मुंबई : आयपीएल २०२१ची सुरुवात होताच गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये पहिला सामना हरल्यानंतर केकेआरविरुद्धचा दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्माचे चांगलेच कौतुक करण्यात आले. मात्र, याचसोबत त्याचे आणखी एका गोष्टीमुळे कौतुक करण्यात येत आहे. ते म्हणजे रोहितकडून देण्यात येणारे अनोख्या पद्धतीचे सामाजिक संदेश.
पहिल्या सामन्यात रोहित शर्माने 'सेव्ह द ऱ्हायनो' या उपक्रमाला अनोख्या पद्धतीने प्रोत्साहन दिले. याद्वारे त्याने लुप्त होत चाललेल्या गेंडा प्रजाती वाचवण्याचा संदेश दिला.
तर, दुसऱ्या सामन्यात त्याने 'प्लास्टिक फ्री ओशियन' (प्लास्टिकमुक्त समुद्र) या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. त्याने परिधान केलेल्या बुटांवर हे संदेश लिहिलेले आहेत. त्याच्या या अनोख्या पद्धतीने त्याचे पर्यावरण प्रेम तर दिसून येतेच. याशिवाय त्याचे समाजभानदेखील कौतुकास्पद आहे. अनेक पर्यावरण प्रेमींकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.