खानिवडे (वार्ताहर) : वीकएण्ड लॉकडाऊनचा परिणाम सतत व्यस्त राहणाऱ्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर दिसून आला. रविवारी सकाळपासून शुकशुकाट होता. कधीतरी एखाद दुसरे वाहन या मार्गावरून दिसून आले.
अगदी तुरळक वाहने महामार्गावरून जात असल्याने वर्षाच्या टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती शनिवार आणि रविवारी दिसून आली. एरव्ही गजबजलेला टोलनाका दोन दिवस सुना सुना पडला आहे.
वसई पूर्वेतून जाणारा व देशाच्या सुवर्ण चतुष्कोन चा एक हिस्सा असणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा वाहनांच्या गमनाने अत्यंत गजबजलेला असून दिवसरात्र बेसुमार वाहनांची वर्दळ या महामार्गावरून होते.
सहा पदरी महामार्गावरून मिनिटाला कमीत कमी अंदाजे ४० ते १५० पेक्षा जास्त वाहने धावतात. मात्र, महामर्गावर लॉकडाऊनचा चांगलाच परिणाम दिसून आला. जेमतेम मिनिटाला चार ते पाच वाहने जात होती.