इंडोनेशियात 'जय श्रीराम' : केनकाना केचक नृत्याने रामकथेची पुनरावृत्ती!

29 Dec 2021 14:58:36

Ramayan_1
 
 
 
जकार्ता : मुस्लीमबहुल राष्ट्र मानल्या जाणाऱ्या इंडोनेशियातील बाली येथे केनकाना केचक नृत्याच्या परंपरेमुळे यंदाही 'जय श्रीराम'चा जयघोष घुमला. मुस्लीम देश म्हणून गणल्या जाणाऱ्या या देशात बालीमध्ये ८५ टक्के नागरिक हिंदू आहेत.
 
 
 
नववर्षाचे स्वागत म्हणून केनकाना पार्कमध्ये 'गरूड विष्णू केनकाना केचक नृत्य' सादर करण्यात आले. रामायणावर आधारित या नृत्यामध्ये 'सीताहरण' हा प्रसंग दाखविण्यात आला. शंभरहून अधिक नृत्यकरी वानरसेनेच्या रुपात सहभागी होती. वानरसेनेतील हनुमानाचा अवतार यावेळी प्रमुख आकर्षण ठरला होता. प्रभू श्रीरामचंद्रांची मनोहर भूमिकाही यावेळी भक्तांनी साकारली होती. संपूर्ण वानरसेना रावणाला हरवण्यासाठी सज्ज होती.
 
 
 
 
हा रंगमंचावरील थरार अनुभविण्यासाठी अनेक यात्रेकरू आणि पर्यटक मोठ्या संख्येने केनकाना पार्कमध्ये पोहोचले होते. त्या ठिकाणी गरूड विष्णूची ३९३ फूट उंच प्रतिमा उभारण्यात आली होती. ही प्रतिमा बनवण्यास २५ वर्ष लागली. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या मानाने ही प्रतिमा अधिक रूंद आहे. यात असणाऱ्या गरूडाचे पंख ६० मीटर लांबीचे आहेत.
 
 
 
गणपती झाले विराजमान...
बालीची वैशिष्ट्यं म्हणजे इथल्या प्रत्येक घराच्या आणि हॉटेलबाहेर केळीच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळीत देव-देवतांसाठी काही फुलं आणि चमचाभर भात ठेवला जातो. इथल्या प्रत्येक घरात आणि इमारतींच्या दारावर गणपतीच्या प्रतिमा आहे. इथलं प्रत्येक घर हे मंदिराप्रमाणेच असल्याच भास होतो. इथे हिंडताना हिंदू धर्माशी निगडीत सर्व कलाकृती पाहून मनाला प्रसन्नता मिळते.
 
 
 
इंडोनेशिया हिंदूंसाठी का महत्वाचे राष्ट्र?
१. दक्षिण भारतीय सागरी व्यापाऱ्यांमार्फत हिंदू धर्म आणि संस्कृतीचा इंडोनेशियात प्रसार
 
२. इंडोनेशियन राजघराण्यांनी भारतीय धर्म आणि संस्कृतीचे स्वागत केले.
 
३. इथल्या प्रत्येकाने भारतातील अध्यात्मिक कल्पनांचा स्वीकार केला.
 
४. हिंदू आणि बौध्द या दोन्ही धर्मांना इंडोनेशियन बेटांनी स्वीकारले.
 
५. छाया कठपुतलीद्वारे रामायणाच्या कथेने हिंदू धर्माचे पुनरुत्थान करण्यास मदत केली.
 
६. इंडोनेशियामध्ये, रामायण हा संस्कृतीचा खोलवर रुजलेला एक पैलू आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0