मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता सांगलीतून एक धक्कादायक फोटो व्हायरल होत आहे. एसटी आगारातच वडाप लावण्यात आल्याचा हा फोटो आहे. यावरुन आता राज्य सरकारवर टीका केली जात आहे. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याच्या या प्रकारावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. खासगी वडापाला एसटी आगारात येण्यास परवानगी दिलीच कशी, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी हा फोटो ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. "एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करण्यासाठी निवडलेला पर्याय आणि उद्धव ठाकरे तुम्ही निवडलेले खुर्चीसाठी अपात्र लोक या चित्रातून दोन्हींची पात्रता सिद्ध झाली. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवल्या बद्दल धन्यवाद.", असा टोला त्यांनी लगावला आहे.