भुलाबाई-भोंडला : लोकपरंपरा

    09-Oct-2021
Total Views |

lokparmopra_1  

 
विशेषत: लहान मुलींना एकत्र आणणे, त्यांना निसर्गशिक्षण देणे, वनस्पतींची ओळख करून देणे, कुटुंब संस्थेतल्या नात्यांची ओळख पक्की करून देणे, पाककृती किंवा पदार्थ ओळखणे, सजावट, मांडणी, स्वच्छता यातलं कलाकौशल्य दाखविणे, संस्कार करणं, अशा अर्थाने त्यांना शिक्षण द्यायचे ते त्यांना साजेशा अशा खेळातून, गाण्यातून. कारण, हे सर्व त्या मुलीला तिच्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणारं असतं. हा असतो भोंडला.

भाद्रपदात गौरी-गणपती झाले की, मुलींना वेध लागतात ते ‘भुलाबाई’ किंवा भोंडल्याचे. त्या अगदी वाटच बघत असतात. लहानपणी भातुकली खेळायचा जसा तिचा हक्कच असतो, तसाच हा ‘भोंडला’ किंवा ‘हादगा’ आणि ‘भुलाबाई उत्सव’ तिचा हक्काचा असतो. मनोरंजनाबरोबरच त्यातून तिला शिक्षणपण मिळत असतं. असे शिक्षण देण्याची सुरुवातीला आपली मौखिक परंपरा होती. जात्यावरच्या ओव्या, दळणकांडण करताना म्हणायची गाणी. लग्नकार्यातली किंवा शुभप्रसंगी म्हणायची मंगलगाणी, शेतातली कामे उरकताना म्हणायची गाणी, डोहाळजेवण, बारसे, पाळणा, विहीण म्हणणे, असे अनेक प्रसंग गीतातून वर्णन करून साजरे केले जायचे. पणजी, आजी यांच्याकडून नातीपर्यंत सर्व जण ही मौखिक परंपरा सांभाळायच्या. यातून मंगलमय वातावरण तयार व्हायचे, उत्साह वाढायचा आणि जीवन जगण्याची ओढ निर्माण व्हायची. कारण, जगण्यात आनंद असला तर जीवन सुसह्य होत जाते. म्हणूनच, उत्सवप्रियता आपल्या सर्वांना जास्त प्रिय होती आणि आहे. साने गुरुजींनी म्हणूनच म्हटलं आहे की, “नित्य क्रमाचे जेव्हा उत्सव होतात, तेव्हा आयुष्य ही एक आनंदयात्रा होते.”भारतीय लोकसाहित्यात अशा लोकगीतांची परंपरा समृद्ध आहे. प्राचीन वैदिक वाङ्मयात त्याची मुळे आढळतात. अगदी जन्मापासून अंत्यविधीपर्यंत जे धार्मिक विधी असतात, त्याची त्या-त्या प्रसंगाची गीते प्रत्येक भाषेत दिसतात. मग त्या त्या प्रांतातल्या ज्या परंपरा आहेत, व्रतवैकल्ये आहेत, चालीरीती आहेत, त्याचे वर्णन अशा लोकगीतातून आपल्याला घडत असते.अशा साहित्यात मुख्यत: शिव-पार्वती, राधा-कृष्ण आणि राम-सीता हा विषय समान धागा म्हणून सर्व प्रांतात दिसतो. यात प्रेम भावना, आदर्श नाते संबंध, निष्कलंक चारित्र्य, आदर्श पती किंवा कुटुंब प्रमुख, विवाहसंस्था, प्रतिष्ठा असे अनेक विषय यातून प्रसृत होत असतात. लोकसाहित्यातील अनेक प्रकारात उदा. लोककथा, बोधकथा, भारुड, ओव्या, स्त्रीगीते, उखाणे म्हणी, कूट प्रश्न, सवाल-जबाब, लोकनाट्य यातून आपल्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर जे जे प्रसंग, विधी, संस्कार होत असतात, त्या-त्या वेळचे वर्णन या गीतातून येते. आपल्या सण-उत्सवांशी निगडित किंवा ऋतू बदलांप्रमाणे ही लोकगीते असतात. मनोरंजन, कल्पकता, चातुर्य, शहाणपण यातून सांगितलेले असतं. ही गीते वेगवेगळ्या भाषेत जरी असली तरी त्यांचा आविष्कार आणि समान दुवा ही संस्कृतीच असते.




आसामी भाषेतली बिहू गीते, बंगाली भाषेतली तुसू गीते, पंजाबीमधली तिजा गीते, तामिळ भाषेतली तिरुविळपात्तू अशी ही वेगवेगळी सण आणि उत्सव गीते आहेत. रोगनिर्मूलनासाठी धार्मिक विधी गीते असतात. ऋतू गीते, होळी गीते, कृषिगीते, वर्षागीते, नौकागीते, कोळीगीते, तर काश्मिरी, तेलुगू, मल्याळम, उर्दू, आसामी यात लग्नगीते असतात त्याला वेगवेगळी नावे आहेत.महाराष्ट्रात विविध भागात विविध रंगी संस्कृतीची रूपे आढळतात. वनवासी जमातीमध्येही अशीच काही लोकगीते, नाचाची गाणी, सणाची गाणी, लग्नाची गाणी असतात. आपल्यासारखीच जात्यावर दळताना ओव्या असतात, तशीच भोजपुरीमध्ये धान्य दळताना गीते म्हणतात, त्याला ज्यंतसार म्हणतात. त्या-त्या गीतातून त्या प्रदेशाची संस्कृती आपल्याला कळत असते.भारतात विवाहप्रसंगी म्हणायची लोकगीते सगळीकडे दिसतात. मुलीला सासरी पाठवताना म्हणायची वियोगाची गाणी, भोजपुरीमध्ये आहेत. काश्मीरमध्ये विवाहगीते समूहाने म्हणायची आहेत. पंजाबमध्ये तर विधीप्रमाणे गीते आहेत. वधूकडची आणि वराकडची गीते वेगवेगळी असतात. गुजराती लग्नगीतात वधूवरांना राम-सीता किंवा कृष्ण-रुक्मिणी समजून गीते म्हणतात. यात विरहभावाला महत्त्व दिलेले असते. ओडिशामध्ये तर वधूने स्वत:च गीते म्हणण्याची प्रथा आहे आणि यात नवरी मुलगी आपल्या माहेरच्या नात्यांची ताटातूट होताना जो वियोग होतो, त्यातील आई-वडील, भाऊ-बहिणी यांच्या नात्यातील भावना यांचं वर्णन करत असते.




स्त्रीगीते : भारतातली लोकशाही, लोकसंस्कृती आणि कृषिसंस्कृती या सर्वांमध्ये स्त्री ही नेहमी मध्यवर्ती भूमिकेतच राहिली आहे. लोकसंसख्येच्या ५० टक्के स्थान असलेली स्त्री. खरं तर तिचं सगळीकडे अस्तित्व अगदी महत्त्वाच असतं. कर्तृत्व असतं. अनुभवपण असतो. कालीमाता, दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी, गौरी या रूपांत ती लोकदेवता-स्त्रीदेवता असते. तिचं माहात्म्य सांगणारी गीतं गायली जातात. शेतीसंबंधी कृषिगीते, सण-उत्सवासंबंधी गीते, धार्मिक गीते गायली जातात. पण, मनात काहीतरी असतं, कुठेतरी खुपत असतं, काही गुपितंही असतात, तर कुठला आनंद आणि कुठलं तरी दु:ख, कोणाला तरी सांगावसं वाटतं, तिथे औपचारिकता नको असते. पण, यासाठी भेटायला हवं ना? मग निमित्तही हवं त्याला.पूर्वी मुली लहान वयातच लग्न होऊन सासरी जायच्या. नंतरच्या टप्प्यात तिचं लग्नाचं वय जरी वाढलं तरी ती एक मुलगी आणि १६, १८फार फार तर २१, २२ असं वय असायचं. मोठी झाली तरी घरातली लग्नाची मुलगी ही जबाबदारीचं ओझं असायची. कारण, ज्या-ज्या काळात तिच्याबाबतीत वाईट अनुभव येत गेले, तिथे तिथे मग तिला बंधने घातली जाऊ लागली. यात तिची काळजी हाच भाग असायचा. कारणाशिवाय कुठे जायचं नाही, उशिरापर्यंत बाहेर थांबायचे नाही. मग पुढे-पुढे या रूढीच होऊन गेलेल्या दिसतात. सासरच्या लोकांबद्दल तक्रार करायची नाही. घरात बोलाची सोय नाही, मग कोणापाशी बोलणार? जीवाभावाच्या मैत्रिणीच! दुसरं कोण? त्या एक तर समदु:खी असतात. आपल्याच सारख्या आनंद आणि दु:खाच्या अनुभवातून तीही गेलेली असते. त्यामुळे ‘तिला माझे मन जास्तच कळेल’ या भावनेतून ही अशी गीते लिहिली गेली असणार. यासाठीच भेटण्यासाठी, एकत्र येण्यासाठी निमित्त असायची ती श्रावणात मंगळागौर जागविणे, भाद्रपदात हरितालिका जागविणे, ‘भोंडला’ किंवा ‘हादगा’ किंवा भुलाबाईची पूजा करणे. वटसावित्री, नागपंचमी, संक्रांत, चैत्रगौर हेसुद्धा अशानिमित्त केलेले हळदीकुंकू समारंभ. पण, विशेषत: लहान मुलींना एकत्र आणणे, त्यांना निसर्गशिक्षण देणे, वनस्पतींची ओळख करून देणे, कुटुंब संस्थेतल्या नात्यांची ओळख पक्की करून देणे, पाककृती किंवा पदार्थ ओळखणे, सजावट, मांडणी, स्वच्छता यातलं कलाकौशल्य दाखविणे, संस्कार करणं, अशा अर्थाने त्यांना शिक्षण द्यायचे ते त्यांना साजेशा अशा खेळातून, गाण्यातून. कारण, हे सर्व त्या मुलीला तिच्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणारं असतं. हा असतो भोंडला.




आपले लोकजीवन आणि कृषिप्रधान संस्कृती, भौगोलिकदृष्ट्या प्रत्येक प्रांतात जरा वेगवेगळी आहे. त्यावर आधारित काही सण ऋतूंप्रमाणे साजरे केले जातात. कोकण, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा ठिकाणी नवीन आलेल्या पिकांचे, धान्याचे स्वागत करण्याचा उत्सव केला जातो. त्यातच या लहान मुली भुलाबाईचा उत्सव साजरा करतात. भुलाबाई आणि भुलोजीची म्हणजे शंकर-पार्वतीची स्थापना करतात. नव्या पिकांचं, कृषिलक्ष्मीचं स्वागत करण्याचा हा उत्सव विदर्भात मानला जातो. निसर्गाबरोबरच तिच्या स्त्रीसुलभ भावना त्यात गाण्यातून व्यक्त होत असतात. विदर्भातला भुलाबाई उत्सव ३१ दिवसांचा तर पश्चिम महाराष्ट्रातला भोंडला घटस्थापनेपासून कोजागिरीपर्यंत साधारण १६ दिवस चालणारा. भुलाबाई उत्सवात शंकर, पार्वती आणि त्यांचं बाळ यांची आरास मांडून पूजा करतात. पार्वती महिनाभरासाठी माहेरी आलेली असते. म्हणून आपली मुलगी समजून तिचं माहेरपण खूप उत्साहात साजरं करतात. माहेर! मग तिचे आनंदाचे दिवस! अशी कल्पना करून त्याचे नियोजन होते, तर भोंडला म्हणजे हस्त नक्षत्रातला.वेदकालीन ऋषिजनांनी सूर्य-चंद्र आदींची प्रार्थना करून त्यांच्या प्रीत्यर्थ यज्ञ-याग असे काही करत असताना मास, ऋतू, नक्षत्र या संबंधित काही सिद्धान्त अनुभवाच्या आधारावर ठरवले. त्यावरूनच आपली कालगणना, पंचांग याचे नियोजन केले गेले आहे. पण, अशी माहिती, हिंदू सणांचा इतिहास आपल्या मुला-मुलींना माहिती नसतो, त्यातून स्त्रियांना व मुलींना तर नसायचाच. आताही तशीच परिस्थिती आहे. कारण वेगळे आहे एवढेच. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, चातुर्मास, नारळी पौर्णिमा, संक्रांत, होळी असे ऋतूवरून निश्चित केलेले सण आहेत, तर काही कौटुंबिक आहेत उदा. वटसावित्री, मंगळागौरी, पिठोरी अमावास्या, हरितालिका, ऋषिपंचमी ही कुटुंबासाठी ठरवलेली व्रते आहेत. या सर्वांप्रति कृतज्ञता दाखविण्याची संधी म्हणजे पूजा-अर्चना वगैरे करत असत.



कृषिप्रधान भारतात तर उगवलेल्या पिकांमुळे झालेला आनंद हा उत्सव म्हणूनच साजरा होत आला आहे. रब्बी हंगामातली पिके मोठी होत असताना, ती टिकावित आणि आणखी चांगली तरारून वर यावीत म्हणून हस्त नक्षत्राची पूजा बांधली जाते, पावसाळ्यातल्या या चार महिन्यांत हस्त नक्षत्राला मानांचं स्थान असतं. हस्त नक्षत्रात मुसळधार पाऊस असतो. त्यामुळे यावेळी हत्तीला प्राधान्य दिलेले असते. त्याची प्रतिमा पाटावर काढून किंवा रांगोळीतून काढून समृद्धीच्या या प्रतीकाची पूजा करून त्याभोवती फेर धरून गाणी म्हणायची पद्धत आहे. भोंडल्याची सुरुवात याच अर्थपूर्ण गाण्याने करतात.



‘ऐलमा पैलमा गणेश देवा,
माझा खेळ मांडून दे,
करीन तुझी सेवा,
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी,
पारवं घुमतंय पारावरी,
गोदावरी काठच्या उमाजी नायका,
आमच्या गावच्या भुलोजी बायका,
एविनी गा, तेविनी गा,
आमच्या आया तुमच्या आया,
खातील काय दुधोंडे,
दुधोंड्याची लागली टाळी,
आयुष्य दे रे बा माळी,
माळी गेला शेताभाता,
पाऊस पडला येता जाता,
पड पड पावसा थेंबोथेंबी,
थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे,
भोंडल्या तुझी सोळा वर्षे...’
हस्त नक्षत्रावर सर्वांचीच भिस्त.
हस्तात होणारा पाऊस हा हत्ती पाण्यात बुडेल एवढा असायला हवा, अशी अपेक्षा असते. म्हणून आनंदी आनंद असतो. त्याचे महत्त्व सांगण्यासाठी-
‘हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा॥
दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली॥
ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी॥
एकेक केळं मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं’
नक्षत्राच्या माहितीबरोबर वारांचे महत्त्व सांगणारे गीत म्हणजे,
आज कोण वार बाई। आज कोण वार?
आज आहे सोमवार। शंकराला नमस्कार।
आज कोण वार बाई। आज कोण वार?
आज आहे मंगळवार। देवीला नमस्कार।
यातून आध्यात्मिक गोडी लावण्याचे काम साधले जाते.
‘कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून ॥धृ.॥
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून,
त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं
जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण,
आली यशोदा धावून...॥1॥
आई मला विंचू दे आणून
त्याची अंगठी दे करून।



 
या गाण्यातून कशाबद्दल काय काय कल्पना केल्या जातात, कोणत्या उपमा दिल्या जातात आणि कृष्ण कसा हट्ट करतो, हे दाखवले आहे.काही गीतांतून कौटुंबिक चित्र उभं राहतं. नाती कशी असतात, त्याची बंधने कशी असतात, नात्यातला आदर कसा असतो, कसा असायला हवा, याचही चित्रण दिसतं.नणंद-भावजयींचे नाते एक वेगळेच नाते असते. नणंदबाईंना जरा आपल्या भावाच्या बायकोपेक्षा जास्तच मानपान हवा असतो. सासूबाई तर काय त्यांच्याच तोर्‍यात! जरा सुनेने माहेरी जायचं म्हटलं तर नाराजीचा सूर. मग ही कामाची यादीच सुनेपुढे मांडतात. माहेरी जायच्या आधी सूनबाईंनी दळणकांडण करून ठेवायचं, तिखटमिठाचं पाळं भरून ठेवायचं, गिरणीतून पीठ आणून ठेवायचं, भाजीबिजी आणून ठेवायची, कपडे धुऊन ठेवायचे, अशी सगळी कामे झाल्याशिवाय तिची इच्छा पूर्ण नाही व्हायची. हे तर अलीकडच्या काळात ही घडत होतं. म्हणून ते तेव्हाच्याही काळातल गाणं-



 
‘कारल्याचा वेल लाव गं सुने...
कारल्याचा वेल लाव गं सुने, लाव गं सुनेऽऽऽ
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासूबाई,
लावला हो सासूबाईऽऽऽऽ
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥1॥
कार्ल्याचा वेल वाढू दे गं सुने वाढू दे गं सुनेऽऽऽ
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासूबाई,
वाढला हो सासूबाईऽऽऽ
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥2॥
कार्ल्याला फूल येऊ दे गं सुने येऊ दे गं सुनेऽऽऽ
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासूबाई,
आलं हो सासुबाईऽऽऽ
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥3॥
म्हणजे कारल्याचा वेल लाव, तो वाढू दे, त्याला फूल येऊ दे, फळ लागू दे, आता त्याची भाजी कर, ती तू पण खा, मागचं उष्टं खरकटं आवर आणि आता जा माहेरा, असा तिच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जायचा. भावनांची कोंडी व्हायची. मग कसं प्रेम वाटणार? आणि तुलनेने माहेर, आजोळ चांगलंच वाटणार.
म्हणून ‘अक्कण माती, चिक्कण माती’ या गाण्यात
‘अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारितं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं’
अशी आपली सून माहेरला गेली आहे, तिला घ्यायला सासरची मंडळी जातात. वयाने लहान असल्याने तिला काहीतरी आमिष दाखवलं की, ती लगेच येईल, असे वाटून आमिष दाखवले जाते.
‘अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं?’
हे गीत. किंवा
‘सासरच्या वाटे कुचुकुचु काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासरा पाहुणा आला गं बाई
सासर्‍याने काय काय आणले गं बाई
सासर्‍यांनी आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई....’



या गाण्यातून सूनबाईंना घ्यायला आलेल्या लोकांनी वेगवेगळी आमिषे दाखवली आहेत. पण, ती काही सासरी/घरी यायला तयार नाही. सासरचे लोक पाटल्या, पोहे हार, गोठ, राणीहार, हे दागिने घेऊन येतात. पण, जेव्हा नवरा मंगळसूत्र घेऊन येतो, तेव्हाच ही सूनबाई त्याच्याबरोबर सासरी-घरी जायला तयार होते. अशी ही हट्टी सून या गीतात दाखवली आहे.अशा प्रकारे एक प्रकारचं लोकजीवनच अशा खेळातून, उत्सवातून आपल्याला पाहायला मिळतं. असे सामाजिक शिक्षण देणारे उत्सव, व्रते आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत. तो टिकवला पाहिजे. काळानुसार त्यात बदल होत राहणार. पण, मुख्य उद्देश विसरता कामा नये. म्हणून भलतंच रूप त्याला देऊ नये. अशीच पुढच्या पिढीकडून अपेक्षा आहे. ‘भोंडला’, ‘भुलाबाई’ किंवा ‘हादगा’ अशा लोकपरंपरा सामाजिक मूल्यांचे धडे देणार्‍या आहेत. लहान मुलींचे/स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणारे आहे. नैतिकता शिकवणार्‍या आहेत. नातेसंबंध टिकविणार्‍या आहेत, हे त्या मुलीच्या पालकांनी सतत लक्षात ठेवलं पाहिजे. तिच्या भविष्याचा विचार अशा छोट्या-छोट्या परंपरांतून या निमित्ताने तिच्यात रुजवला पाहिजे. आपल्या पूर्वजांकडून चांगले संस्कार करण्यासाठीच असे उत्सव निर्माण केले गेले आहेत.

- डॉ. नयना कासखेडीकर