पुणे : ''राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा असून, त्यांच्या मागण्या रास्त आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या मागण्या त्वरित मान्य करून ह्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढावा'' अशी मागणी भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळेज केली. हर्षवर्धन पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा म्हणून इंदापूर येथील एसटी आगारात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. ४ नोव्हेंबर पासून इंदापूर येथील एसटी आगारात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन चालू आहे. हर्षवर्धन पाटील यांनी त्या ठिकाणी भेट दिली असता आंदोलनकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.
''एसटी कर्मचारी राज्यातील जनतेची अहोरात्र सेवा करत असतात, कोरोना काळात आपली सेवा बजावत असताना राज्यातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे निधन झाले. एसटी प्रशासनाचा अनागोंदी कारभार आणि सत्ताधारी आघाडीने केलेल्या दुर्लक्षामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक विवंचना होत असल्याने राज्यातील तब्बल ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ह्या बिकट परीरस्थितीला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचं जबाबदार आहे'' असाही आरोप या वेळेज हर्षवर्धन पाटील यांनी केला.
इंदापूर एसटी आगारातील एकूण ३१५ कर्मचारी संपावर गेले असून संपूर्ण मागण्या मान्य होई पर्यंत काम बंद आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे या वेळेज इंदापूर येथील एसटी कार्मचाऱ्यांनी सांगितले.