गणेश नाईक साहेबांच्या कामाचा मोठा प्रभाव गेल्या २० ते २५ वर्षांपासून माझ्यावर आहे. माझ्या भागातील नागरिकांची काम घेऊन मी नेहमी दादांच्या जनता दरबारासाठी जात असे. त्यावेळी नागरिकांच्या प्रत्येक समस्येवर दादा उपाय सांगत. त्या समस्या भागातील विकासकाम पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावत. दादांच्या याच कार्यशैलीचा माझ्यावर प्रभाव पडला. मी राजकारणात सक्रिय झालो.
मागील पाच वर्षांपासून मी नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. तरुण नगरसेवकांना दादा विकासकामांसाठी प्रोत्साहित करतात. नगरसेवकांनी सांगितलेल्या विकासकामांसाठी ते त्या नगरसेवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. माझ्या प्रभागात नवी मुंबईतील पहिली ‘सीबीएसई’ बोर्डाची शाळा सुरू झाली. दादांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळेच ही शाळा माझ्या प्रभागात सुरू झाली. गरिबांच्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या मुलांसाठी पाळणाघर माझ्या भागात सुरू झाले. नाईक साहेब असे व्यक्तिमत्त्व आहेत की, त्यांच्याकडे जाणारे कोणीही निराश होऊन परतत नाही. एखादं काम आमच्याकडून शक्य होत नाही, ते काम नाईक साहेब नक्की मार्गी लावतात, हीच कार्यशैली जनतेला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांच्याशी जोडून ठेवते.
नवी मुंबईच्या विकासात दादांचे योगदान सांगावे तितके कमीच आहे. मोरबे धरणाचा दादांनी घेतलेला निर्णय एक महत्त्वपूर्ण निर्णय होता. पाम बीच रोडच्या उभारणीत दादांचा मोलाचा वाटा आहे. आजही अनेक प्रकल्प उभारताना याचे उदाहरण दिले जाते. आज अनेक महत्त्वाचे प्रकल्प नवी मुंबईत येतात, कारण तो प्रकल्प मार्गी लागेल याचा विश्वास त्यांना असतो. अनेक नागरिकांची रुग्णालयाची मोठी मोठी बिल स्वतः नाईक साहेबांनी भरली आहेत. अनेकांना जीवदान दादांमुळे मिळाले आहे. ही मदत माझ्या डोळ्यांसमोर माझ्या भागात दादांनी केली आहे.
आज त्यांच्या जन्मदिनी इतकेच सांगेन की, एक दूरदृष्टी असणारा नेता नवी मुंबईला मिळाला, हे इथले भाग्य आहे. हजारो गोरगरिबांच्या शुभेच्छा दादांच्या पाठीशी आहेत. नवी मुंबईतील जनतेचे प्रेम आणि शुभेच्छा दादांच्या पाठीशी राहतील. नवी मुंबईच्या राजकारणात दादांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल.
- विशाल डोळस, माजी नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिका