राज्यातील हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी चौकशी करावी!

22 Nov 2021 14:51:19
Niranjan Daw akhare_1&nbs
ठाणे : त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगातील कोणत्यातरी ठिकाणच्या मशिदीची व्हिडिओ क्लीप व्हायरल केल्यानंतर राज्यात मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे झालेल्या दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करावी, या मागणीबरोबरच दंगलीच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सोपविण्यात आले.


राज्यात नुकत्याच झालेल्या दंगलीत १५ हजार ते ४० हजार लोकांच्या जमावाने रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला, या घटनेचा भाजपा निषेध करीत आहे. जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीत लोक रस्त्यावर उतरले. ते कोण्या एका पक्षाचे नव्हते वा कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. मात्र, स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरीकांवरही हल्ले केले गेले. त्यानंतर पोलिस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे.



अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे यांच्याबरोबर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, मुकेश मोकाशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा व नगरसेविका मृणाल पेंडसे, अर्चना मणेरा, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, कृष्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस विलास साठे आदींचा समावेश होता.


त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत करावी, दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक करावी, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी, भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

 

लक्ष विचलित करण्यासाठी दंगली : निरंजन डावखरे

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून, काहीही ठोस कार्य केलेले नाही. केवळ मतांचे राजकारण करण्याचे पाप केले जात आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दंगलीचे कृत्य करण्यात आले आहे, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला.




Powered By Sangraha 9.0