मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून सर्व महाराष्ट्रात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असणार आहे. या कलमामुळे सिनेसृष्टीला पुन्हा एकदा ब्रेक लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लावत लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर आता सिनेसृष्टीचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे बड्या निर्मात्यांना जास्त फटका बसणार नाही, मात्र छोट्या निर्मात्यांवर अधिक भार पडणार आहे. तसेच, स्टंटमॅन, पडद्यामागे काम करणाऱ्यांना आणि रोजंदारीवर पैसे कमावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे.
१४४ कलम लागू झाल्याने चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण पुन्हा बंद होणार असून पुढील १५ दिवस कोणताही चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार नाही. यामुळे हिंदीपेक्षा अधिक फटका हा मराठी सिनेसृष्टीला बसणार आहे. त्यामुळे या १५ दिवसांमध्ये होणारे करोडोंचे नुकसान, तसेच यादरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे, अभिनेत्यांचे, निर्मात्यांचे नुकसान कसे भरून काढणार? असा प्रश्न सिनेसृष्टीला पडला आहे. यापूर्वीही अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कलाकार आणि सिने सृष्टीतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा 'ब्रेक' लागल्याने त्यांच्यामध्ये चीतेंचे वातावरण निर्माण झाले आहे.