‘आमचा प्रेक्षक आमची जबाबदारी’; पूर्ण क्षमतेने नाट्यगृहे सुरू करा

06 Feb 2021 22:04:21

रंगभूमी _1  H x


मुंबई ( गायत्री श्रीगोंदेकर) :
केंद्र सरकारने नुकतीच नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार चित्रपट व नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. सध्या ५० टक्के उपस्थितीत जरी हा व्यवसाय सुरू झाला असला तरीही या क्षेत्राला अद्यापही कोरोनानंतर उभारी मिळू शकली नाही, म्हणूनच आता राज्य सरकारनेही १०० टक्के प्रेक्षक उपस्थितीत नाट्यगृहे व सिनेमागृहे सुरू करावीत, अशी मागणी आता निर्मात्यांकडून होत आहे.


“आज नाट्यक्षेत्राला उभारी मिळावी म्हणून कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्वच टीम मोठ्या वर्गासमोर-प्रेक्षकांसमोर येण्याचे धाडस करत आहेत. लोकांचा सध्या सिनेमापेक्षाही नाटकांना प्रतिसाद अधिक आहे. नाटक हे ‘लाईव्ह परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये येत असल्याकारणाने त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी असणारा खर्चही वेगवेगळा आहे. अशा परिस्थितीत नाट्यक्षेत्राचे कंबरडे मोडले असून, याचा विचार राज्य सरकारने करावा आणि लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे,” असे ‘व्यावसायिक नाट्यनिर्माता संघा’चे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना म्हणाले.



गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना साथीमुळे बंद झालेली नाट्यगृहे व सिनेमागृहे परिस्थितीचा आढावा घेत ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र, सभागृह क्षमतेच्या फक्त ५० टक्के लोकांनाच प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली होती. केंद्राच्या याच आदेशानुसार आणि नाट्यनिर्मिती संस्थांनी वारंवार केलेल्या मागणीनंतर राज्यातील नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू झाली. मात्र, तरीही कोरोनाकाळात या क्षेत्राचा बिघडलेला गाडा अद्याप रुळावर आलाच नाही. नाट्यगृहांमधील तिकीटविक्री पूर्ण होत असली आणि नाट्यगृहांबाहेर ’हाऊसफुल्ल’चे फलक लागत असले, तरी तिकीटविक्रीतून एका प्रयोगासाठी होणारा खर्चही भरून निघत नसल्याने आता शासनाने याची दखल घेत पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरू करावीत, अशी मागणी नाट्य व सिनेनिर्मात्यांकडून होत आहे.
राज्य सरकारचे ब्रीदवाक्य आहे, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ त्याचप्रमाणे आमचा प्रेक्षकच आमचे कुटुंब आहे, त्यामुळे ‘माझा प्रेक्षक, माझी जबाबदारी’ म्हणत आम्ही जबाबदारी घेतो, तुम्ही काळजी घ्या, असे आवाहन आम्ही प्रत्येक प्रयोगादरम्यान करतो. कलाकारही प्रेक्षकांना वेळोवेळी कोरोनापासून बचाव करण्याबाबत सूचना करतात. नाटकांना प्रतिसाद वाढतो आहे. नाट्यक्षेत्राला उभारी मिळावी म्हणून राज्य सरकारनेही १०० टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरू करावी.

- राहुल भंडारे, प्रमुख कार्यवाह, 
व्यावसायिक नाट्यनिर्माता संघ


नाट्यक्षेत्राला उभारी मिळावी याकरिता राज्य सरकारकडून उदासीनता दिसून येते. आम्ही आत्ताही सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन काटेकोरपणे करत आहोत. पालिकेअंतर्गत येणारी नाट्यगृहे जरी सवलत देत असली, तरी खासगी नाट्यगृहे कोणतीही सवलत देत नसल्याने आमचा व्यवसाय तोट्यात आहे. राज्य सरकारने नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन निर्मितीसाठी ‘नाट्यनिर्मिती अनुदान’ जाहीर केले होते. मात्र, त्याचे निकष काय असणार? ती मदत कोणाला मिळणार आणि कधी मिळणार? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.

- संतोष जढाळ, निर्माता, मनश्री आर्ट्स
Powered By Sangraha 9.0