एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणे हे राजकारण असेल तर ते आम्ही सदैव करत राहणार

12 Nov 2021 01:04:11

चंद्रकांत पाटील _1 &
 
 
 


पुणे : महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर पासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन चालू आहे. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुटुंबाबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांचे देखील हाल होऊ लागले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. राज्य परिवहन महामंडळ आधीच तोट्यात असताना या कामबंद आंदोलनामुळे एसटीला आता रोज कोट्यावधींचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला / कामबंद आंदोलनाला राजकीय पक्ष पाठिंबा देऊ लागले आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून टीकाही होऊ लागली आहे. रोजच टीकेची झोड उडत असताना देखील सत्ताधारी काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. राज्याचे मुख्यमंत्री यांनी याबाबतीत राजकारण न करण्याच्या केलेल्या वक्तव्यावर ''एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणं हे राजकारण आहे का? आणि ते राजकारण असेल ; तर आम्ही ते सदैव करत राहणार असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनावर , ''राजकीय पक्षांनी गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी प्रतिक्रिया दिली होती. माझी सर्व विरोधकांना कळकळीची विनंती आहे कि ही वेळ राजकारणाची नाहीये हे आपण लक्षात घ्यायाला हवे.

मुख्यमंत्र्यांच्या ह्या विनंतीवर चंद्रकांत पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणं हे राजकारण आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि ते राजकारण असेल तर ते आम्ही सदैव करत राहणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे ती अत्यंत भीषणावह असून आतापर्यंत २९ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत तर मग आंदोलकांनी मोर्चासुध्दा नाही काढायचा का? असाही प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि आमचे हेच काम आहे की, लोकशाहीमध्ये चुकीच्या गोष्टींना नेहमी विरोध करणे यामुळेच सरकार ठिकाणावर राहणार आहे. कोव्हिडच्या काळातही एसटी सेवा सुरु होती. त्यांना अजूनही पगार न देता आणि अडीच हजार बोनस हातावर टेकवून त्यांची थट्टा काय करताय असाही प्रश्न त्यांनी सरकारला या वेळेज विचारला.

 
Powered By Sangraha 9.0