पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याला यावर्षी पावसाने चांगलाच धोका दिल्याने या परिसरातील नागरिकांना 'दुष्काळी' परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शेतकरी वर्ग तर संपूर्ण हवालदिलच झाला आहे. दौंड तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात ''खोर'' गावाच्या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने यावर्षी चालू हंगाम पार पाडणे फारच जिकिरीचे बनले आहे. पावसाचा हंगाम आता संपल्याने शेतकऱ्यांपुढे मात्र सिंचन योजनेतूनच पाणी घेणे हाच एकमेव पर्याय पुढे उभा राहिला आहे.
दौंड तालुक्यातील खोर, देऊळगावगाडा, नारायण बेट, पडवी, कुसेगाव या परिसरात पाऊस झाला नसल्याने चालू व पुढील हंगाम कोलमडला जाणार आहे. खोर गावाच्या जवळ दोन जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत; मात्र या योजनांमधून लोकांना वर्गणी भरली तरच पाणी आणता येते . हाता तोंडाशी आलेला घास हा केवळ पाऊस न झाल्याने हिरावून घेतला जातो की काय असाच प्रश्नच शेतकरी वर्गापुढे आता उभा ठाकला आहे. खोर परिसरातील शेतकऱ्यांनी तब्बल तीन वेळा लोकवर्गणीतून कार्यान्वित सिंचन योजनेतून पाणी घेतले आहे. जुलै महिन्याच्या ३ तारखेला पाहिले आवर्तन जनाई शिरसाई योजनेतून फरतडे वस्ती तलावात सोडले होते. त्यांनतर ७ सप्टेंबर रोजी दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते, आता पाणी अपुरे पडले असल्याने व चालू अंजिराच्या बागांचा हंगाम पार पाडण्यासाठी २५ ऑक्टोबर रोजी तिसरे आवर्तन लोकवर्गणीतून सोडण्यात आले आहे.
''खोरच्या'' शेतकऱ्यांनी चार महिन्याच्या कालावधीत तब्बल तीन आवर्तन हे सिंचन योजनेतून घेतले आहे. सिंचन योजनेतून आवर्तन घेणे इतकी सोपी गोष्ट नसून यासाठी शेतकरी वर्गाला पैसे मोजावे लागत आहेत. जनाई शिरसाई योजनेतून दौंड तालुक्यातील शेतकरी वर्ग किती वेळा लोकवर्गणी भरणार आणि किती वेळा या वर्षी आवर्तन घेणार हाच मोठा प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे. पाणी आणणे ही खर्चीक बाब आहे. जरी ही खर्चीक बाब असली तरी अंजीर बागांचा बहार जगविण्यासाठी पाणी हे महत्त्वाचे साधन आहे असे गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे ; कारण या वर्षी खोरच्या परिसरातील शेतकरी वर्गाने अंजीर बागांवर अवाढव्य खर्च करून ऐन उन्हाळ्यात अंजीर बागा जीवापाड जोपासल्या आहेत.
ऐन हंगामात जर अंजीर बागांना पाणी कमी पडले गेले तर शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामूळे शेतकरी राजा वाटेल तितके पैसे मोजण्यास तयार आहे ; परंतु त्यांच्या बागा जगल्या पाहिजेत असेच शेतकरयांचे सध्या म्हणणे आहे. जवळच पुरंदर जलसिंचन योजना आहे ; मात्र या योजनेतून पाणी आणणे ही मोठी तारेवरची कसरत आहे. कारण ह्या योजनेतून एक आवर्तन सोडण्यासाठी शेतकरी वर्गाला तब्बल ६ ते ७ लाख रुपये इतका खर्च येतो. त्यामुळे जनाई शिरसाई योजनेतून पाणी घेणे शेतकरी वर्गाला सध्या परवडत आहे. आगामी काळात या सिंचन योजनांचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न मिटवण्यासाठी काही तरी हालचाल होणे अपेक्षित आहे.