मुंबई (प्रतिनिधी) - प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना जुन्नर येथील नारायणगाव परिसरात घडली. विहिरीत पडलेल्या बिबट्याने प्लास्टिकच्या पिशवीचा आसरा घेतला आणि त्यामध्ये गुदरमरून त्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना उजेडात आली. यामुळे कठडे नसलेल्या विहिरींमध्ये पडून मृत्यूमुखी पडणाऱ्या वन्यजीवांचा प्रश्न पुन्हा एका ऐरणीवर आला आहे.
नारायणगाव वनपरिक्षेत्रामधील धनगरवाडीतील विहिरीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत मृत बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घडले असे की, भक्षाच्या शोधात असलेली सहा वर्ष वयाची मादी बिबट्या ही कठडे नसलेल्या विहिरीत पडली. यावेळी ती विहिरीमध्ये आसरा शोधण्याचा प्रयत्न करत होती. तिने पाण्यात पडलेल्या प्लास्टिकच्या पिशवीच्या आसरा घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ती तोंडाकडील बाजूने पिशवीमध्ये शिरली असावी. पिशवी अंगाला चिकटल्याने ती त्यामध्ये अडकली असण्याची शक्यता आहे.
दरम्यान मादी बिबट्याच्या अंगाला पिशवी चिकटल्याने ती त्यामधून बाहेर पडू शकली नाही. परिणामी पिशवीच्या मागील उघड्या बाजूने पाणी आतमध्ये शिरले. यामुळे पाणी नाकातोंडामध्ये गेल्याने तिचा मृत्यू झाला. धनगरवाडी येथील ग्रामस्थ रमेश शेळके हे बुधवारी सकाळी विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता, त्यांचा हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन मृत बिबट्याला बाहेर काढले. दरम्यान शवविच्छेदनानंतर बिबट्याचा मृत्यू प्लास्टिकच्या पिशवीत अडकून गुदमरल्यामुळे आणि नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे झाल्याचे समजल्याचे वनपाल मनीषा काळे यांनी सांगितले. तसेच बिबट्याचे दात, नखं आणि मिशा शरीरावर शाबूत असल्याची माहिती त्यांनी दिली.