नवी दिल्ली : भारतीय संघ आणि न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये खेळवण्यात येत आहे. सामन्याआधी टिम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने एक जुनी परंपरा संघात सुरु केली आहे. भारताचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ फलंदाज सुनील गावस्कर यांनी श्रेयसला कसोटीची कॅप दिली. भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांकडून नवीन खेळाडूंना ही प्रतिष्ठित कॅप देण्याची जुनी परंपरा आहे. याआधी टी-२० मालिकेदरम्यानही द्रविडने हर्षल पटेलकडे राष्ट्रीय संघाची कॅप सोपवण्यासाठी मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या अजित आगरकरला बोलावले होते.
पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांचा दबदबा
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल हे सलामीला आले. मात्र, मयांक अग्रवालने १३ धावा करत बाद झाला आणि तिसऱ्या क्रमांकावर चेतश्वर पुजारा फलंदाजीला आला. गिल आणि पुजाराने ६१ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. त्यानंतर अर्धशतकी खेळी करत गिल ५२ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजारा देखील २६ धावांवर माघारी परतला. कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तोही ३५ धावांवर बाद झाला.
भारतीय संघाची १४५ वर ४ अशी बिकट परिस्थिती झाली होती. न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिन्सनने ३ विकेट्स घेतल्या. मात्र यानंतर कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने संयमी खेळी करत रवींद्र जडेजाच्या साथीने डाव सावरला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम श्रेयसने केला. अय्यरच्या अर्धशतकामुळे भारताने २०० धावांचा टप्पा पार केला. त्याने जडेजा सोबत अर्धशतकी भागिदारी करून टीम इंडियाला समाधानकारक स्थितीत पोहोचवले. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ विकेट्सच्या मोबदल्यात २५८ धावा केल्या आहेत. अंधुक प्रकाशामुळे खेळ ६ षटके आधी थांबवावा लागला. श्रेयस अय्यरने नाबाद ७५ जडेजाच्या नाबाद ५० धावांमुळे संघ चांगल्या स्थितीत पोहोचला.