लॉकडाउनबाबत उद्धव ठाकरे एकाकी पडले?

10 Apr 2021 20:07:52



uttt_1  H x W:


महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांकडून लॉकडाउनला पाठींब्यांची भूमिका मात्र निर्णयाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर


मुंबई (सोमेश कोलगे):  आज संध्याकाळी महाराष्ट्रात लॉकडाउन लावण्याविषयी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. राज्यातील सर्व मंत्री तसेच सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित होते.

सकाळपासून लॉकडाउनचे संकेत दिले जात होते. लॉकडाउन जाहीर केला जाईल, अशा बातम्या दिल्या जात होत्या. तसेच बैठकीत आठ दिवसांच्या लॉकडाउनसाठी उद्धव ठाकरेंनी आग्रह धरला होता. पण विरोधी पक्ष भाजपसह, कोंग्रेस, राष्ट्रवादी यांच्याकडून काही प्रश्नही उपस्थित केले गेले. आधी मदत जाहीर करा मग लॉकडाउन करा, अशी भूमिका राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने घेतली होती.

तसेच सध्याची परिस्थिति पाहता शिवसेनेवर आरोप होत आहेत, वाझेप्रकरणात शिवसेनेशी संबंधित नवी नावे समोर येत आहेत, अशावेळी राजकीय दृष्टीनेही शिवसेनेसाठी लॉकडाउन सोयीचा पर्याय ठरतो. तसेच राज्यात रेमेडीसिवर इंजेक्शन, आरटीपीसीआर किट चा तुटवडा यावरही लॉकडाउनच्या निर्णयामुळे काही दिवसांसाठी पडदा पडला असता.

मात्र लॉकडाउनमुळे कष्टकरी, कामगार यांच्यासमोर काही गंभीर प्रश्न निर्माण झाले असते. आधीच कोरोना महामारीशी लढताना राज्यात रोजगाराच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. उद्योजक राज्य सोडून अन्य राज्यात जात आहेत. नुकतेच शासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधांच्या विरोधात राज्यभरात व्यापार्‍यांनी उस्फूर्त निदर्शने केली. जनतेचा रोष ओढवण्याची शक्यता होती. अखेर राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय दोन दिवसांत घेणार, असे कळवले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठक संपुष्टात येण्यापूर्वीच बाहेर पडले होते. बाहेर आल्यावर भाजपवर टीका केली. तसेच केंद्र सरकारवरही टीका केली. पण लॉकडाउनचा निर्णय मुंख्यमंत्री घेतील असे पटोले म्हणाले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी "मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आम्ही सोबत आहोतच", असे वक्तव्य केले. अजितदादा यांनीही केवळ दोन ओळीत आपली भूमिका स्पष्ट केली.

अजितदादा यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. नवाब मलिक यांनी देखील निर्णय मुख्यमंत्री घेतील, याचीच पुनरावृत्ती केली.

तसेच महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे नेते उघडपणे लॉकडाउनच्या समर्थनार्थ वक्तव्य करीत असले तरीही वक्तव्य करीत असले तरीही निर्णय मुख्यमंत्री घेतील, हे वाक्य बोलायला विसरत नाहीत. लॉकडाउनच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांना मोठेपण देण्याच्या नावाखाली एकटे पाडण्याची सुरुवात झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित राहतो.
Powered By Sangraha 9.0