खासदार निलंबनाविरोधात उद्या राहुल गांधींच्या नेतृत्वाअंतर्गत विरोधकांचे आंदोलन

30 Nov 2021 19:48:58
rahul gandhi _1 &nbs



नवी दिल्ली -
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी राज्यसभेतील खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू केला. यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरात तीन वेळा तहकूब करावे लागले. गदारोळ न थांबल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत बुधवारपर्यंत (१ डिसेंबर २०२१) तहकूब करण्यात आले. त्याचवेळी राज्यसभेतही विरोधकांनी हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला.


राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या १२ खासदारांच्या प्रकरणावरून विरोधक संतापले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मार्शलसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आता १२ निलंबित विरोधी खासदार राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या निलंबनाविरोधात युक्तिवाद करणार आहेत. यासोबतच ते उद्या संसदेतील गांधी पुतळ्यासमोर उपोषणाला बसणार आहेत.

खासदारांचे निलंबन मागे घेण्यास सभापतींनी नकार दिला
तत्पूर्वी, राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी फेटाळून लावली. निलंबनाचा निर्णय घटनात्मक असून तो मागे घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले. नायडूंच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. निलंबित खासदारांनी माफी मागावी, असे सरकारचे म्हणणे आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “कालही आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही माफी मागावी. पण त्यांनी ते नाकारले, स्पष्टपणे नाकारले. त्यामुळे मजबुरीतून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी सभागृहात माफी मागितली पाहिजे.

१२ खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “गेल्या अधिवेशनात विरोधकांचा हेतू अधिवेशन चालू न देण्याचा होता. सभापतींचा अपमान करण्यात आला, कागदपत्रे फेकण्यात आली. लेडी मार्शलला दुखापत झाली. त्यामुळे ही कारवाई होणे गरजेचे होते. सदस्याने माफी मागावी." काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की, सॉरी कशासाठी? संसदेत जनमत वाढवायचे?
Powered By Sangraha 9.0