डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील स्वप्निल सुरेश मालाडकर गेल्या पाच वर्षापासून असाध्य आजाराने त्रस्त आहे. त्यांचा उपचारावरील खर्च जास्त असून आर्थिक उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. आपल्याला दिव्यांगांचा दर्जा मिळावा आणि सरकारने एखादी नोकरी द्यावी किंवा या दोन्ही गोष्टी करता येत नसतील तर इच्छामरणाची परवानगी द्यावी यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. गेल्या चार महिन्यापासून पत्रव्यवहार करून ही राज्य सरकार लक्ष देत नसल्याची खंत स्वप्निलने व्यक्त केले आहे.
स्वप्निलचे आयुष्य सुध्दा सामान्य माणसासारखे होते. पण अचानक एक दिवस त्याला ‘बड चिअरी सिंड्रोम’ हा असाध्य आजार झाल्याचे समजले. हा आजार अनुवांशिक असला तरी त्यापूर्वी त्यांच्या घरी कोणाला झाला होता हे फारसे कोणाला माहीत नाही. एखाद्याचा हात पाय तुटला तर त्या व्यक्तीला दिव्यांग मानले जाते. दिव्यांगासाठी असलेल्या सुविधा अशा व्यक्तींना मिळतात. परंतु एखाद्या व्यक्तींच्या शरीराच्या आतील अवयव निकामी झाल्यास त्या रुग्णाची अवस्था बिकट होते. प्रतिकारक्षमता ही कमी होते. त्यामुळे अशा व्यक्तीला इतर आजार ही जडतात. अशा व्यक्तींचे जगणो कठीण अत्यंत हालाखीचे होते. असेच काहीसे स्वप्नीलच्या बाबतीत ही झाले आहे.
स्वप्निलला औषधोपचारांसाठी महिन्याकाठी ३० हजार रूपयांचा खर्च करावा लागत आहे. कधीकधी त्यापेक्षा ही जास्त पैसे उपाचारांसाठी लागतात. दानशूर व्यक्तीमुळे काही प्रमाणात मदत होत असली तरी पुढचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न त्याच्यासमोर आहे. स्वप्निलच्या वडीलांचे देखील काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचे वडील असताना थोडेफार ठीक चालू होते. पण आता घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न सुध्दा आवासून उभा आहे. त्यात आईंला देखील कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे.
राज्याने मदत करण्याची केली मागणी
बहिण लॉकडाऊनपूर्वी नोकरी करीत होती. पण लॉकडाऊनमुळे ती देखील घरीच आहे. कोणत्याही सरकारी योजनेत स्वप्निलचा आजार बसत नसल्याचे सरकारी यंत्रणांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे उपचारासाठी पैसे कोठून जमा करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जर सरकार मदत करीत नसेल तर किमान इच्छामरणाची परवानगी द्यावी. अनुवंशिक आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी कायद्याचा आधार नसल्याने अशा व्यक्तींना दिव्यांग दर्जा द्यावा, जेणोकरून त्यांना दिव्यांगासाठी असणाऱ्या सुविधा मिळून त्यांचे जीवन थोडेतरी सुसह्य होईल. गेल्या दोन महिन्यापासून स्वप्निलची टिट्रमेंट पैशाअभावी बंद आहे. आता टिट्रमेंट सुरू केली तरी पुन्हा रिकव्हर होण्यासाठी स्वप्निलला काही कालवधी लागणार आहे. सरकारने नोकरी दिल्यास रिकव्हर झाल्यानंतर जाण्याची स्वप्निलची तयारी आहे.