वायू तत्वाचा अनुभव घेतलेले महाबली अतिश्रेष्ठ साधक लेखकाला अजून भेटले नाहीत. लेखक हे सर्व स्वानुभवातून लिहीत आहे. आकाश तत्वाची स्पंदनात्मक अवस्था म्हणजे वायू तत्व होय. एकच गती विरूद्ध दिशेने भ्रमण करते तेव्हा तिला ‘काळ’ असे मानतात. परंतु, काळ एकच आहे.
‘पातंजल योगसूत्रा’त म्हटलेले आहे, ‘अतितानागतं स्वरूपतोऽस्त्यध्यभेदात् धर्माणाम्।’ ४।१२॥ अर्थात, विरुद्ध दिशेने जाणारी गती भासमान झाली की, काळधर्माची, म्हणजे ‘अतीत’ व ‘अनागत’ (भविष्य) यांची जाणीव होते. वास्तविक काळ एकच आहे आणि तो म्हणजे वर्तमान. वायू तत्त्वाचा साधक हनुमान, गरुड, नारद यांच्याप्रमाणे एकाच खंडात असूनही त्रिखंडात व वर्तमान काळात असूनही अतीतात, अनागतात राहतो. वायू तत्त्वाचे असे कालातीत महान साधक नारद, गरूड आणि हनुमान हे आहेत.
आकाश तत्वाचे अनुभव
’काश’ म्हणजे संधारण करणे आणि ‘आकाश’ म्हणजे अंतर्बाह्य संधारण करणे आणि तेसुद्धा ब्रह्मांडाला एक क्षणात म्हणजेच क्षणरहित अवस्थेत! वायू तत्वाची स्पंदनरहित स्वस्थ अवस्था म्हणजे आकाश तत्व आहे. याचे नासदीय सूक्तामध्ये सुंदर केले आहे, हे वैदिक ऋषींचे स्वानुभव आहेत. त्यांची शब्दातीत अवस्था शब्दबद्ध केलेली आहे. आकाश तत्वाचे व ‘परा’ तत्वाचे वर्णन खूप सुंदर आहे. त्यात वर्णिलेल्या अवस्थारहित अवस्थेचा अनुभवरहित अनुभव ज्या परमश्रेष्ठ साधकाला प्राप्त होईल, तो धन्य होय. तो स्वतः परमात्माच आहे, तोच श्रीराम, तोच श्रीकृष्ण आणि तोच श्रीविष्णू आहे. म्हणून वंगीय श्रीरामकृष्ण परमहंस स्वतःला तोच राम आणि तोच कृष्ण मानत होते.वायू तत्वाचे अनुभव पार करून साधक आता स्थिर होतो. आता तो त्या परमपदापासून माघारी फिरत नाही. या परमहंस अवस्थेचे वर्णन गीतेत आहे, ‘यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम।’ परंतु, ही परमावस्था एकदम येत नाही. साधकाला प्रथम ‘नील’ चिन्ह असलेले वर्तुळ दिसते. नंतर ती नीलिमा हळूहळू वाढत जाऊन साधकाच्या शरीरासहित सारा ब्रह्मांडमय बनतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या काव्यात या अवस्थेचे सुंदर वर्णन केलेले आहे, ते इच्छुकांनी अवश्य वाचावे. ते म्हणतात, “हे आकाश निळे आहे आणि परमव्योमसुद्धा निळे आहे. त्यांच्याबरोबर ज्ञानेश्वरसुद्धा निळा आहे, तेव्हा मी आता कसे करू? आता मी उरलो नाही, आहे ती केवळ नीलिमा.” आकाश तत्वाचे योगी संत ज्ञानेश्वर महाराजांनी अतिसुयोग्य व सुंदर वर्णन केलेले आहे. हा केवळ कल्पनाविलास नसून तो आकाश तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव आहे.
साकारपिंडी साधकाला हा अनुभव अगम्य आणि असह्य असतो. साकारपिंडी साधकांना प्रत्यक्ष चतुर्भुज देहधारी भगवंताची प्राप्ती हवी असते. म्हणून त्यांच्या अंतर्यामातील मनोरूप भगवान निराकारातून साकार बनून श्रीकृष्ण किंवा श्रीराम ही रूपे धारण करून सुदर्शनचक्र, बासरीसह भक्तांना दर्शन देतो व त्यांची मनःशांती करतो. एकच वस्तू, परंतु मनोव्यापारामुळे त्यात भिन्नता येते. मन नष्ट झाल्यावर साधक निराकारात जातो. तेथे अनुभवाचा अभाव आहे. केवळ अवर्णनीय अनिर्वचनीय आणि अद्वैत अशी स्थिती आहे, म्हणून सर्व शून्य आहे.
श्रीविष्णू, श्रीराम आणि श्रीकृष्ण
पुराणामध्ये भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना भगवान श्रीविष्णूचे अवतार मानलेले आहे. या तिन्ही देवता आकाश तत्वाच्या नीलश्याम वर्णाच्या आहेत. आकाश तत्वाचे साधक आणि म्हणून देवतासुद्धा त्रिभुवन सुंदर दाखविलेल्या आहेत. आद्य शंकराचार्य, योगी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, तुलसीदास आणि भक्त कबीर हे सर्व खरेखुरे श्रेष्ठ संत आणि योगी परमसुंदर होते. आकाश तत्वाच्या साधकांची संख्या फारच कमी असते. सर्वच जणांना राम किंवा कृष्ण यांचे दर्शन होऊ शकत नाही. कुरुप शरीर असलेल्या साधकाला आकाशतत्वीय देवतेचा दर्शन साक्षात्कार होऊ शकत नाही. जर त्याला दर्शन साक्षात्कार घ्यावयाचा असेल, तर त्याला या शरीराचा त्याग करून पुढील जन्मात सुंदर शरीर मिळविले पाहिजे. जीवात्म्याला अनुरूप शरीरसुद्धा परिपूर्ण आणि सुंदर असले पाहिजे. कारण, शरीर हे साधकाच्या ध्येयाचे उपकरण (साधन) आहे. परंतु, सर्व सुंदर शरीराचे लोक चांगले साधक-संत होतीलच असे नाही.
वायू तत्वाच्या साधकाची वाणी मधुर होते. हीच गोष्ट आकाश तत्वाच्या साधकाचीही आहे. त्यांची तृष्णा आणि क्षुधा अगदीच कमी म्हणजे आहे की नाही, अशी होते. विश्वामित्र ऋषींनी भगवान राम आणि लक्ष्मण यांना बलातिबला विद्या शिकविली होती. त्यामुळे त्यांची क्षुधा-तृष्णा नष्ट झाली होती. या सर्व कथांमध्ये साधना रहस्य भरलेले आहे. द्रौपदीची ‘सूर्यथाळी’ म्हणजे अशीच अवस्था होती. ती प्रत्यक्ष जड थाळी नव्हती. आकाश तत्वाच्या साधकाचे शरीर आकाशासारखे हलकेफुलके होऊन जाते. लठ्ठ शरीर असलेली व्यक्ती साधक असूच शकत नाही किंवा आकाश तत्वाचा परमसंतही बनू शकत नाही. खरे योगी आणि संत हे सडसडीत शरीराचे असतात, मांसल नसतात. आकाश तत्वाची साधना साध्य केल्यावर साधक दूरदर्शन, दूरश्रवण आणि आकाशगमन करू शकतो. परंतु, असे महान साधक इतरांसमोर आपल्या दिव्यावस्थेचे प्रदर्शन करीत नाहीत. त्यांची राहणी फार साधी असते. त्यांच्या दृष्टीने चमत्कार दाखविणे हा एक दंभ आहे. चमत्कार दाखविणार्या तथाकथित महाराजांना संत न मानता ढोंगी मानले पाहिजे. खराखुरा संत किंवा योगी कधीही चमत्कार दाखविणार नाही.
भक्तांच्या अवस्थेनुसार भक्तांना चमत्कार दिसतात. सूर्य प्रकाशतो, प्रकाश देत नाही, तद्वत संत चमत्कार दाखवित नाहीत. आकाश तत्वाचे साधक सर्वांतर्यामी असतात. ते दयाळू, सर्वाभूती भगवान मानणारे, क्रोधहीन आणि निर्मम असतात. त्यांच्या दृष्टीने सर्व संसार भगवानरूप परंतु मायेने भरलेला असतो. म्हणून ते आत्मरुपात राहून संसार करतात, पण संसारात गुंतून पडत नाहीत. ते धन, सन्मान आणि द्वैत यांच्यापलीकडे गेलेले असतात. हे आकाश तत्वाचे अनुभव आहेत. आकाश तत्व जर एकच आहे, तर त्या तत्वाचा अनुभव श्रीविष्णू, श्रीराम आणि श्रीकृष्ण अशा भिन्न भिन्न देवतांच्या रुपाने का यावा? त्याचे रहस्य ‘स्वरोदयशास्त्रा’त आहे. आपल्या शरीरात तीन योग्य नाड्या असतात. उजव्या बाजूला ’पिंगला’ म्हणजे ‘सूर्यनाडी’, डाव्या बाजूला ’ईडा’ म्हणजे ‘चंद्रनाडी’ आणि मध्यभागी ’सुषुम्नानाडी’ आहे. ‘सुषुम्नानाडी’ उघडल्याशिवाय आकाश तत्वदर्शन होत नाही. ‘सुषुम्ने’मध्ये आकाशदर्शन म्हणजे श्रीविष्णूदर्शन आहे. ‘सुषुम्ने’मध्ये थोडा ‘चंद्रनाडी’चा अंश असल्यामुळे कृष्णदर्शन होते. म्हणून श्रीराम सूर्यवंशी आणि कृष्ण चंद्रवंशी दाखविलेले आहेत. याप्रकारे योग व नाडी याचे ज्ञान असणार्या शास्त्राला ‘स्वरोदयशास्त्र’ म्हणतात. (क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)