कोलकता - पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गृहमंत्रालयाने राज्यात पॅरा मिलिटरी फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वाढलेला हिंसाचार लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर केलेली कुरघोडी आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार वाढला आहे. भाजप आणि तृणमुल काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांचा जीव जात आहे. तृणमूल सोडून भाजपामध्ये आलेले अरिंदम भट्टाचार्य यांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्यासाठी भिंतीवर लिहलेल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, "सात दिवसांच्या आत शांतीपूरला सोडा, नाही तर आपल्या हत्येस आपण जबाबदार असाल." अरिंदम यांना या घटनेची माहिती असल्याने त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि म्हटले की मी शांतीपूर सोडणार नाही.
३ जानेवारीच्या रात्री भाजप नेते कृष्णेंदू मुखर्जी यांच्या गाडीवर गोळीबारही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) शिष्टमंडळाने राज्यसभेचे खासदार स्वप्नदास गुप्ता यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाला पत्र लिहून मध्यवर्ती फौजदारी राज्यात तैनात करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि बीएसएफच्या १२५ तुकड्या २५ फेब्रुवारीपर्यंत बंगालमध्ये पोहोचतील. पश्चिम बंगाल सरकारला या तुकड्या तैनात करण्याबाबतची योजना आखण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना प्रोटोकॉल लक्षात ठेवून राज्य सरकारला या तुकड्यांच्या गरजा भागवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. या तुकड्या संवेदनशील भागात तैनात केल्या जातील. सीएपीएफ नोडल अधिकारी लवकरच यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा सुरू करणार आहे.