कोरोनाच नव्हे ज्या ज्यावेळी देश संकटात आला तेव्हा सीरमनं बजावलं कर्तव्य

25 Oct 2021 11:34:15

SII _1  H x W:




पुणे : (अनीश कुलकर्णी) : नेहमीच संकट समयी धावून येणारी ‘सीरम इन्स्टिट्यूट’ सध्याच्या कोरोनाच्या जागतिक महामारीमध्येसुद्धा वेगाने धावून आली आहे. गेल्या काही दशकांपासून अनेक रोगांचा, महामारीचा सामना ‘सीरम इन्स्टिट्यूट’ करत आली आहे. ‘स्वाईन फ्लू’ असो व ‘इबोला’ असो किंवा गेल्या शतकभरातील सर्वात गंभीर संकट असलेला ’कोरोना’ असो, गरजूंना मदत करणारा पहिला हात पुढे येतो तो ‘सीरम’चाच. ‘सीरम’ फक्त जागतिक आरोग्याचीच काळजी घेते, असे नाही तर जागतिक शिक्षण, जागतिक स्वच्छता या गोष्टींमध्ये पूनावाला यांचे ‘सीरम’ कुटुंब आपुलकी दाखवत आले आहे.
 
 
शर्यतीत पळणार्‍या घोड्यांची निगा राखणे, त्यांचे पोषण करणे हा सायरस पूनावाला यांच्या परिवाराचा परंपरागत व्यवसाय. सायरस पूनावाला पण तरुण असताना हाच व्यवसाय करायचे. त्यांचे आयुष्यच शर्यतीत धावणार्‍या घोड्यांभोवती गुंफलेले होतं. पण, हा व्यवसाय जास्त काळ चालणार नाही, हे त्यांना कळून चुकले. काळ बदलत होता, तसेच घोड्यांच्या देखरेखीसाठी आणि आरोग्यासाठी लागणारी औषधेसुद्धा पूनावाला यांना सहजरित्या मिळत नव्हती.
 
 
एकदा त्यांच्याकडच्या शर्यतीत धावणार्‍या घोड्याला साप चावला होता, तेव्हा ‘अ‍ॅण्टिसीरम’ या औषधासाठी त्यांनी मुंबईमधील ‘हाफकीन’ संस्थेशी संपर्क साधला. परंतु, ‘हाफकीन’ या संस्थेकडून घोड्याला लागणारे औषध मिळायला सायरस पूनावाला यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले आणि ‘हाफकीन’ संस्थेकडून झालेल्या दिरंगाईमुळे सापाच्या विषाने बाधित झालेली त्यांचा घोडा मरण पावला. पूनावाला परिवाराने ‘हापकीन’ संस्थेला काही औषध आणि लसी निर्माण करण्यासाठी २०० पेक्षा जास्त जनावर प्रयोगासाठी दिली होती.
 
 
 
आपण ‘हापकीन’ संस्थेला एवढी मदत करूनसुद्धा आपल्याला त्या प्रमाणात मोबदला न मिळाल्यामुळे १९६४ साली बी.कॉम पदवीधर झालेल्या सायरस पूनावाला यांनी पुण्यातील हडपसर येथे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ औषध निर्माण करणारी कंपनी सुरू केली. सायरस पूनावाला स्थापित ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडून ‘अ‍ॅण्टिटीटनस सीरम’ हे औषध निर्माण केले. ‘अ‍ॅण्टिटीटनस सीरम’ हे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे पहिले उत्पादन. १९६२ साली चीनने, तर १९६५ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले होते.
 
 
 
या दोन महाभयंकर युद्धामध्ये अनेक भारतीय जवान गंभीर किंवा काही प्रमाणात जखमी झाले होते. अशा अगणित जखमी जवानांना कमी किमतीमध्ये औषध मिळावे, या सामाजिक भावनेतून त्यांनी ‘अ‍ॅण्टिटीटनस सीरम’ बाजारात आणले. याच सामाजिक जाणिवेतून ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची वाटचाल आत्तापर्यंत चालू आहे. औषध निर्माणानंतर १९६८ साली ‘सीरम’ कंपनी लसनिर्मितीकडे वळाली. जिनिव्हा येथील ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ (डब्यूएचओ) कडे जागतिक पातळीवर लसनिर्मितीसाठी १९८४ साली ’प्री क्वालिफिकेशन’ अर्ज करण्यात आले. या प्रयत्नांना ‘सीरम’ला १९९३ साली यश आले आणि ‘सीरम’ने जागतिक पातळीवरील त्यांचे ‘नेसल व्हॅक्सिन’ बनवले.
 
 
 
१९९३ ते २०२१ या कालावधीत ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या २५ लसी ‘डब्ल्यूएचओ’कडे नोंदणीकृत आहेत आणि या लसी जगभरातील १७०पेक्षा जास्त देशात निर्यात केल्या जातात. १९९३ मध्ये जोमाने सुरू झालेला हा प्रवास २०२१ पर्यंत जगातील ७० टक्के लोकांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच जगातील ७० टक्के जनता ‘सीरम इन्स्टिट्यूट’मध्ये बनणार्‍या लसी घेते. वर्षभरात ‘सीरम’ १६० कोटी लसींची निर्मिती करते. ‘सीरम’कडे काम करणार्‍या शास्त्रज्ञांवरील अफाट विश्वास आणि अधिकारी व कामगार वर्गामधील एकोप्याच वातावरण हेच ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे यश आहे, असे सांगण्यास तेथील कर्मचारी विसरत नाहीत. ‘सीरम’ ही संस्था जगातील सर्वात जास्त लस निर्माण करणारी कंपनी असली, तरी जगातील सर्वात जास्त पैसे असलेल्या औषध निर्माण करणार्‍या कंपन्यांमध्ये ‘सीरम’ येत नाही.
 
 
कारण, स्वस्त भावात जगातील गरजू लोकांना लस निर्माण करून देणं हेच ध्येय ‘सीरम’ने सुरुवातीपासूनच ठेवले होते आणि याच ध्येयावर ‘सीरम’ अजूनही चालत आहे. ‘सीरम’ ही संस्था जरी भारतात असली, तरी भारतापेक्षा बाहेरच्या जगात ‘सीरम’ची औषध आणि लसी निर्यात होतात. गरिबांना परवडेल या दरात औषध आणि लसी देणे या हेतूने ‘सीरम’ आफ्रिका खंडातील गरीब देशांना सर्वात जास्त लसीचा पुरवठा करत आली आहे. जगातील नव्याने जन्म घेतलेल्या तीन बालकांपैकी दोन जणांना ‘सीरम’ची लस दिली जाते. ‘सीरम’च्या आत्तापर्यंत ‘टीटानस’, ‘डायफेटरिया’, कावीळ, ‘रुबेला’ आणि ‘रेबीज’ या लसी जगातील सर्वच देशांपर्यंत पोहोचल्या आहेत. २०२०च्या सुरुवातीला जगाला ‘कोविड’ या महाभयंकर प्रसारित होणार्‍या आजाराने ग्रासले.
 
 
 
तेव्हा ‘कोविड’बद्दल औषध किंवा लस कोण कशी निर्माण करणार हाच प्रश्न जागोजागी विचारला जाऊ लागला. या जागतिक संकट समयी पहिल्यांदा धावून आले ते सायरस पूनावालाच. जग हळूहळू कोरोनामुळे बंद होत असताना मात्र ‘सीरम’मध्ये २०२० च्या मे महिन्यापासूनच कोरोनावरची लस शोधण्याचे काम सुरु झाले. कोरोनाच्या या लसीसाठी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने ‘ऑक्सफर्ड’ आणि ‘अ‍ॅस्ट्राझेनका’शी करार झाला. कोरोना जगात धुमाकूळ घालताना ‘ऑक्सफर्ड’ विद्यापीठाला २०२० च्या एप्रिल महिन्यात कोरोना लसीवरचा ‘फॉर्म्युला’ शोधण्यात यश आले.
 
 
या मिळालेल्या ‘फॉर्म्युला’चा उपयोग करून भारत सरकारकडून सगळ्या चाचण्या होण्यापूर्वीच ‘सीरम’ने कोट्यवधी रुपयांचा धोका पत्करून कोरोनाच्या ’कोव्हिशिल्ड’ या लसीची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि या जागतिक संकटसमयी पूनावाला हे पुन्हा एकदा भारताचे पर्यायाने संपूर्ण जगाचे तारणहार बनले. या ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा सगळा कारभार आता सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला हे बघतात. जगाला फक्त लस आणि औषध पुरवणे एवढाच काम न करता जागतिक स्वच्छता आणि बालसंगोपनासाठी पण ‘सीरम’ काम करते. अशा या दानशूर व जागतिक संकटसमयी नेहमी धावून येणार्‍या ’पूनावाला’ कुटुंबाला मनापासून सॅल्यूट...!






Powered By Sangraha 9.0