सरकारमध्ये आणखी किती 'वाझे' दडले आहेत ?

24 Mar 2021 17:29:23

madhav bhandari and uddha



भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

मुंबई: ''राज्य सरकारमध्ये सचिन वाझे यांच्यासारखे आणखी किती अधिकारी दडले आहेत?" असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी उपस्थित केला. ''परमवीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार करून घेण्याचे दिलेले निर्देश अत्यंत महत्त्वाचे असून देशमुख यांच्या उलट तपासणीतून अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो,'' असे भांडारी यांनी म्हटले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

भंडारी म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती सचिन वाझे प्रकरणातून स्पष्ट झाली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कारणांखाली निलंबनाची कारवाई झाली आहे, अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या आणि त्यांच्याकडून वाझेकरवी जी कामे करून घेतली जात होती, ती कामे करून घ्या, अशी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याचे दिसते. वाझेंसारखे आणखी किती अधिकारी सरकारमध्ये दडले आहेत, हे कळले पाहिजे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक कारणामुळे ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करा, असे निर्देश दिले आहेत. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. त्याचबरोबर देशमुख यांनाही या याचिकेत पक्षकार करून घ्या, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसे झाल्यास देशमुख यांच्या उलट तपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल, असेही भांडारी यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0