यांच्यासह आबासाहेब खटपट करू लागले आणि ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’ सुरू झाली. आबासाहेबांचा अर्थशास्त्राचा विशेष अभ्यास लक्षात घेऊन, त्यांना बँकेचे ‘मॅनेजिंग डायरेक्टर’ करण्यात आले. राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या या बँकेने अल्पकाळातच किती लक्षणीय प्रगती केली, ते सर्वांना माहीतच आहे.
 
 
डोंबिवलीत त्या काळात नगरपालिका होती आणि जनसंघाची मंडळी अधिकारारूढ होती. नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट मतदारांकडून व्हावी, असा शासनाचा निर्णय झाल्यानंतर थेट निवडणुकीतून प्रचंड मताधिक्याने आबासाहेब पटवारी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. ‘एक अत्यंत लोकप्रिय नगराध्यक्ष’ असा त्यांचा नावलौकिक होता. डोंबिवलीतल्या राजकीय, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, प्रसारमाध्यम, उद्योजक अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रातील भिन्न भिन्न विचारसरणीच्या सर्व मान्यवर मंडळींशी आबासाहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
 
 
 
१९७५ साली आणीबाणी जाहीर झाली. त्यावेळी आबासाहेब डोंबिवलीचे नगराध्यक्ष होते. सुरुवातीलाच त्यांना इतर चार जणांसह ‘मिसा’खाली अटक झाली व नाशिक कारागृहात ठेवण्यात आलं. थोड्याच दिवसांनी त्यांचं सौ. पटवारी वहिनींना आलेलं पत्र वहिनींनी आम्हाला दाखवलं. अत्यंत विपरित परिस्थितीतही एक व्यक्ती किती सकारात्मक विचार करू शकते, याचा वस्तुपाठच ते पत्र होतं. १९७७ साली आणीबाणी संपल्यावर आबासाहेब कारावासातून घरी आले. मी त्यावेळी संघाचा शहर कार्यवाह होतो. त्यांना भेटायला गेलो, “आता पुढे काय करायचा विचार आहे?” असं त्यांना विचारलं. त्यावेळी ते कळवा फॅक्टरीतील ‘कर्मचारी सहकारी बँके’चे सरव्यवस्थापक म्हणून काम करत होते. आता यापुढे नोकरी न करता आपल्याच परिवारक्षेत्रात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
 
 
 
हे त्यांचे विचार संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. शिवरायजी तेलंग यांच्या कानावर मी घातले. थोड्याच दिवसांत मा. शिवरायजी डोंबिवलीत आले आणि मा. मधुकरराव भागवत यांच्या घरी आबाजींना बोलावून घेतलं. त्यांची उभयता भेट झाल्यावर मा. शिवरायजींनी मला बोलावून सांगितले की, “यापुढे आबासाहेब कळव्याची नोकरी न करता, सा.‘विवेक’ व ‘सहकार भारती’चं काम करतील, तिथूनच त्यांना योग्य ते मानधन दिलं जाईल.” नंतरचं आबासाहेबांचं सा.‘विवेक’मधलं योगदान सर्वश्रुतच आहे.
 
 
 
डोंबिवलीतल्या श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सुरू केलेली ‘न भूतो न भविष्यति’ अशी गुढीपाडव्याची स्वागतयात्रा देशभर गाजली. त्यांनी डोंबिवलीचं विधानसभेत-विधान परिषदेत प्रतिनिधित्व करावे, अशी असंख्य डोंबिवलीकरांची तीव्र इच्छा होती. पण, ती संधी त्यांना कधीच मिळाली नाही. अशा या थोर समाजसेवकाला शतशः प्रणाम...
 
 
- हरी विष्णू बापट
 
Powered By Sangraha 9.0