अष्टलक्ष्मी स्तोत्रम्

04 Nov 2021 14:02:13

lakshmi_1  H x



आज लक्ष्मीपूजन. लक्ष्मी भारताच्या सर्वदूर भागात विविध रुपांत पूजली जाते. तिचा उत्साहाने केलेला उत्सव संपूर्ण जगाला कौतुकाने बघण्यास ती भाग पाडते. अशाच लक्ष्मीच्या ‘अष्टलक्ष्मी स्तोत्रम्’ याविषयी केलेले हे चिंतन...



ती करायला रचलेले काव्य म्हणजे ‘स्तोत्र.’ त्या इष्ट देवतेच्या परिपूर्ण गुणांचे वर्णन म्हणजे स्तोत्र. अशाच ‘अष्टलक्ष्मी स्तोत्रा’बद्दल ऐकताना अर्थ जाणून घेण्याची इच्छा झाली आणि त्यातून एका एका श्लोकाचे चिंतन सुरू झाले ‘अष्टलक्ष्मी’ अर्थात ‘आदिलक्ष्मी’, ‘धनलक्ष्मी’, ‘विद्यालक्ष्मी’, ‘धान्यलक्ष्मी’, ‘धैर्यलक्ष्मी’, ‘संतानलक्ष्मी’, ‘विजयलक्ष्मी’, ‘राजलक्ष्मी’ या आहेत. या सर्व प्रसन्न व्हाव्या, यासाठी या स्तोत्राचे पठण अधिक लाभदायक आहे.

आदिलक्ष्मी
सुमनसवन्दित सुन्दरी माधवी
चन्द्र सहोदरी हेममये।
मुनिगणमण्डित मोक्षप्रदायिनी मन्जुळभाषिणी वेदनुते॥
पञ्कजवासिनी देवपूजित
सद्गुणवर्षिणी शान्तियुते।
जयजय हे मदुसूदन कामिनी आदिलक्ष्मी सदा पालय ते॥१॥

आपल्या मूळ स्तोत्राचे ज्ञान होणे, हीच ‘आदिलक्ष्मी’ होय. मग नारायण आपल्या नजीक असतात. ज्याला आपल्या स्तोत्राचे ज्ञान होते, तो सर्व भयापासून, भीतीपासून मुक्त होतो आणि संतोष, आनंद प्राप्त करतो. हीच ‘आदिलक्ष्मी’ होय. ‘आदिलक्ष्मी’ निव्वळ ज्ञानी व्यक्तींजवळ असते आणि ज्याच्याजवळ ‘आदिलक्ष्मी’ असते समजा की, त्याला ज्ञान प्राप्त झाले आहे.

धान्यलक्ष्मी
अयि कलिकल्मषनाशिनी कामिनी वैदिकरुपिणी वेदमये।
क्षीरसमुद्भव मंगलरुपिणी मन्त्रनिवासिनी मन्त्रनुते।
मन्गलदायिनी अम्बुजवासिनी देवगणाश्रित पादयुते।
जयजय हे मधुसूदन कामिनी धान्यलक्ष्मी सदा पालयते॥२॥

‘धनलक्ष्मी’ जवळ असली, तरी ‘धान्यलक्ष्मी’ ‘आहे’ असे म्हणू शकत नाही. धन आहे, परंतु काही खाऊ शकत नाही. भाकरी, भात, साखर, मीठ खाऊ शकत नाही. याचाच अर्थ ‘धनलक्ष्मी’ आहे, पण ‘धान्यलक्ष्मी’चा अभाव आहे. ग्रामीण भागात मुबलक धान्य असते. तेथील लोक दोन-चार दिवस कोणालाही खायला-प्यायला घालायला हयगय करत नाहीत. कारण, धन नसले तरी धान्य आहे. तेथील लोक छानपैकी खातात. शहरी लोकांच्या तुलनेत तेथील लोकांच्या आहाराची गुणवत्ता आणि प्रमाणदेखील जास्त असते. धान्याचा वापर आणि सन्मान करणे म्हणजेच ‘धान्यलक्ष्मी.’ जगात सर्वांना भोजन गरजेचे आहे. अन्न खराब करू नका, वाया घालवू नका. अन्नाचा सन्मान करणे, हीच ‘धान्यलक्ष्मी’ होय.

धैर्यलक्ष्मी
जयवरवर्णिनी वैष्णवी भार्गवी मन्त्रस्वरुपिणि मन्त्रमये।
सुरगणपूजित शीघ्रफलप्रद ज्ञानविकासिनी शास्त्रनुते।
भवभयहारिणि पापविमोचनी साधुजनाश्रित पादयुते।
जयजय हे मदुसूदन कामिनी धैर्यलक्ष्मी सदा पालयते॥३॥

घरी सर्व काही आहे-धन आहे, धान्य आहे, सर्व संपन्नता आहे, पण आपण भित्रे आहोत. श्रीमंत कुटुंबातील मुले बहुतेकवेळा भित्री असतात. हिंमत म्हणजे धैर्य एक संपत्ती आहे. नोकरीतील लोक नेहमी आपल्या वरिष्ठांना घाबरून असतात. व्यापारी निरीक्षकांना घाबरून असतात. आम्ही नेहमी अधिकार्‍यांना विचारतो की, तुम्हाला कसा साहाय्यक आवडेल- तुमच्या समोर नेहमी घाबरलेला की, धैर्याने जो तुमच्याशी संपर्क करेल? जो सतत तुमच्या समोर घाबरलेला असेल तो नेहमी खोटे बोलत राहील, खोट्या गोष्टी, सांगत राहील. अशा व्यक्तीसोबत तुम्ही काम करू शकणार नाही. तुम्ही असा साहाय्यक पसंत कराल, जो धैर्याने काम करेल आणि इमानदारीने तुमच्याशी बोलेल. हे आपल्या आतमध्ये अशी शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे जी सतत आपल्या सोबत असते. ही ‘धैर्यलक्ष्मी’ होय. ‘धैर्यलक्ष्मी’ असली तरच जीवनात प्रगती होते. ज्या प्रमाणात ‘धैर्यलक्ष्मी’ असेल, त्या प्रमाणातच प्रगती होईल. व्यापार असो किंवा नोकरी, ‘धैर्यलक्ष्मी’ची आवश्यकता असतेच.

गजलक्ष्मी
जयजय दुर्गतिनाशिनी कामिनी सर्वफलप्रदा शास्त्रमये।
रथगज तुरगपदादि समावृत परिजनमण्डित लोकनुते।
हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित तापनिवारिणी पादयुते।
जयजय हे मधुसूदन कामिनी गजलक्ष्मी सदा पालयते ॥४॥

‘राजलक्ष्मी’ म्हणा किंवा ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणा, दोन्ही एकच आहेत - सत्ता. एखादी व्यक्ती मंत्रिपद प्राप्त करून काहीही सांगायला, बोलायला लागली, तरी त्याचे कोणीही ऐकत नाही. त्याची सत्ता कोणीही मान्य करत नाही. बर्‍याच कार्यालयातदेखील असे दिसते. मालकाचे कोणीही ऐकत नाही, पण क्लार्कचे ऐकतात. त्याचा हुकूम चालतो. एका ‘ट्रेड युनियन’च्या प्रमुखाजवळ जितकी राज अर्थात ‘गजांतलक्ष्मी’ असते तेवढी शहरातील ‘मिल मालका’कडे नसेल. शासन करण्याची क्षमता म्हणजे ‘राजलक्ष्मी’ अर्थात ‘गजांतलक्ष्मी’ आहे.

संतानलक्ष्मी
अयि खगवाहिनी मोहिनी चक्रिणी रागविवर्धिनी ज्ञानमये।
गुणगणवारिधी लोकहितैषिणी
स्वरसप्त भूषित गाननुते।
सकल सुरासुर देवमुनीश्वर
मानववन्दित पादयुते।
जयजय हे मधुसूदन कामिनी सन्तानलक्ष्मी सदा पालयते॥५॥

अशी मुले जी प्रेम देणारे असतील, प्रेमाचे नाते टिकवणारी असतील, तर ती ‘संतानलक्ष्मी’ होय. ज्या मुलांमुळे ताणतणाव येत नाही किंवा ताण कमी होतो, ती ‘संतानलक्ष्मी’ होय. ज्या मुलांमुळे सुख, समृद्धी, शांती मिळेल, ती ‘संतानलक्ष्मी’ होय. ज्या मुलांमुळे भांडण, तणाव, त्रास, दुःख, पीडा होईल ती ‘संतानलक्ष्मी’ नव्हे.

विजयलक्ष्मी
जय कमलासनी सद्गतिदायिनी ज्ञानविकासिनी गानमये।
अनुदिनमर्चित कुंकुमधूसर भूषित वासित वाद्यनुते॥
कनकधरास्तुति वैभव वन्दित शन्कर देशिक मान्य पदे।
जयजय हे मधुसूदन कामिनी विजयलक्ष्मी सदा पालयते ॥६॥

काही व्यक्तींकडे सर्व साधनसुविधा असतात, तरीदेखील ते जे काही करतील त्यात त्यांना यश मिळत नाही. जे काम हातात घेतील ते काम बिघडले म्हणून समजा, काम होणारच नाही. म्हणजे ‘विजयलक्ष्मी’ची कमी आहे. बाजारातून काहीतरी आणायला गेले तर ते मिळणार नाही, रिक्षात बसतील, तर रिक्षा बिघडेल, टॅक्सीने बाजारात पोहोचले, तर दुकाने बंद झाली असतील. तुम्हाला असे वाटेल की, मी स्वतः जाऊन काम केले असते तर बरे झाले असते. अगदी छोटे कामदेखील करू शकणार नाहीत. येथे ‘विजयलक्ष्मी’ कमी असते. परिस्थिती तरी विपरित असेल किंवा काही कारणे तरी सांगतील. कोणत्याही कामात सफलता न मिळणे म्हणजे ‘विजयलक्ष्मी’ची कमतरता असं म्हणता येईल.

विद्यालक्ष्मी
प्रणत सुरेश्वरी भारती भार्गवी शोकविनाशिनी रत्नमये।
मणिमयभूषित कर्णविभूषण शान्तिसमावृत हास्यमुखे।
नवनिधिदायिनी कलिमलहारिणी कामित फलप्रद हस्तयुते।
जयजय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी सदा पालयते ॥७॥

देवी लक्ष्मी आणि सरस्वतीचे चित्र पाहिले की, लक्षात येईल की, लक्ष्मी पाण्याच्या वर कमळामध्ये स्थित असते. पाणी अस्थिर असते म्हणून लक्ष्मीदेखील पाण्याप्रमाणे चंचल आहे. मात्र, विद्या, लक्ष्मी, सरस्वती पाषाणावर स्थिर आहे. विद्या, ज्ञान येते तेव्हा जीवनात स्थिरता येते. आपल्या हातून विद्येचादेखील दुरुपयोग होऊ शकतो. शिकणे हा एकमेव उद्देश असेल, तर ती ‘विद्यालक्ष्मी’ होऊ शकत नाही. शिकणे आणि शिकल्यावर त्या शिक्षणाचा वापर कराल तेव्हा ती ‘विद्यालक्ष्मी’ होईल.

धनलक्ष्मी
धिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि धिन्धिमि दुन्दुभि नाद सुपूर्णमये।
घुमघुम घुंघुम घुंघुम घुंघुम
शन्खनिनाद सुवाद्यनुते॥
वेदपुराणेतिहास सुपूजित
वैदिककमार्ग प्रदर्शयुते।
जयजय हे मधुसूदन कामिनी
धनलक्ष्मी सदा पालयते॥८॥

‘धनलक्ष्मी’ सर्वांना माहिती आहेच, धनाच्या इच्छेपोटी आणि अभावामुळे माणूस अधर्म करतो. हिंसा, चोरी, फसवणूक यासारखी चुकीची कामे करतो. परंतु, डोळे उघडून पाहत नाहीत की, आपल्याजवळ काय आहे. जोरजबरदस्तीने धनलक्ष्मी येत नाही, आली तरी सुख, आनंद देत नाही, तर निव्वळ दुःखच देते. काही व्यक्ती धन म्हणजेच लक्ष्मी मानतात आणि तिला प्राप्त करणे हेच लक्ष्य बनवतात. मरेपर्यंत पैसे गोळा करतात, बँकेत ठेवतात आणि मरून जातात. ज्यांनी धन हेच लक्ष्य बनवले आहे ते दुःखीच होतात. काही व्यक्ती धनाला दोष देतात. पैसे नाहीत तेच ठीक आहे, पैसा चांगला नाही, पैशांमुळे हे घडते-ते घडते, हा सर्व गैरसमज आहे. धनाचा सन्मान करा, सदुपयोग करा, मग धनलक्ष्मी स्थिर होईल. लक्ष्मीची पूजा करा. लक्ष्मी चंचल असते, म्हणजे ती सतत चालत राहते. चालत राहिली, तरच तिचे मूल्य आहे ना! बंद राहिली तर तिचे काहीही मूल्य नाही. म्हणून धनाचा सन्मान आणि सदुपयोग करा.

खरंतर या आठ प्रकारची लक्ष्मी एक दुसर्‍याशी संलग्नित आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे हे आठही धन कमी-अधिक प्रमाणात असतात. आपण त्यांचा किती सन्मान करतो, वापर करतो ते आपल्यावर अवलंबून आहे. या आठ लक्ष्मींचे नसणे याला ‘अष्ट दारिद्रय’ म्हणतात. लक्ष्मी असो किंवा नसो नारायण नक्की प्राप्त होतील. कारण नारायण दोन्हीत आहेत. लक्ष्मी-नारायण आणि दरिद्री नारायण. दरिद्री नारायणाला भोजन दिले जाते, तर लक्ष्मी-नारायणाची पूजा केली जाते. सार्‍या जीवनाचा प्रवाह हा दरिद्री नारायणाकडून लक्ष्मी-नारायणाकडे, दुःखाकडून समृद्धीकडे आणि जीवनातील रुक्षपणाकडून अमृताकडे जात असतो आणि त्यामुळेच या अष्टलक्ष्मीची नियमित उपासना करणे इष्ट ठरेल असे वाटते. ही दिवाळी सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीची जावो, हीच अष्टलक्ष्मीचरणी प्रार्थना.

शुभ दीपावली...

- सर्वेश फडणवीस



Powered By Sangraha 9.0