मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली वेतनवाढ आणि कामावर हजर राहण्याचे अल्टिमेटम दिल्यानंतर काही कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. एसटी आगारातून धावू लागली आहेत. एसटी कामगार संघटना कृती समिती अद्याप विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. याच संदर्भात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी अनिल परब यांची त्यांच्या बांद्रा इथल्या कार्यालयात भेट घेवून वेतनवाढीतल्या तफावतीचा प्रश्न कानावर घातला. विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याची कामगार संघटनांची भूमिका कायम आहे.
याबद्दल बोलताना परब म्हणाले, "कामावर येणाऱ्या कामगारांना रोखलं तर कारवाई निश्चित होणार. जे जे कामगार कामावर परतले आहेत, त्यांचा अहवाल मागवून पुढील निर्णय घेणार आहोत. तसेच यापुढे जे कामगार कामावर येणार नाहीत, त्यांना नो वर्क नो पे या नियमानुसार कारवाई करावी लागेल. तशी कारवाई करण्यास आम्हाला भाग पाडू नका.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कामगारांना शुक्रवार सकाळपर्यंत अल्टिमेटम दिला होता. त्याप्रमाणे महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील २१ डेपो अंशतः सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातील एकूण ९ हजार ७०५ एसटी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत, असेही परब म्हणाले.