मुंबई : अभिनेता सैफ अली खानची वेब सीरीज तांडव सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या वेब सीरीजवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. यापूर्वी भाजप नेते राम कदम यांनी मुंबईत या वेब सीरीजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. तसेच लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.
अभिनेता सैफ अली खान याची मुख्य भूमिका असलेल्या तांडवमध्ये हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आल्याच्या आरोपामुळे वेबसिरिजच्या दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि अमेझॉन प्राइमच्या कंटेंट हेडविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. ‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी वेबसिरीजविरोधातील वाढता तणाव लक्षात घेत जाहीर माफी मागितली होती. मात्र तरीही देशभर याबद्दल अनेक आंदोलने झाली.